श्रीनगर – संसद देशातील सर्वात मोठी पंचायत आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे. सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने 2014मध्ये काश्मीरचाच मुद्दा उचलून धरला, त्यावर लोकांनी त्यांना मतदान केले. त्यावेळी त्यांनी पीओके घेऊन येणार अशी घोषणा केली. पण ते नंतर बघा, आधी काश्मीरी पंडितांचा जीव वाचवा, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत आज जम्मू- काश्मीरमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहचले आहेत. या यात्रेत सहभागी होण्याआधी खासदार राऊत काश्मीरमधील काश्मीरी पंडितांच्या एका आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
राऊत म्हणाले, जम्मू-काश्मीरीमधील काश्मीरी पंडितांना नोकरी देत पगार चालू करून, त्यांच्या मुला-बाळांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी या काश्मीरी पंडितांची आहे. पण काश्मीरी पंडितांची ही मागणी सरकार पूर्ण करू शकत नाही. मग पीओकेवर चर्चा का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
2014मध्ये पहिली निवडणूक झाली, त्यावेळी काश्मीरी पंडितांचा आणि राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिली. या देशात काश्मीरी पंडितांचे रक्त वाहिले आहे. त्यांचा तो आक्रोश, आकांत आम्ही विसरु शकत नाही. केंद्र सरकार आणि गृहमंत्र्यांनी काश्मीरमध्ये येऊन त्यांच्या भावना, आक्रोश ऐकून घेतला पाहिजे. मानवतेच्या भावनेतून तरी ऐकून घ्यावे. सरकार पुन्हा या मुद्दावर राजकारण करु इच्छित आहे का? पुन्हा त्यांच्या जीवावर निवडणूक लढू इच्छित असतील तर हे चुकीचे असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.