मंचर -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू होत असून, जीवनावश्यक वस्तूंसह तरकारी किंवा इतर मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी प्रत्येकी एकच गेट सुरू राहील. आवक गेटला शेतमालाची गाडी आल्यावर ड्रायव्हर व क्लिनरला खाली उतरवून त्यांची प्रथम वैद्यकीय तपासणी करून मास्क व सॅनिटराइझ करून आत सोडले जाईल व गाडी पूर्णपणे जंतुनाशकाने फवारणी करूनच मार्केटमध्ये सोडली जाईल, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, कोकण विभागीय आयुक्त, संचालक, महासंघाचे पदाधिकारी, माथाडी संघटनेचे नेते आणि नवी मुंबई पोलीस यांची संयुक्तिक सभा गुरुवारी (दि. 26) झाली. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत पिंगळे माहिती देत होते.
सभेमध्ये मार्केट सुरू ठेवण्याबाबत नियम व नियमावली बनविण्यात आली आली आहे. यावेळी व्यापाऱ्यांनी दुकानाच्या क्षमतेएवढाच शेतमाल मागवणे आणि फक्त दुकानावरच माल खाली करून विक्री केली जाईल; परंतु इतर ठिकाणी मालाची विक्री करता येणार नाही, असे ठरवण्यात आले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू झाल्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील शेतीमाल मुंबई येथे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्राहकांचीही होणार तपासणी
मार्केटमध्ये पहाटे 4 वाजेपर्यत शेतमालाच्या गाड्या आत घेतल्या जातील आणि त्यानंतर शेतमालाच्या गाडीला प्रवेश दिला जाणार नाही. एका तासात मालाच्या गाड्या खाली करून मार्केटच्या बाहेर काढण्यात येतील. पहाटे साडेचारनंतर ग्राहकांना पूर्ण वैद्यकीय तपासणी करून सॅनिटराईज करून मास्क देऊन मार्केटमध्ये सोडले जाईल. गाडी पूर्ण पणे जंतुनाशकाने फवारणी करूनच मार्केटमध्ये घेतली जाईल.
पहाटे 5 ते 10 या वेळेत विक्री
व्यापाऱ्यांना पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत मालाची विक्री करता येणार आहे. 11 वाजता मार्केटचे गेट बंद केले जाईल. शुक्रवार (दि. 27) पासून भाजी व्यवसायातील प्रत्येक मदतनीस,कामगार, गाळेधारक इतर सर्व घटकास फोटो ओळखपत्र देण्यात येईल. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक घटकास वाहन स्टीकर देण्यात येणार आहे.
आवश्यकता भासल्यास परिवहन सेवा देणार
प्रशासनाने आवश्यकता असेल त्या भागात व्यापारी मदतनीस, कामगार, ग्राहक यांना गरज असल्यास किंवा मागणी केल्यास परिवहन सेवा देण्याची जबाबदारी घेतली आहे. सर्व नियंत्रण हे नवी मुंबई पोलीस यांच्या अखत्यारीत होणार आहे.
दर गुरुवारी-रविवारी मार्केट बंद
सर्व नियोजन हे बाजार समिती व पोलीस प्रशासन करणार आहे. त्यात बाजार आवारातील कोणतीही संघटना व महासंघ हस्तक्षेप करणार नाही. माथाडी कंपनीची मजुरी सर्वाना रोखीने द्यावी लागेल. दर गुरुवारी व रविवारी मार्केट संपूर्ण बंद राहील व त्याचे काटेकोरपणे पालन होईल.
बाजार समिती भाजी आवारात येणाऱ्या सर्व घटनांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये व्यापार करणे हे कोणावर बंधनकारक नाही. ज्या कोणाला सद्यःस्थितीत व्यापार करायचा नसेल त्यांनी तो करू नये.
– शंकर पिंगळे, संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती