Sandipan Bhumare in Paithan – एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती. शिंदे यांच्यासोबत पक्षातील बहुतांश आमदार, खासदार, नगरसेवक व पदाधिकारी गेल्याने उद्धव ठाकरे शिवसेना वाचवू शकतील का असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. अशातच शिवसेना टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे देखील खांद्याला खांदा लावून मैदानात उतरल्याचं दिसतंय. एकीकडे उद्धव ठाकरे नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतायेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा काढून बंडखोर आमदारांना कात्रीत पकडत असल्याचं पाहायला मिळतंय. जनतेकडून देखील निष्ठा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय.
अशातच आज शिंदे गटाचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे पैठण येथील एका कार्यक्रमाला उपस्थित असून देखील गर्दीच न जमल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. संदीपान भुमरे यांना शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले असून त्यांच्याकडे रोजगारहमी योजना व फलोत्पादन खाते देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचे देखील भुमरे प्रबळ दावेदार आहेत. भुमरे यांच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडल्यानंतर आपला मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मात्र मंत्री भुमरे यांची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाला केवळ १०० ते १५० लोक उपस्थित होते. यामुळे कार्यक्रमस्थळावरील बहुतांश खुर्च्या रिकाम्याच पडल्याचं पाहायला मिळालं.
काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा भुमरे यांच्या पैठणमध्ये आली होती. ठाकरेंच्या सभेसाठी चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांनी जोरदार तयारी केली होती. ठाकरे यांच्या पैठणमधील सभेला चांगलीच गर्दी जमली होती. अशातच आज मंत्री भुमरे हे आपलाच मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये कार्यक्रमास उपस्थित असतानाही कार्यकर्त्यांनी मंत्रीमहोदयांच्या सभेकडे पाठ का फिरवली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
आदित्य ठाकरेंची निष्ठा आज नागपूरला
शिवसेना नेते तथा उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आज नागपूर येथे पोहोचली आहे. नागपूर विमानतळावर पोहचताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना – संभाजी ब्रिगेड एकत्र येण्यावरून ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. “शिवसेनेनं कुठेही भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका कायम स्पष्ट राहिली आहे. ज्यांना आमची मतं, भूमिका पटली, ते आमच्यासोबत येतील. गेल्या अडीच वर्षांत देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्याच आधारावर एकत्र आलो आणि सोबत राहिलो. ज्यांना आमची भूमिका मान्य असेल, ते सोबत येतील.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.