नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना राहुल लाहोरी म्हणावे, अशी उपरोधिक् टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. भारतातील कोविड-19 ची स्थिती, भारतातील मुस्लिमांची स्थिती आणि ईशान्य भारतातील भारतीय नागरिकांना देण्यात येणाऱ्या वागणूकीवरून पाकिस्तानस्थित व्यासपीठावरून कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे.
“कॉंग्रेसचे नेते ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून, विशेषतः पाकिस्तानातील व्यासपीठावरून भारताबद्दल अपमानास्पद वक्तव्ये करत आहेत, ते पाहून राहुल गांधी पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, असेच वाटते.’ अशी टीका पात्रा यांनी केली.
यापुढे भाजपचे नेते राहुल गांधी यांना “राहुल लाहोरी’ म्हणूनच संबोधले जाईल. इंडियन नॅशनल कॉंग्रेसला लवकरच पाकिस्तान नॅशनल कॉंग्रेस असे संबोधले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये जिना समर्थकांना निवडणूकीचे तिकीट दिले जाते. मात्र राहुल गांधी हे भारताच द्वेष करतात, याबाबत आमच्य मनात कोणताही संदेह नाही, असेही पात्रा म्हणाले.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विविध मुद्दयांवरून देशाची बदनामी केल्याबद्दल पात्रा यांनी शशि थरूर यांच्यावरही जोरदार टीका केली. कोविड-19 च्या साथीमध्ये देशाने किती उत्तम कामगिरी केली आहे, हे सर्व जगाने बघितले आहे. भारतातील मृत्यूूदर सर्वात कमी आणि करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असेही पात्रा म्ह्णाले.
ईशान्य भारतातील लोक वेगळे दिसतात, म्हणून भारतात त्यांना वेगळी वागणूक दिली जाते, असे थरूर म्हणाले होते. तसेच तबलिगी जमातीवरून बोलताना भारतात कट्टरवाद आणि पूर्वग्रहदूषितपणा वाढत असल्याचेही ते म्हणाले होते.