महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख घटक पक्षांची एक वज्रमूठ सभा काल छत्रपती संभाजीनगरात झाली. त्या सभेत सर्वांचीच घणाघाती भाषणे झाली. सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीची अशी ही पहिलीच एकत्रित सभा होती. अन्यथा शिवसेनेने त्यांच्या वतीने सारा महाराष्ट्र एकतर्फी पिंजून काढायला सुरुवात केली होती.
नितीन बानुगडे, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या एकट्याच्याच सभा संपूर्ण राज्यभरात सुरू केल्या होत्या. त्या सभांनाही मोठा प्रतिसाद लाभला होता व ठाकरे गटाने त्यांच्या बाजूने जनतेतील वातावरण बऱ्यापैकी फिरवले होते. ठाकरे गट एकतर्फीच वाढत असल्याचे लक्षात येताच, एकट्या या गटाने अशा सभा घेण्याऐवजी महाविकास आघाडी म्हणून यापुढे एकत्रित सभा घेण्याची सूचना त्यांना दोन्ही कॉंग्रेसकडून करण्यात आली. त्यातही ही सूचना करण्यात पवारांचाच पुढाकार अधिक होता. त्यानुसार ही सभा झाली. वास्तविक शिवसेनेच्या वर नमूद केलेल्या लोकांनी धारदार भाषणे करून महाराष्ट्रात जवळपास संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी जे वातावरण निर्माण झाले होते तशाच पद्धतीचे वातावरण निर्माण करण्यात यश मिळवले. यातून ठाकरे गटाच्या नेत्यांचा लढवय्या बाणा दिसून आला. पक्ष फुटीनंतर ते अजिबात खचलेले नाहीत, उलट अधिक जोमाने त्यांनी पुन्हा पक्षबांधणी सुरू केल्याचे त्यांच्या सभांमधून दिसून आले.
पक्षाची अनेक अर्थाने वाताहत झाली असताना अशी जिगर मनाशी बाळगून पुन्हा उभे राहण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जनतेतूनही मोठी साथ मिळू लागली होती. वास्तविक ठाकरे गटाकडे आता सभा गाजवणारे नेतेही फारसे राहिलेले नसताना सुषमा अंधारे, नितीन बानुगडे आणि भास्कर जाधव यांच्या सारख्या नेत्यांनी मैदान गाजवत नेले, त्याचे राजकीय मोल मोठे आहे. पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले, जवळपास सर्व पक्षच फुटला, विधानसभेत जेमतेम 12 आमदार शिल्लक राहिले. संसदेतीलही बहुतांशी खासदार भाजपच्या वळचणीला गेले अशा स्थितीत अन्य कोणताही पक्ष गलितगात्र अवस्थेत राहिला असता. पण अशा खचलेपणाचा चेहऱ्यावर लवलेशही न दाखवता ही मंडळी नव्या जोमाने महाराष्ट्र पिंजून काढत राहिली. त्याचा धसका सरकारने विशेषत: भाजपने घेतला. म्हणूनच सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांच्या सभांना परवानगीच न मिळू देण्याचा प्रयत्न केला गेला. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्याविरोधात अत्यंत आक्रमक शैलीत प्रचार केला.
फुटीर आमदारांच्या मतदारसंघात त्यांनी मोठी वातावरण निर्मिती केली. ठाकरे गटातर्फे नितीन बानुगडे यांनीही एक स्वतंत्र प्रचार मोहीम राबवून मोठी लोकजागृती केली. बानुगडे हे मुळात शिवव्याख्याते आहेत. त्यांच्या भाषणात आवेशपूर्ण शैली असते. त्यातून लोकांच्या मनावर मोठा प्रभाव टाकला जाऊ शकतो हे ध्यानात घेऊन त्यांनाही स्वतंत्रपणे मैदानात उतरवले गेले. त्यांनी ज्या जोशात शिवाजी महाराजांच्या चरित्रावर या आधी व्याख्याने दिली होती, त्याच जोशात त्यांनी शिवसेनेची एकूण भूमिका आणि भाजपच्या राजकारणावरही प्रभावी भाषणे करून वातावरणात मोठाच जोष भरला. कोकणात भास्कर जाधव यांनीही त्यांच्या कोकणी शैलीत तुफानी बॅटिंग सुरू केली होती. आदित्य ठाकरे आणि नंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांनीही मोठ्या सभा घेत वातावरण ढवळून काढल्यानंतर शिवसेनेच्या या वाढत्या प्रभावाची दोन्ही कॉंग्रेसच्या लोकांना जाणीव झाली असावी म्हणूनच त्यांनी ठाकरे गटाला, यापुढे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित सभा घेण्याची सूचना केली असावी.
राजकारणात लोकजागृती करून लोकांपुढे आपली भूमिका पटवून देणे याला खूप महत्त्व आहे. पण अलीकडच्या काळात हा प्रकार लोप पावत चालला होता. केवळ निवडणुकांच्या काळात सभा घेण्याने पूर्ण राजकीय जागृती किंवा पक्षाचे वातावरण निर्माण करता येत नाही. त्यासाठी खूप आधीपासून आणि निवडणुका नसताना सभा घेण्याला अधिक महत्त्व असते. असा प्रयत्न दोन्ही कॉंग्रेसकडून होताना दिसत नव्हता. शिवसेनेच्या ठाकरे गटाने एकतर्फी पद्धतीने सुरू केलेल्या या झंझावाताच्या प्रभावाने दोन्ही कॉंग्रेसला महाविकास आघाडी म्हणून लोकांपुढे एकत्रित जाण्याची इच्छा झाली असावी. ते काही असो पण महाविकास आघाडी लोकांना एकत्रितपणे दिसणेही त्यांच्या दृष्टीने खूप आवश्यक होते. दोन्ही कॉंग्रेसकडेही सभा गाजवणारे वक्ते नाहीत. लोकांना आपली भूमिका ठसठसशीत आणि आक्रमक भाषेत पटवून देण्याविषयी त्यांच्यात फार स्वारस्यही या आधी दिसले नव्हते. केवळ पत्रकार परिषदा घेऊन ते भाजपच्या कारभाराविषयी टीकाटिप्पणी करण्यातच धन्यता मानत असत.
नव्या युगातील राजकारणाच्या काळात सोशल मीडिया किंवा एकूणच मीडिया प्रभावीपणे हाताळायला लागतो. समयसूचक आणि चपखल प्रतिक्रिया द्याव्या लागतात. हे कामही दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रभावीपणे होत असल्याचे जाणवले नाही. वेळ मारून नेण्यावरच या नेत्यांचा भर असे. कॉंग्रेसचे नेते तर अगदीच औपचारिक स्वरूपाची वक्तव्ये करीत असतात. त्यांना जादा आक्रमक बोलता येत नाही, हा बहुधा मूळ कॉंग्रेसच्या संयमी शैलीचा प्रभाव असावा. पण त्या तुलनेत शिवसेनेच्या मीडियाच्या बाजूचा किल्ला संजय राऊत हे एकतर्फी आणि प्रभावीपणे लढवताना दिसले. त्यामुळे प्रत्यक्ष जनतेत आणि मीडियातही ठाकरे गटाचा वरचष्मा निर्माण होताना दोन्ही कॉंग्रेसला त्यांच्यातील निष्क्रियतेची बोच लागून राहिली असावी. पण आता मात्र वज्रमूठ सभांच्या अनुषंगाने ही महाविकास आघाडी लोकांपुढे एकत्रितपणे जाणार आहे, त्याचा त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एकजूट लोकांपुढे प्रदर्शित करण्याची दोन्ही कॉंग्रेसच्या लोकांना इतक्या उशिरा कशी जाणीव झाली, असा प्रश्न उपस्थित होतो.
राज्यातील सत्ताधारी आक्रमक आहेत, ते साम, दाम, दंड, भेदाची सारी अस्त्रे वापरून विरोधकांना पुरून उरले आहेत. अशा स्थितीत त्यांच्यापुढे उभे राहण्यासाठी जी उमेद मनाशी बागळगण्याची गरज असते ती ठाकरे गटाने समर्थपणे प्रदर्शित केली आहे. दोन्ही कॉंग्रेसपेक्षा ठाकरे गटापुढील आव्हान वेगळे आहे. त्यांना पुनश्चः हरिओम करण्यापासून तयारी करावी लागत आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाने वज्रमूठ सभांच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतंत्र मोहिमाही सुरूच ठेवणे त्यांच्यासाठी अधिक लाभदायी ठरू शकते.