पुणे – पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हाताशी आलेले पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता प्रति एकर 50 हजार रुपये अनुदान द्यावे. तसेच ही नैसर्गिक आपत्ती असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील 22 हजार 400 हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला आहे. यंदा जिल्ह्यातील ऊस, कापुस, द्राक्ष, मका, सोयाबीन, कांदा, सोयाबीन या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्याकरिता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, शेतीपंपाची विद्युत बिले माफ करावीत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. शेतकऱ्यांना 2019-20 या रब्बी हंगामाकरिता बिनव्याजी 2 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, पंढरीनाथ सोंडकर, महादेव मातेरे, संजय चव्हाण, दिलीप शिंदे, विश्वास रसाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.