सांगली – देशाच्या इस्लामिक स्वारांनी महाराष्ट्राला मातीत घातलं. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामस्मरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण वारीमुळे कोरोना वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड असून हे सरकार हा थोतांड का वाढवत आहे हे कळत नाही, असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
या करोनामुळे आज देशात काय घडले असेल, तर लोकांमध्ये फक्त भीतीचे आणि घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती, तर देशात कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असे एकही उदाहरण मिळाले नसते. माझं मत आहे की कोरोना हे षड्यंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंढरपूरच्या वारीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या बाबतीत खरंतर वारकर्यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं असेही त्यांनी म्हटले.
“संभाजी भिडे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाज व्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहेत. आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे. मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने गुन्हा दाखल करून तात्काळ महाराष्ट्र राज्यातून तडीपार करावे”, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.