नवी दिल्ली – भारतातील लोक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 5-जी फोनची खरेदी करू लागले आहेत. अजून 5-जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू व्हायच्या आहेत. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत एकूण स्मार्टफोन विक्रीत 5-जी फोनचा वाटा वाढून 22 टक्के इतका झाला आहे.
मोबाईल फोन निर्मात्या कंपन्यांनी भारताच्या दृष्टीकोनातून हा फोन उपलब्ध करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. विविध कंपन्यांनी 5-जी क्षमतेचे तब्बल 20 फोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत. 5-जी फोन उपलब्ध करण्यामध्ये विवो, सॅमसंग या कंपन्यांचा मोठा वाटा आहे. एकूण 5-जी फोन विक्रीत विवो कंपनीचा वाटा 18 टक्के तर सॅमसंग कंपनीचा वाटा 16 टक्के आहे.
असे असले तरी आगामी तिमाहीमध्ये ग्राहकांना जेवढी गरज आहे तेवढे फोन उपलब्ध होऊ शकतील की नाही याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. कारण सेमीकंडक्टर चिप्ससह मोबाइलच्या अनेक सुट्या भागाची टंचाई काही कंपन्यांना जाणवत आहे. 5-जी फोनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कंपन्या फोनच्या किमती परवडणाऱ्या दरावर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
केंद्र सरकारने डिजिटल इंडिया ही मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना विविध सेवा मोबाईलच्या माध्यमातून घेता येतात. त्यामुळे आगामी काळात आपला फोन वेगवान आणि कार्यक्षम असावा असे भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय नागरिकांना वाटत आहे. दिवाळीमध्ये आणि दसऱ्यांमध्ये स्मार्टफोनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली.
आगामी काळामध्ये सुट्या भागाची टंचाई असली तरी भारतामध्ये फोनची विक्री वाढण्याची शक्यता मोबाईल कंपन्या गृहीत धरून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.