सातारा -कोकणातला हापूस आंबा यावेळी उशिराने आला. आल्यावरही तो सामान्यांना परवडणारा नव्हता. सध्याही कोकणातील हापूसचा दर न परवडणाराच असल्यामुळे व हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंबा 250 रूपये दराने विकला जात आहे.
कोकण पट्ट्यात उत्पादित मालांपैकी केवळ 30 टक्केच आंबा साताऱ्यात पोहचल्याने सातारकरांना हापूसची चव चाखताना मर्यादा पडल्या. साधारण दहा टनांची आवक एकदम चार टनांवर आल्याने हापूसचा गोडवा यंदा रंगला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मार्केटही अनेक दिवस बंद असल्याने आंबा बागायतदार अडचणीत आले.
सध्या कोल्हापूर, बेळगाव मार्केटमध्ये कोकणच्या हापूसबरोबरच कर्नाटकातील हापूस आल्याने कोकणच्या हापूसला मोठी झळ बसली आहे. साताऱ्याच्या मार्केटमध्येही कर्नाटक हापूस व रायवळ यांच्यात स्पर्धा सुरू आहे. साताऱ्यात दरवर्षी 15 टन आंब्याची आवक होते. हापूस उशिराने आला तरी पहिल्या काही दिवसांत व्यापाऱ्यांकडून पाच डझनाला 2000 ते 1500 रुपयांचा दर मिळत होता. त्यामुळे बागायतदार खूष होते. मात्र, काही दिवसांतच कोकणातल्या हापूसचा दर गडगडला. अडीच हजारांवरून तो 400 ते 700 वर येऊन पोहचला आहे.
दलालांकडून होते पिळवणूक
कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच अन्य काही ठिकाणच्या दलालांकडून बागायतदारांना एक दर सांगितला जातो आणि आंबा पाठविल्यानंतर दुसराच दर दिला जात आहे. या अडचणींचा परिणाम साताऱ्यात आंबा येताना त्याचे दर आणखीनच वाढतात. साधारण 5 जूनपर्यंत साताऱ्यात कर्नाटकी रायवळचा हंगाम चालतो. दलालांमुळे कोकण पट्टयातील बागायतदार अडचणीत आला आहे. दुसरं म्हणजे गावरानं कलमी आंबा यावेळी अजिबातचं पाहयला मिळाला नाही. परिणामी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात साताऱ्यात देवगडच्या नावाखाली आता कोणताही आंबा 250 ते 300 रुपये डझन दराने विकला जात आहे.