नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख 45 हजार 380 पार पोहोचला आहे. देशात मागील 24 तासांमध्ये 6535 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, लागोपाठ चार दिवस सर्वाधिक रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं आढळून आलं. तसेच मागील 24 तासांमध्ये 146 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4167 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हजार 491 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात 20 ते 25 मे दरम्यान, दररोज सरासरी 6200 रुग्ण समोर येत आहेत. जर कोरोना बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर 26 मे ते 1 जुलै दरम्यान, 36 दिवसांत जवळपास 2 लाख 23 हजार 200 नवे कोरोना बाधित रुग्ण समोर येऊ शकतात. जर 25 मेपर्यंतच्या कोरोना बाधितांच्या संख्येशी जर ही संख्या जोडली तर, 1 जुलैपर्यंत एकूण कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 62 हजार 45 वर पोहोचू शकते.
दरम्यान,देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रात काल 1 हजार 186 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 हजार 667 झाला आहे. त्यातील 15 हजार 786 बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 35 हजार 178 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मृतांचा आकडा 1695 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.97 टक्के आहे. मुंबईत 31 हजार 972 कोरोनाबाधित असून 026 बळी गेले आहेत.