समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – येथील संत शेख महंमद महाराज यांच्या पादुकांचा श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळा सुरू करण्याचा निर्णय श्रीगोंदेकरांनी घेतला आहे. या पालखी सोहळ्यामुळे सुफी संत शेख महमंद महाराज आणि पंढरीच्या विठुरायाची भेट होणार आहे. दि. 19 ते 27 जून या दरम्यान हा पालखी सोहळा निघणार आहे.
राज्यातील संतांच्या मांदियाळीत श्रीगोंद्याच्या शेख महंमद यांचे स्थान अतिशय उच्च आहे. अगदी पारंपारिक चरित्रकारांनी देखील शेख महंमद यांचा उल्लेख रामभक्त कबीराचा अवतार असा केल्याचे दाखले आहेत. 1550 ते 1650 हा शेख महंमद यांचा कालखंड मानला जातो. त्यांचा जन्म सन 1545 च्या सुमारास आजच्या बीड जिल्ह्यातील धारूर या गावी झाला होता. नंतर ते श्रीगोंद्यात स्थायीक झाले.
समाधिस्थ होईपर्यंत त्यांचे वास्तव्य श्रीगोंद्यातच राहिले. त्यांनी दहा ग्रंथ लिहीले आहेत. यापैकी आठ ग्रंथ प्रकाशित झाले तर दोन ग्रंथ अजूनही अप्रकाशित आहेत. योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे.संत शेख महंमद हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत आहेत. शेख महंमद आणि संत तुकाराम दोघांचेही दैवत पंढरी म्हणजे पांडूरंग आहे. पंढरीची मूर्ती काहींनी फोडल्याचा समज प्रसूत झाल्यानंतर शेख महंमद व्यथित झाल्याचे दाखले आहेत. यावेळी ते मुस्लिम आणि हिंदू या दोघानांही उपदेश करतात. तो विठ्ठल माझ्या अंतरात नांदतो आहे, हे सांगताना ते म्हणतात…
अनिवार पंढरी ।
अविनाश श्रीहरी ।
वाहीन अंतरी ।
व्यापुनी अलिप्त ।।
शिवाय, पांडूरंगाची शेख महंमद यांनी केलेले वर्णन हे पांडूरंग स्वरूपाविषयीच्या कल्पनेचे विस्तारित रूप आहे आणि त्यांनी ते खूप उत्कटतेने वर्णन केले आहे…
कटावरी कर । चंद्रभागा ठाणा ।
दावितसे खुणा । भावसिंधुच्या ।।
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसह संत परंपरेतील सर्वच संतांचे पंढरपूर पालखी सोहळे कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंढरीच्या पांडूरंगाची आणि शेख महंमद यांची भेट घडवून आणण्यासाठी 19 ते 27 जून या कालावधीत श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी यासाठी मोठे सहकार्य केले आहे. शेख महंमद यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनात मार्गदर्शन करण्यासाठी ते 12 जून रोजी श्रीगोंद्यात येणार आहेत.
हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक
संत शेख महंमद महाराज हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जातात. श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या आयोजनाच्या निर्णयातून श्रीगोंदेकरांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या वाटचालीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. श्रीगोंदेकरांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.