पुणे-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील तब्बल 1275 रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. यासाठी खुद्द मंत्रालयानेच पुढाकार घेतला आहे. या योजनेत पुण्यातील 11 स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. तर, योजनेत राज्यातील शंभरावर स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर स्थानकांची नावे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. यात पुण्यातील आकुर्डी, बारामती, चिंचवड, दौंड, देहू रोड, हडपसर, केडगाव, लोणावळा, पुणे जं., शिवाजीनगर पुणे, तळेगाव स्थानकांचा समावेश आहे. शिवाय सातारा, मिरज, कोल्हापूर, पंढरपूर, नगर, अजनी (नागपूर), छत्रपती संभाजीनगर, नाशिकरोड यांसह मुंबईतील प्रमुख स्थानकांचाही योजनेत समावेश आहे. या यादीत राज्यातील जवळपास शंभरपेक्षा जास्त स्थानकांची नावेही देण्यात आली आहेत.
या योजनेव्दारे प्रवाशांच्या सुविधा अंतर्गत स्टेशन अपग्रेडेशनची कामे केली जाणार आहेत. स्थानकांवर छताचे प्लाझा असतील, जे मॉल म्हणून विकसित केले जातील. जिथे रेल्वे प्रवाशांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील.
अशा मिळणार सुविधा
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत प्रवाशांना भविष्यात स्वच्छ, सोयीस्कर आणि सुरक्षित रेल्वे स्थानके पाहायला मिळतील. स्थानकांच्या विकासाची कल्पना दीर्घकालीन दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. या स्थानकांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. स्थानकाच्या छतावर किरकोळ वस्तू विक्री, कॅफेटेरिया, लहान मुलांसह प्रवाशांसाठी मनोरंजनाच्या सुविधा असतील. स्टेशन इमारतीचे स्कायलाइन डिझाइन 40-60 वर्षांसाठी तयार केले जाईल.