सोलापूर – देशभरातील भाविकांनी विठुरायाला अर्पण केलेल्या लहान-लहान सोन्या-चांदीच्या दागिन्यांना आता वितळविण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गेल्या 36 वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि अत्यंत जोखमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे श्रद्धेने अर्पण केलेले सोन्या-चांदीच्या वस्तू विटांच्या रूपात देवाच्या खजिन्यात कायमस्वरूपी राहणार आहेत.
गेली वर्षानुवर्षे गोरगरीब भाविकांनी अर्पण केलेले हे लहान दागिने देवाला वापरता येत नसल्यामुळे तसेच खजिन्यात ठेवण्यात आले होते. या लहान दागिन्यांमध्ये 28 किलो सोने आणि 996 किलो चांदीचे दागिने आहेत.
यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सध्या देवाकडे असलेल्या 28 किलो सोन्यापैकी 9 किलो सोन्याचे दागिने देवाला वापरता येण्यासारखे असल्यामुळे ते तसे ठेवले जाणार आहे. याशिवाय 19 किलो सोने वितळविण्यासाठी येणार आहेत. तसेच एकूण 996 किलो चांदीपैकी 571 किलो चांदीचा वापर देवासाठी केला जाणार असल्यामुळे 425 किलो चांदी मिळविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कार्तिकी यात्रेनंतर वितळविण्यात येणारे सोने आणि चांदीच्या दागिन्यातील दोरे, खडे, हिरे आणि मानके हे पाच जणांच्या समितीच्या देखरेखीखाली वेगळे केले जाणार आहेत. उरलेले सोने आणि चांदी यांचा विमा उतरवून मुंबई येथे वितळविण्यासाठी नेली जाणार आहेत. सुरुवातीला सर्व सोने आणि चांदी वितळवून त्याचे दोन-दोन सॅम्पल तुकडे बाजूला काढले जाऊन मग सर्व सोने-चांदीचे शुद्धीकरण केले जाणार आहे.
या दागिन्यांमधून निघणाऱ्या शुद्ध सोने आणि चांदीच्या विटा बनविण्यात येऊन त्या मंदिर समितीकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत.
पाच जणांची समिती
राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार औरंगाबाद येथील विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत तीन मंदिर समिती सदस्य आणि मंदिराचे कार्यकारी अधिकारी अशा पाच जणांची समितीच्या मार्गदर्शनाखाली हे सोने-चांदी वितळण्याचे काम मुंबई येथील केंद्र सरकारच्या रिफायनरीमध्ये केले जाणार आहे. राज्य सरकारने नेमलेले सहसचिव कऱ्हाळे यांना दहा दिवसांसाठी मंदिराकडे नियुक्त केले जाणार असल्यामुळे आता कार्तिकी यात्रेनंतर तातडीने ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे आता लाखो भाविकांनी श्रद्धेने विठुरायाला अर्पण केलेले सोन्या-चांदीच्या वस्तू विटांच्या रूपात देवाच्या खजिन्यात कायमस्वरूपी राहणार आहेत.