मसूर -उच्चांकी ऊस दर आणि बिनविरोध निवडणूक पॅटर्न राबविणाऱ्या राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील यशवंतनगर तालुका कराड येथील सह्याद्री कारखान्याने सन 2019-20 चा गळीत हंगाम करोना महामारीतही यशस्वी केला आहे. कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे. करोनामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, खातेप्रमुख, ऊसतोड मजूर सर्व वाहतूक संघटना आदींच्या अत्यंत काटेकोर नियोजनाने गळीत हंगाम यशस्वी केला असल्याचे ना. बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले.
ते म्हणाले, राज्यात करोनाचे संकट वाढल्यानंतर काही कारखाने सुरू होते. ते अडचणीत आले. परंतु, सह्याद्री साखर कारखाना अडचणीवर मात करत सुरू होता.नोंदणीकृत असलेला 21 हजार 859 हेक्टर ऊस व बिगर नोंदणीकृत ऊस 100 टक्के गाळप केला आहे. एकूण 152 दिवस गाळप हंगाम चालला यामध्ये 11 लाख 94 हजार 692 टन ऊसाचे गाळप झाले. त्यानुसार 14 लाख 83 हजार 600 साखर पोत्यांच्या उत्पादित झालेल्या साखरेला 12.42 इतका उतारा मिळाला.
देशामध्ये करोना महामारीमुळे महाराष्ट्र शासनाने 24 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन केले. त्यापूर्वी कारखान्याने 9 लाख 25 हजार 109 टन ्साचे गाळप झाले होते. 2 लाख 70 हजार हेक्टर ऊस शिल्लक राहिला होता. म्हणजे 25 टक्के ऊस राहिला होता. तोही कारखान्याने पूर्ण गाळप केला.
यावर्षी सर्वात जास्त ऊस वाहतूक करणारे मशीन मालक रवींद्र चव्हाण पेरले एकूण ऊस वाहतूक 18 हजार 151 प्रथम क्रमांक, किशोर जगदाळे मसूर 14 हजार 980 टन द्वितीय क्रमांक जयसिंग चव्हाण पेरले 14 हजार 871 टन तृतीय क्रमांक मिळवला.
ना. बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, सह्याद्री साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती केली. ना नफा ना तोटा तत्त्वावर ते वितरित करण्यात आले. राज्यात करोनाचे संकट वाढल्यानंतर सर्वत्र सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नफेखोरीला ऊधाण आले होते. सर्वसामान्यांची फसवणूक होणार नाही व त्यांना किफायतशीर दरात सॅनिटायझर उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने 43 साखर कारखान्यांना निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. यापुढे कायमस्वरूपी त्याची निर्मिती चालू राहणार असल्याचे ना. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.