राजेंद्र वारघडे
पाबळ -महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार डळमळीत करण्यासाठी भाजप जीवाचे रान करीत आहे. तसेच शरद पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. सुरूवातीला गृहमंत्रीपद नाकारणारे दिलीप वळसे पाटील यांनी ऐन धुम:चक्रीत गृहमंत्री पदावर आरूढ होत आपली किमया दाखवल्याने पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री आल्याची चर्चा सध्या शिरूर तालुक्यात सुरू झाली आहे.
सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये येवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसह महापालिका व लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हातघाईची लढाई सुरू झाली आहे. या लढाईत भाजपकडून केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून इतर पक्षांचे खच्चीकरण करण्याचे तर इतर पक्षांकडूनही राज्यातील तपास संस्थांच्या माध्यमातून भाजपच्या मन्सूब्याला प्रतिकार करण्याचे काम सुरू असल्याची बाब आता उघड झाली आहे. यामागे फडणवीसांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची गेलेली संधी,
ईडीचा वापर करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच गारद करण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न, पवारांमुळे कायमचा दूर गेलेला मित्रपक्ष, कॉंग्रेससह राष्ट्रवादीने समान कार्यक्रम आखून शिवसेनेला दिलेली सत्ता आणि टिकलेले सरकार ही कारणे आहेत. या घटनांतून महाराष्ट्र मिळवण्याची जागृत झालेली महत्वकांक्षा ही तितकीच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी साम, दाम हे पर्याय संपलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या शिलेदारांनी केंद्राच्या मदतीने दंड व भेदनीती वापरून सत्ताधाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला.
त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारीही कामाला लागले आणि धुमश्चक्री सुरू झाली असल्याचे दिसून
येत आहे. सुरूवातीला त्रिपक्षीय नेत्यांना झटका देताना राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार कुटुंबीयांवर सुरूवातीला विविध तपास संस्थांचा ससेमिरा लावण्यात आला. त्यानंतर अनेकांना जाळ्यात ओढण्यात आले. तरीही त्रिपक्षीय सरकार फुटत नाही, कोसळत नाही ही बाब अधोरेखित झाली. त्याचवेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आगमन ही बाब महत्वाची ठरली असल्याची चर्चा आहे.
…इतकी अस्वस्थता बरी नाही
विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उद्देशून एक इशारा दिला, तो म्हणजे, सत्ता गेली म्हणून इतकी अस्वस्थता बरी नाही.गृहमंत्री वळसे पाटील यांनी या वाक्याच्या माध्यमातून सूचक वक्तव्य केले. तसेच त्रिपक्षीय सरकार एकसंघ राहील याची खात्रीही दिली. शेवटी राजकारणात संयम महत्वाचा असतो. सत्तेचा मोह कामकाज बिघडवणार नाही ही भूमिका आणि अनुभव महत्वाचा असतो. सत्ता आली तरी आणि नसली तरी समाजाची नाळ भक्कम ठेवण्याचा संयम महत्वाचा असतो. हीच बाब सत्ताधारी पक्षासाठी सूचक आहे.