पुणे (प्रतिनिधी) – सराईत गुन्हेगाराच्या खूनानंतर समर्थकांनी त्याच्या अंत्यविधीला काढलेल्या दुचाकी रॅलीचा निष्काळजीपणा सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठांना भोवला आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार निष्काळजीपणा केल्याप्रकरणी प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह, गुन्हे पोलीस निरीक्षक आणी दोन पोलीस उपनिरीक्षकांची उचलबांगडी केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे बदली करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. स्वाती देसाई यांची सहकारगरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना कालावधीत पोलिस बंदोबस्त असताना संचारबंदीच्या कालावधीत सहकानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सराईताच्या अंत्ययात्रेला दुचाकी रॅलीचा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्वाना पैलावर घेतले होते. त्याशिवाय शहरातील सर्व पोलिस उपायुक्तांची तातडीने बैठक घेतली होती.
बिबवेवाडी परसिरातील सराईत माधव वाघाटेचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला शेकेडो समर्थकांनी दुचाकीची रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी 150 ते 200 जणांविरूद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी पथके स्थापन करून 104 पेक्षा अधिक जणांना अटक करून त्यांची रवानगी येरवाडा कारागृहात केली आहे.
ही रॅली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून असताना तेथे नाकाबंदी करत असलेल्या उपनिरीक्षकाने ती रोखली नाही तसेच वरिष्ठांना याची कल्पना दिली नाही म्हणून त्याचीही बदली करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हेत्रे व सहकारनगरचे केंजळे अशी बदली झालेल्यांची नावे आहेत.