पुणे ( प्रभात वृत्तसेवा ) – पुणे जिल्हा परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी “सागरसेतू’ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या पुढाकारातून “एसकेपी कॅम्पस’ (श्री खंडेराय प्रतिष्ठान), बालेवाडी येथे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरू असणारी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
बालगंधर्व रंग मंदिर येथे आज सायंकाळी झालेल्या कार्यक्रमातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी बालेवाडी येथील वूमन्स क्लब अध्यक्षा रूपाली बालवडकर यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
“सागरसेतू या उपक्रमाअंतर्गत 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये काय करावे, कुठले कोर्सेस केले पाहिजेत, त्याचबरोबर ते कोर्सेस करताना महाराष्ट्र शासनाचे कोर्सेस कोणते आहेत, केंद्र सरकारचे कोर्सेस कोणत आहेत, आणि कौशल्य विकास या सगळ्या गोष्टींबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर देखील भर दिला जाणार आहे.
याकरिता 1800-25-87131 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर ग्रामीण भागातील विद्यार्थी संपर्क करू शकतील. तज्ज्ञ शिक्षक त्यांना मार्गदर्शक करणार आहेत. त्या शाळेतील सर्व शिक्षकांचा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम “एसकेपी कॅम्पस’ या संस्थेत घेतला जाणार आहे. शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना संवाद साधताना अतिशय सुलभपणे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी नक्कीच मदत होईल,’ असा विश्वास डॉ. बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.
सागरसेतू उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सत्कारमूर्ती अनुराधा राजहंस, ज्योत्स्ना बडवे, राहूल गोळे, खॉंसाहेब फैय्याज हुसेन खान, अन्वर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश साखळकर यांनी बालगंधर्व यांच्या कार्याचा परिचय यावेळी करून दिला. तर, गणपतराव बालवडकर यांनी स्थापन केलेल्या खंडेराय प्रतिष्ठानची माहिती डॉ. सागर बालवडकर यांनी दिली.
कार्यक्रमाचे नियोजन सुरेश साखळकर, “संवाद’ पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे यांनी केले. कार्यक्रमास पुणे शहर आणि जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बकुळ पंडित, अस्मिता चिंचाळकर, रविंद्र कुलकर्णी यांनी कार्यक्रम सादर केला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दरमहा शिक्षकांसाठी देखील चर्चासत्र आयोजित करण्यात येतील. विद्यार्थ्यांतील विशेष गुणवत्ता ओळखून त्यांना करिअर गाइडन्स आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सगळ्याच बाबीने परिपूर्ण कौशल्य विकसित करणे, हा आमचा हेतू आहे. विद्यार्थ्यांसाठी व्हॅकेशन कोर्सेस घेऊन त्यांच्या कौशल्य गुणांची वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
डॉ. सागर गणपतराव बालवडकर
सचिव, श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, उपाध्यक्ष, पुणे शहर