फिल्मी जगतातली माणसं म्हटली की त्यांची सामान्य माणसांशी वागण्या-बोलण्याची वृत्ती बऱ्याचदा तुच्छतेची किंवा उदासीनतेची असते. म्हणजे कदाचित ते प्रत्यक्ष अपमानास्पद बोलतील असं नाही पण बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा तुम्ही किती क्षुद्र आहात असं अप्रत्यक्षपणे सांगतील. पण प्रचंड उकाड्यात एखादी थंडगार झुळूक यावी तशी आपलेपणानं वागणारी काही माणसं सिने-उद्योगातही आहेत. साधेसुधे सुधेंदु रॉय हे यापैकी एक. हा इतका मोठा माणूस माझ्याशी इतक्या आपलेपणानं वागला की मला त्या अलिप्त आणि उदासीन विश्वामध्ये एक सुखद धक्काच बसला.
खरं तर मी त्यांना 1992-93 दरम्यान दोन-तीनदाच भेटलो असेन. सुप्रसिद्ध सिने-ध्वनितंत्रज्ञ कुलदीप सूद यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. सूद काम करीत असलेल्या आनंद स्टुडिओला भेट दिल्यावर त्यांनीच मला मेहबूब स्टुडिओमध्ये नेलं आणि रॉयसाहेबांशी परिचय करून दिला. नंतर मी आणि सुधेंदु रॉय स्टुडिओबाहेर खुर्च्या टाकून चहा पीत गप्पा मारीत बसलो. तेव्हा मला कळलं की रॉयसाहेब केवळ कला दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शकच नाहीत तर एक मोठे कलाकार आणि लेखकही आहेत. सुजाता, बंदिनी, मधुमती यांसारख्या बिमल रॉय यांच्या गाजलेल्या चित्रपटांचं कला दिग्दर्शन केलेल्या या महान कलाकारानं अगदी सिलसिला या हिट चित्रपटाच्या यशातही कमालीचं योगदान दिलं. मधुमती, मेरे मेहबूब आणि सगिना या चित्रपटांमधील कलादिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. सूद यांनाही फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला असल्यानं या दोघांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचं आणि मायेचं मला विशेष कौतुक वाटे. याशिवाय उपहार आणि सौदागर या आणि आणखी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही रॉयसाहेबांनी केलेलं असल्यानं त्यांच्याकडे माहितीचा आणि अनुभवांचा खजिनाच होता.
स्वातंत्र्यपूर्व काळात आता बांगलादेश असलेल्या पाबना शहरात जन्म झालेले सुधेंदु रॉय हे पूर्णपणे स्वशिक्षित होते. तज्ज्ञ लोकांचं काम पाहून त्यांनी आपला कित्ता गिरवला. पण अल्पावधीतच ते स्वत:च तज्ज्ञ कलादिग्दर्शक बनले-इतके की बिमल रॉय या महान दिग्दर्शकांनी केवळ कला-दिग्दर्शनाचीच नव्हे तर पूर्ण चित्रपट नियोजन-आरेखन (प्रॉडक्शन डिझायनर) करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली. पराया धन आणि सौदागर या चित्रपटांचं लेखनही त्यांनी केलं यावरून सुधेंदु रॉय हे किती बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं हे दिसून येईल.
माझ्या लेखनाविषयी त्यांनी बरंच जाणून घेतलं. माझी षडयंत्र ही पहिली कादंबरी तेव्हा नुकतीच प्रसिद्ध झाली होती आणि 1992मध्ये प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत तिचा समावेशही झाला होता. त्यावर ते म्हणाले की माझं लेखन हे खरोखर दृक-श्राव्य (ऑडिओ-व्हिजुअल) माध्यमांसाठी चांगलं आहे. अर्थात पुढं अनेक प्रयत्नांनंतरही माझ्या पटकथा या ना त्या कारणांनी चित्रपटात रूपांतरित होऊ शकल्या नाहीत हा भाग अलाहिदा. मात्र रॉयबाबूंनी (आणि सूदनी सुद्धा) चित्रपटनिर्मितीतले बारकावे मला समजावून सांगितले-एवढंच नव्हे तर स्टुडिओत प्रत्यक्ष चित्रीकरण चालू असताना अनेक गोष्टी दाखविल्या.
सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे त्यांनी मला चित्रपटसृष्टीवर कादंबरी लिहिण्यास उद्युक्त केलं. माझा मनातला कादंबरीचा प्लॉट आणि त्यांनी सांगितलेले प्रसंग यांची सांगड घालून माझी दुसरी कादंबरी इये स्वप्नांचिये नगरी हिचा जन्म झाला. त्या कादंबरीतले काही प्रसंग हे रॉयबाबूंनी अनुभवलेले होते. स्टंट करणाऱ्या कलाकारांबद्दल चित्रपटसृष्टी किती उदासीन असते (निदान त्या काळी तरी होती) त्याचं एक उदाहरण म्हणजे वेगात असलेली मोटारगाडी पाण्यात पडते तेव्हा शेवटच्या क्षणी विरुद्ध बाजूचं दार उघडून चालक बाहेर उडी मारतो. हा जरी स्टंट चित्रीकरणाचा भाग असला तरी शॉटचं चित्रीकरण होताच स्टंटबाज सुखरूप आहे की नाही हे न पाहिल्यानं स्टंटबाजांना प्राणाला मुकावं लागलं आहे हे रॉयसाहेबांनी सांगितल्यावर माझ्या जीवाचा थरकाप उडाला होता. क्रेनवरील कॅमेऱ्याचा डोलारा न सांभाळता आल्यानं झालेले अपघात असे कितीतरी प्रसंग मला रॉयबाबूंनी सांगून चित्रविश्वाची काळी बाजूही उलगडून दाखवली.
आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे बोलता-बोलता तेव्हा काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या अग्निपथ या चित्रपटाबद्दल ते सांगत होते. तुम्ही पाहिलाय ना हा चित्रपट? असं त्यांनी मला सहजपणे विचारलं. मी तो चित्रपट पाहिलेला नसल्यानं काहीसं शरमून नाही असं उत्तर दिल्यावर ते थोडेतरी नाराज होतील असं मला वाटलं. परंतु त्यात काहीच वावगं नसल्याचं दाखवून त्यांनी त्या चित्रपटासाठी एक संपूर्ण खेडंच गोव्यात का कुठंतरी कसं उभारलं होतं त्याची हृद्य कहाणी मला सांगितली. मला मात्र या प्रसंगाची आजही आठवण झाली की संकोचल्यासारखं होतं एवढं मात्र खरं.
काही कारणांनी माझा चित्रपटसृष्टीशी असलेला संबंध संपुष्टात आला पण त्या जगतातील सुधेंदु रॉय आणि कुलदीप सूद यांच्यासारख्या साध्यासुध्या माणसांनी माझं लेखनसर्जन समृद्ध केलं यात शंका नाही. दुर्दैवानं माझा आणि रॉयबाबूंचा परिचय झाल्यानंतर काही वर्षांतच म्हणजे 1999मध्ये ते कालवश झाले. त्यामुळे इच्छा असूनही मला त्यांच्याशी संवाद चालू ठेवता आला नाही. जवळपास सत्तर चित्रपटांचं कलादिग्दर्शन आणि अर्धा डझन चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले हे माझे स्नेही मला मात्र बरंच काही देऊन गेले.
श्रीनिवास शारंगपाणी