पुणे – दूध दर वाढीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे (Rayat kranti sanghatana) अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau khot) हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. खोत यांनी पुण्यात कावड मोर्चा काढला. या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पुण्यातील लाल महालातून या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Pune protest)
येत्या पंधरा दिवसात सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्याबाबतचा निर्णय घेतला नाही तर आगामी काळात दूध उत्पादक, शेतकरी, शेतमजूर हा आपल्या जनावरांसह रस्त्यावर उतरून जक्काजाम आंदोलन करेल असा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला. (Sadabhau khot protest in pune)
महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहकालाही लुटलं जातंय आणि शेतकऱ्यालाही लुटलं जातंय. असाच प्रसंग काही वर्षांपूर्वी उध्दभवला होता त्यावेळेसच्या मुख्यमंत्री फडणवीसांनी पाच रुपयांचे अनुदान दिले होते अशी आठवण देखील खोत यांनी यावेळी करून दिली.
आता देखील उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं आणि २०१८ प्रमाणे निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल अशी मागणी देखील सदाभाऊंनी डिजिटल प्रभाताशी बोलताना केली.