मुंबई – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पोलीस अधिकारी सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ही नाव चर्चेत आली आहे. १०० कोटी वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्री देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात आता अनिल देशमुख यांचे वकील शैलेश घुमारे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून झालेले आरोप आणि त्यांची होत असलेली चौकशी यामध्ये काहीही तथ्य नाही. पण शेवटी न्यायालयात काय होईल तेच खरं, असं अनिल देशमुख यांचे वकील घुमारे यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेंनी कधीच अनिल देशमुख यांच नाव घेतलं नव्हतं, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ऍड. घुमारे म्हणाले की, मुळात सचिन वाझे यांना पोलिस दलात परमबीर सिंह यांनी घेतलं होतं. तसेच सचिन वाझेने देखील नंबर एकचे साहेब म्हणून ज्यांच नाव घेतलं ते अनिल देशमुख नव्हे तर परमबीर सिंह होते, असही घुमारे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान सचिन वाझेने चांदिवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात सचिन वाझे याने फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुखांना भेटलो असं म्हटलं नाही. तसेच देशमुखांना पैसे दिले असंही काही नमूद केलेलं नाही. वाझेने फेब्रुवारीत अनिल देशमुखांची भेट घेतली होती, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.
एकंदरीत एकूण सीबीआय आणि ईडीच्या स्टेटमेंटवर शंका उपस्थित होत आहे. ईडीसमोर दबावामुळं काही स्टेटमेंट वाझेने दिलेलं असू शकतं, असंही घुमारे यांनी नमूद केलं.