(ज्ञानेश्वर फड)
भागवतबुवा कराडकर दिंडी
भागवतबुवा कराडकर दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा रथापुढे दहाव्या क्रमांकावर चालणारी दिंडी आहे. ह.भ.प. भागवतबुवा कराडकर यांनी या दिंडीची सुरुवात केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात कराडकर दिंडी चालत होती. कालांतराने दोन्ही संतांचे पालखी सोहळे विभागले गेले. 1832 मध्ये श्री हैबतबाबा यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरु केला. या सोहळ्यात भागवतबुवा कराडकर यांना रथापुढे दहाव्या क्रमांकावर दिंडी चालण्याचा मान मिळाला. भागवतबुवा कराडकर यांच्यानंतर सुंदराबाई भागवतबुवा कराडकर, जनाबाई कृष्णराव जाधव कराडकर, अरूण कृष्णराव जाधव कराडकर, नंदा अरूण कराडकर यांनी दिंडीची परंपरा चालवली. सध्या ह.भ.प. गणेश महाराज कराडकर हे दिंडीमालकाची जबाबदारी सांभाळत आहेत. तरडगाव मुक्कामी माऊलींच्या पालखी तळावर जागराच्या सेवेचा मान भागवतबुवा कराडकर दिंडीकडे आहे. या जागर सेवेला घराण्याचे मुळ पुरुष श्री केदारबाबा कराडकर यांचे नाव देण्यात आले आहे. या दिंडीत चारशे ते पाचशे वारकरी चालतात. त्यात प्रामुख्याने कराड, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, कर्नाटक, बिदर या भागतील वारकऱ्यांचा समावेश असतो.
रोकडोबादादा दिंडी
रोकडोबादादा दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा रथापुढे वीसाव्या क्रमांकावर चालणारी दिंडी आहे. या दिंडीची सुरुवात 1934 च्या दरम्यान रोकडोबादादा यांनी केली. त्यांच्यानंतर मुरलीधर नारायण मामडे, निवृत्ती शंकर मुंगसे गुरुजी यांनी दिंडीची परंपरा चालवली. सध्या श्री दिपक महादेव मुंगसे (प्राचार्य, ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी) हे दिंडी प्रमुखाची जबाबदारी सांभाळत आहेत. माऊलींच्या सोहळ्यात सासवड येथे जागराच्या सेवेचा मान रोकडोबादादा दिंडीकडे आहे. तसेच आषाढी वारीनंतर माऊलींची पालखी आळंदीकडे (परतवारी) येताना दररोज माऊलींच्या पालखीपुढे नित्य भजनाची सेवा रोकडोबादादा दिंडीची असते. या दिंडीत दोनशेहून अधिक वारकरी चालतात. त्यात प्रामुख्याने रासे व परिसर, पुणे, सुगाव (लातूर), नांदेड या भागातील वारकऱ्यांचा समावेश असतो. दिंडीतील ज्येष्ठ वारकरी यशवंतमामा यांनी पन्नास वर्ष दरमहिण्याची आळंदी-पंढरपूर पायी वारी केली आहे. श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री क्षेत्र आळंदी येथे रोकडोबादादा यांचा मठ आहे. पंढरपूर, आळंदी, देहू, भामचंद्र डोंगर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतो.