S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे जगभरात भारताची वाढती जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे. भारतीय विचार केंद्र (BVK) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संलग्न संस्थेने आयोजित केलेल्या तिसऱ्या पी परमेश्वरन स्मृती व्याख्यानाला संबोधित करताना ते म्हणाले की, ज्याप्रमाणे रामायणात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची जोडी होती, त्याचप्रमाणे प्रत्येक देशाला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मजबूत मैत्रीचा हात शोधण्याची गरज आहे. असे म्हणत त्यांनी आपल्या शेजारील देशाला खास संदेश दिला.
कार्यक्रमात पुढे बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी, “वेगाने विकसित होत असलेल्या भारताने जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे. त्यासोबतच आपण आपला इतिहास, आपली सभ्यता विसरून चालणार नाही कारण या गोष्टी आपल्याला जगापासून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करतात.
तसेच सामरिक, आर्थिक आणि वैज्ञानिक आघाडीवर झपाट्याने विकसित होत असलेल्या भारताच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या सुरक्षेचा संदर्भ देत एस जयशंकर म्हणाले की, सध्याच्या काळात भारताची बदलती जागतिक परिस्थिती महत्त्वाची आहे. कारण आज भारताच्या शेजारील देशांना अधिक सुरक्षित वाटते आणि त्यांचा भारताप्रती विश्वास अन् आदर वाढला आहे. जागतिक महामारी कोरोनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, त्यावेळीही जगाने भारतावर हाच विश्वास पाहिला होता.
जागतिक स्तरावर अनेक आघाड्यांवर भारतालाही कसोटीचा सामना करावा लागला आहे असे म्हणत जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणाचा संदर्भ दिला आणि सांगितले की, “परशुरामाने प्रभू रामाची जशी परीक्षा घेतली होती तशीच सर्व देशांनी आपल्या शेजारील देशांची परीक्षा घेतली पाहिजे. ते म्हणाले की जेव्हा देश विकसित होतात तेव्हा त्यांच्या बाबतीत असेच घडते. आपल्याच देशाविषयी बोलताना आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे आपण ही खडतर परीक्षा पास केली. अणुचाचणी करून आपण दुसरी चाचणी पास केली. परशुरामाने ज्या प्रकारे रामाची परीक्षा घेतली तशीच आपल्यालाही रामासारखी परीक्षा द्यावी लागेल.”असे त्यांनी यावेळी म्हटले.