नुकताच नव्या पिढीशी संबंधित एक अहवाल अतिशय चिंताजनक आहे. गॅलप आणि वॉल्टन फॅमिली फाउंडेशनच्या अहवालात असे म्हटले आहे की आताची “जेन जी’ एकाकीपणाच्या भयंकर काळातून जात आहे आणि एकटेपणा जाणवत आहे. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्यांना “जेन जी’ म्हणतात. या पिढीला मागील पिढ्यांच्या तुलनेत अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. असे असूनही, ती तणाव, चिंता आणि नैराश्यात बुडलेली आहे. यामागचे कारण म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडिया. प्रिंस्टन विद्यापीठाच्या मनोविज्ञान विभागाचे डेटा सायंटिस्ट क्रिस सैय्यद यांनी इंटरनेट मीडिया किशोवयीन मुलांच्या सामाजिक जीवनावर अण्वस्रांसारखा हल्ला करत आहे असे म्हटले आहे. या नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करुन नवतंत्रज्ञानाच्या आभासी जगातून बाहेर आणण्याची गरज आहे.
आजची तरुण पिढी किशोरवयात अपेक्षेपेक्षा अधिक सधन आणि संपन्न असली तरी त्यांना तणाव, चिंता आणि नैराश्याने ग्रासले आहे, हे देखील तितकेच वास्तव आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांची धावपळ सुरू असताना कळत नकळतपणे पाल्यांकडे होणारे दुर्लक्ष हे निकोप समाजासाठी घातक ठरत आहे. इंटरनेट मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या नव्या पिढीला बाहेर काढण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. नव्या पिढीशी संबंधित अलिकडेच जाहीर झालेला एक अहवाल यासंदर्भातील चिंता वाढवणारा आहे. “गॅलप आणि वाल्टन फॅमिली फाउंडेशन’च्या एका अहवालात आजची “जेन जी’ (ूशप ू) एकाकीपणाच्या भयावह काळातून वाटचाल करत असून बहुतांश तरुण स्वत:ला एकटे समजत आहेत, असे म्हटले आहे. 1997 ते 2012 या काळात जन्मलेल्या पिढीला “जेन जी’ असे संबोधले जाते. त्यांच्यात वाढत चाललेला एकटेपणाचा हा प्रवाह पालकांच्या चिंतेत भर टाकणारा आहे. वास्तविक पाहता, ही पिढी मागच्या पिढीच्या तुलनेत अनेक पटींनी सुविधासंपन्न आहे. असे असतानाही तणाव, चिंता, नैराश्यात ती अडकत चालली आहे.
जगभरातील अन्य अभ्यास देखील या पिढीचा असाच प्रवाह दर्शवत आहेत. खेदाची बाब म्हणजे अशा प्रकारचे ट्रेंड दिसत असताना आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून वारंवार इशारा दिला जात असतानाही त्यावर फारशा गांभीर्याने चर्चा होताना दिसून येत नाही. पाल्यांच्या, किशोरवयीन मुलांच्या मानसिक वेदनांकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याचे आढळून येत आहे. विशेषत: भारताच्या बाबतीत विचार केला तर मानसिक त्रासाला क्षणभंगूर तणाव किंवा नैराश्य मानले तरी अशी भावना वेळीच समजून घेतली नाही आणि त्यावर उपचार केला गेला नाही तर त्याचे दुष्परिणाम भयानक राहू शकतात.
“गॅलप आणि वाल्टन फॅमिली फाउंडेशन’ने केलेला अभ्यास हा समाजात दीर्घकाळापासून असलेल एक मिथक तोडण्याचे काम करणारा आहे. हे मिथक म्हणजे आर्थिक संपन्नता हा आनंद आणि समाधानाला पर्याय आहे. वास्तविकपणे समाजाने स्वत:ला भौतिकवादात गुंतवून ठेवले आहे. पण त्यातून एकाकीपणाशिवाय हाती काहीच लागत नाहीये. कमी वेळेत अधिक मिळवण्याची लालसा माणसाला कधी मशिन किंवा यंत्रवत बनवते हे बुद्धिमान मर्त्यमानवालाही कळत नाही. अंत नसलेल्या धावपळीदरम्यान सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याचा काळ हा पैसे कमावण्यासाठी व्यतित होत असल्याने तरुणांना एकाकीपणा ग्रासू लागला आहे. किंबहुना, या एकाकीपणाची निवड करण्याची अपरिहार्यता त्यांच्यापुढे येत आहे. “डोन्ट डिस्टर्ब’मधूनच एकाकीपणाचा जन्म होतो.
अंतर्गत भावना जोपासण्यासाठी मानवी संबंध आवश्यक आहे, याचाही विचार केला जात नाही. अशारितीने सत्याची होणारी अवहेलना ही तरुणांत एकाकीपणांची भावना वाढण्यास मदत करते. अशावेळी त्यांची हतबलता, नैराश्य आणि अपयश पाहण्यासाठी कोणतेही नातेसंबंध आजूबाजूला राहिलेले नसतात. मग हा मानसिक त्रास त्यांना नैराश्याकडे ढकलणारा ठरतो. या तरुणांत अशा मुलांचा गट देखील सामील आहे की जे अजूनही पैसा कमाविण्याच्या शर्यतीत सामील झालेले नाहीत. परंतु मैत्री आणि नातेसंबंध हे शब्द त्यांच्या डिक्शनरीतून हद्दपार झाले आहेत. त्याजागी इंटरनेट मीडिया नावाचे सगे, सोयरे आणि सखे सोबतीच्या रुपातून त्यांना पर्याय देत आहेत. प्रचंड झगमगाटाने आणि बुद्धिमत्तेने भरलेली दुनिया ही “जेन जी’ पिढीला खूपच भावलेली दिसते.
प्रिन्स्टन विद्यापीठाच्या मानसोपचार विभागाचे डेटा शास्त्रज्ञ क्रिस सैय्यद म्हणतात, इंटरनेट मीडिया हा तरुणांच्या सामाजिक जीवनावर अणुबॉम्बप्रमाणे हल्ला करणारा आहे. सैय्यद यांच्या मताकडे अतिशयोक्ती म्हणून पाहून दुर्लक्षिता येणार नाही. कारण गेल्या काही दशकांत माहिती-तंत्रज्ञान व दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. तथापि या क्रांतीने इंटरनेट
मीडियाप्रमाणे सामाजिक संबंधावर आघात केलेला नव्हता. तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होत असलेल्या विपरित परिणामाबाबत बोलताना माध्यम मानसोपचारतज्ज्ञ डॉन ग्रांट यांनी कम्पेअर अँड डिसऍपियर (तुलना आणि निराशा) अशा शब्दांचा वापर केला. ग्रांट म्हणतात, इंटरनेट मीडियावर तरुणांचा बहुतांश वेळ हा समवयस्क मुलांचे जीवन आणि प्रतिमांचे आकलन करण्यात जातो आणि त्यानुसार स्वत:ची तुलना केली जाते. या प्रक्रियेत ज्या मुलांना आपले व्यक्तिमत्त्व, बाह्य रंगरुप तसेच आर्थिक स्तर कमी असल्याचे वाटते त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागते, त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. त्यातून त्यांच्यात न्यूनगंड वाढतो आणि त्यातूनच अनेकदा आत्महत्या करण्याचे विचारही मनात येऊ लागतात.
वास्तविक जगापासून दूर नेणारी ही छद्म दुनिया किंवा आभासी जग तरुणांसाठी एखाद्या स्वप्नलोकाप्रमाणे असते. ही जेन जी या आभासी विश्वात केवळ आपला आनंद शोधत नाही तर तेथे स्वतःचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न देखील करतात. काल्पनिक विश्वातील हे जग अतिधोकादायक आहे, परंतु या जगात त्यांना ढकलण्यास काही अंशी आपणच जबाबदार आहोत, असा विचार करण्याचे धाडस कोणी करत नाही. आपली व्यग्रता, व्यस्तता, आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठीची धडपड, रोजची भागमभाग यात गुरफटताना आपणच लहान मुलांच्या हाती स्मार्टफोन ठेवतो. हाच स्मार्टफोन पालकांच्या ममतारुपी स्पर्शाला पर्याय कधी होतो, याचा थांगपत्ताही लागत नाही. त्यामुळे आपण या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला हवा आणि आपल्या आकांक्षा काही प्रमाणात बाजूला ठेवून मुलांना वेळ द्यायला हवा. त्यांच्या भावना, अडचणी, नैराश्य याचे आकलन करत त्यांना मानसिक आणि भावनिक भक्कमपणा द्यायला हवा. अन्यथा ही मंडळी बुद्धिमान जगाच्या (इंटेलिजंट वर्ल्ड) जाळ्यात अडकत जाईल.
– डॉ. ऋतू सारस्वत