हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव आहे. याचा फायदा पाकिस्तानला घ्यायचा आहे. हे साध्य करण्यासाठी “आयएसआय’ या गुप्तचर संस्थेने जगभरातील शीख बहुल भागात भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. पाकिस्तान, ब्रिटन आणि कॅनडात खलिस्तान समर्थकांना बळ दिले जात आहे. कॅनडातच खलिस्तानविरोधी चळवळ का वाढत आहे आणि कॅनडा पाकिस्तानच्या वाटेवरून चालला आहे का?
भारतात खलिस्तानचे समर्थक फारसे उरलेले नाहीत. बहुसंख्य शीख खलिस्तान आणि दहशतवादाच्या विरोधात आहे; परंतु भारतात दहशतवादी गुन्हे करून कॅनडात स्थायिक झालेले खलिस्तान समर्थनार्थ चळवळ चालवितात. काश्मीरमधील पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा भारताने बीमोड केला असताना पाकिस्तानने पुन्हा पंजाबातील फुटीरतावाद्यांना मदत करण्याचे ठरविलेले दिसते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा “आयएसआय’ने जगभरातील शीख बहुल भागात भारतविरोधी वातावरण तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेला “के’ असे नाव देण्यात आले आहे. ‘के’ म्हणजे खलिस्तान. कटाचा एक भाग म्हणून त्याने कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या शीख बहुल भागात आपले एजंट सक्रिय केले आहेत. या माध्यमातून “शीख फॉर जस्टिस’ ही संघटना खलिस्तानी दहशतवाद्यांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत करीत आहे.
याशिवाय विविध देशांतील भारतीय दूतावासांवर हल्ले करण्यासाठी आणि निदर्शने करण्यासाठी दहशतवाद्यांना चिथावणी देत आहे. पाकिस्तानमध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा आणि कॅनडात त्याच्या मदतीने खलिस्तानी चळवळ चालविणारा दहशतवादी पन्नू यांच्यामार्फत आयएसआयने गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संपर्क साधला होता.
यामध्ये गुंडाला शस्त्रांच्या तस्करीत मदत करण्याची ऑफर देण्यात आली होती. त्या बदल्यात कॅनडाला निधी द्यायचा होता. बिश्नोई टोळीमार्फत ही शस्त्रे काश्मिरी दहशतवाद्यांपर्यंत पोहचविण्याबाबत रिंदा याच्याशी चर्चा झाली होती. लॉरेन्स गॅंगने 2018 ते 2022 दरम्यान दहशतवादी पन्नू व त्याचा साथीदार मृत निज्जर यांना कॅनडामध्ये 15 वेळा कोट्यवधी रुपये पाठवले होते.
पंजाबमधून पैसे पाठवणारे हे पर्यटक म्हणून थायलंडला जात असत. तेथे “अर्श डल्ला’च्या पोरांना पैसे दिले गेले. खलिस्तानी कारवायांसाठी दहशतवादी फंडिंगचा मोठा भाग भारतातून जात आहे. सध्या पाकिस्तानात लपलेल्या करणवीरसिंग विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. खलिस्तानी दहशतवादी करणवीरसिंग यांच्याविरोधात भारताने इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. करणवीर हा मूळचा कपूरथलाचा असून तो बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानात लपून बसला असून बब्बर खालसाशी संबंधित आहे.
त्याच्यावर गुन्हेगारी कट, हत्या, शस्त्र कायदा, दहशतवादी कृत्य असे गुन्हे दाखल आहेत. एका माजी नाझी सैनिकाला “हाउस ऑफ कॉमन्स’ या कॅनडाच्या संसदेत सन्मानित केले. नंतर स्पीकरकडून माफीनामा देण्यात आला. नंतर त्यांनी पदाचा राजीनामा देखील दिला. कॅनडातील भारतीय मिशन आणि मुत्सद्दींच्या भौतिक सुरक्षेसाठी खलिस्तानवाद्यांकडून उघड धमक्या ही अतिशय गंभीर घटना आहे. गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झालेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की कॅनडातून चालवल्या जात असलेल्या खंडणी रॅकेटमुळे पंजाबचे मोठे नुकसान होत आहे.
कॅनडास्थित गुंड ड्रोनद्वारे पाकिस्तानातून ड्रग्ज आणतात आणि पंजाबमध्ये विकतात. या पैशाचा एक भाग कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांना जातो. गेल्या काही वर्षांत, खलिस्तानी अतिरेकी अधिक शिरजोर आले आहेत. त्यांनी कॅनडातून न घाबरता काम करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दशकात पंजाबमधून नोंदवलेल्या दहशतवादी प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणांचे कॅनडास्थित खलिस्तानीशी संबंध आहेत. कॅनडामध्येही अनेक खलिस्तानी ड्रग्सच्या व्यापारात सक्रिय आहेत. भारत समर्थक शीख नेते रिपुदमनसिंग मलिक यांची 2022 मध्ये सरे येथे हत्या झाली. या हत्येचा कट हरदीपसिंग निज्जरने रचला होता; परंतु कॅनडाच्या एजन्सींनी यामागील खरे लोक शोधण्यात आणि खरा कट उघड करण्यात कोणतीही तत्परता दाखवली नाही.
या प्रकरणात भारतीय वंशाचे नसलेल्या केवळ दोन स्थानिक गुन्हेगारांवर आरोप ठेवण्यात आले होते. अहवालानुसार, 2016 नंतर पंजाबमध्ये शीख, हिंदू आणि ख्रिश्चनांच्या ठरवून केलेल्या हत्यामागे निज्जर आणि त्याच्या साथीदारांचा हात होता; परंतु कॅनडाच्या एजन्सींनी निज्जर आणि त्याचे मित्र भगतसिंग ब्रार, पेरी दुलाई, अर्श डल्ला, लखबीर आणि लांडा यांना अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध कधीही तपास सुरू केला गेला नाही. खलिस्तानी अतिरेकी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’, ‘राजकीय वकिली’ इत्यादी कल्पनांच्या नावाखाली कॅनडाच्या भूमीतून जवळपास 50 वर्षांपासून स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. 1985 मध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी केलेला कनिष्क बॉम्बस्फोट हा सर्वात मोठा होता.
कॅनडाच्या एजन्सींच्या हलगर्जीपणामुळे तलविंदर सिंग परमार आणि त्याचा खलिस्तानी अतिरेकी गट निर्दोष सुटला. तोच तलविंदर सिंग परमार आता कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांचा म्होरक्या आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ने त्यांच्या प्रचार केंद्राचे नाव त्याच्या नावावर ठेवले आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये तणाव आला आहे. कॅनडा सरकारने निज्जरच्या हत्येचा आरोप भारत सरकारच्या तपास यंत्रणांवर केला आहे आणि एका मुत्सद्दी व्यक्तीची हकालपट्टी केली आहे. त्याच वेळी, भारताने कॅनडात भारतीय व्हिसावर तात्पुरती बंदी घातली आणि भारतातील कॅनडाच्या दूतावासातील एका अधिकाऱ्याला देश सोडण्यास सांगितले. अशा परिस्थितीत भारताविरोधात आवाज उठवणाऱ्यांसाठी कॅनडा हे आवडते ठिकाण का बनत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, कॅनडातील हरदीपसिंग निज्जर, इतर खलिस्तानी मोनिंदर सिंग बुआल, परमिंदर पगली, भगतसिंग ब्रार यांच्यासोबत आपला खलिस्तानी अजेंडा चालवतात. हा अजेंडा तेथे चालविण्यासाठी त्यांना शीख तरुणांची गरज असते. ही कमतरता मानवी तस्करी द्वारे भरून काढली जात आहे, ज्याला हे लोक “फूट सोल्जर’ म्हणतात. आपला खलिस्तानी अजेंडा पूर्ण करण्यासाठी हे लोक पंजाबमधील लोकांना कॅनडामध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावितात आणि त्यांच्यासाठी व्हिसा प्रायोजित करतात. याला “डिमांड अँड सप्लाय’ असे नाव देण्यात आले, म्हणजेच कॅनडामध्ये गुरुद्वारामध्ये काम करण्यासाठी प्लंबर, ट्रक ड्रायव्हर, सेवेदार, शिक्षक यांची सतत गरज भासते आणि या बहाण्याने ते या सर्वांना बोलावतात.
या खलिस्तानींनी कॅनडातील जवळपास सर्वच मोठे गुरुद्वारा ताब्यात घेतले आहेत. मुलांना कॅनडामध्ये बोलाविल्यानंतर ते त्यांचा भारतविरोधी कारवायांमध्ये वापर करतात. ज्यामध्ये भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करणे आणि खलिस्तानी अजेंडा पसरवणे आदींचा समावेश असतो. काही राजकीय पक्षही त्यांना या कामात मदत करतात. जेणेकरून या लोकांना कॅनडामध्ये आश्रय मिळू शकेल. या कामासाठी ते दोन ते पाच लाख रुपये घेतात. याशिवाय कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या मुलांनाही हे लोक टार्गेट करतात. तेथं जाणारी मुले शिकून तेथे नोकरी शोधतात; पण प्रत्येकाला चांगली नोकरी मिळतेच असे नाही. याचा फायदा हे खलिस्तानी घेतात.
छोटी छोटी कामे करून त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करतात. याचे उदाहरण म्हणजे जेव्हा “शीख फॉर जस्टिस’चा दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नून पंजाबमध्ये खलिस्तानी सार्वमतासाठी सतत आंदोलन करत होता व ऑनलाइन मोहीम चालवत होता, तेव्हा त्याला कॅनडात पाठिंबा देण्यासाठी लोक मिळत नव्हते. त्यानंतर हरदीपसिंग निज्जर यांनी या “फूट सोल्जर’च्या माध्यमातून खलिस्तानच्या मागणीला जनता पाठिंबा देत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व शक्य झाले कारण निज्जर आणि त्याच्या लोकांचे कॅनडातील 30हून अधिक गुरुद्वारांवर नियंत्रण आहे. ज्यामध्ये सरे, ब्रॅम्प्टन, एडमंटन या शहरांचा समावेश आहे. इतकेच नाही तर कॅनडात बसलेल्या या खलिस्तानींनी पंजाबच्या दहशतवाद्यांना कॅनडात बोलावून आपल्या खलिस्तानी अजेंड्यात समाविष्ट केले.
गुंड टोळीतील बदमाश आणि अर्श दलाला सोबत घेऊन कॅनडाला बोलावून त्यांच्यामार्फत पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले. हेच कारण आहे की 2016नंतर पंजाबमध्ये अचानक दहशतवादी हल्ले वाढले. या सगळ्यामागे निज्जर, अर्श दल आणि लखबीर सिंग लांडा आहे. कॅनडात बसून हे लोक सातत्याने भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले असून याबाबतची माहिती कॅनडाच्या सरकारला सातत्याने दिली जात होती. त्यानंतरही कॅनडाच्या सरकारने या दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, उलट ते त्यांच्यासाठी केवळ राजकीय कार्यकर्ते राहिले. हे लोक कॅनडामध्ये बसून सतत पैसे उकळत होते आणि पाकिस्तानच्या माध्यमातून भारतातील पंजाबमध्ये ड्रग रॅकेट चालवत होते. यातून मिळणारे उत्पन्न हवालाद्वारे कॅनडाला पाठवून ते आपला खलिस्तानी अजेंडा राबविण्यात मग्न होते.
याशिवाय कॅनडात सतत टोळीयुद्ध सुरू होते आणि तेथे भारताला पाठिंबा देणाऱ्या सर्व शीखांना सातत्याने लक्ष्य केले जात होते. ज्यामध्ये 2022 मध्ये रिपुदमनसिंह यांच्या हत्येचाही समावेश आहे; पण कॅनडा सरकारला या हत्येचा तपास करणे आवश्यक वाटले नाही. यामुळेच या खलिस्तानींनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांना आणि तेथे काम करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना आता धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.या सर्वांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कॅनडा सरकारची मेहेरनजर आहे.कॅनडा सरकार हे पाकच्या पावलावर पाऊल ठेवून वागताना दिसत आहे.
आरिफ शेख