निर्बंधमुक्त गोविंदा उत्साहात साजरा झाला. गणेशोत्सवही असाच जल्लोषात साजरा व्हावा. उत्सव उत्साहात साजरा व्हावा अशी निर्बंधे उठवताना सरकारची इच्छा होती, त्याला अशा आक्षेपार्ह आणि किळस वाटावी अशा वर्तनाने गालबोट लागावे हे अपेक्षित नव्हते. यापैकी काही गोविंदा सरकारी सेवेत दाखल होणार आहेत, त्यामुळे त्यांनी योग्य भाषा वापरण्याची सवय केलेली बरी!
ज्या मराठी भाषेचा आपल्याला जाज्वल्य असा अभिमान आहे तिचा इतक्या पराकोटीचा दुरुपयोग लहान मुलांपासून तरुण मंडळी करीत असतील तर हे भाषाप्रेम किती लटके आहे हे स्पष्ट होते. या मुलांच्या तोंडात ही भाषा येतेच कशी? सर्वसाधारणपणे जी भाषा कानावर पडते ती जिभेवर रुळू लागते असे शास्त्र सांगते. म्हणजे मग अर्वाच्च भाषेस सभोवतालची परिस्थिती जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल. असे दूषित पर्यावरण कोण करते याचा मागोवा घेतला तर मोठ्या माणसांच्या दिशेने संशयाची सुई वळते. अर्थात समाजातील सर्व मोठ्या माणसांना व्यक्त होण्याची संधी मिळत नसते. म्हणजे जे व्यक्त होत नाही किंवा त्यांचे व्यक्त होणे अपेक्षित नसते यांच्याकडे ही सुई वळणार नाही.
आता राहता राहिला तो समाजातील मोठा वर्ग जो भाषेला कस्पटासमान लेखतो. तिचा आदर करणे त्याच्या गावीही नसते किंवा भाषा हे सुसंस्कृतपणाचे साधन आणि वाहन आहे या विचारावर त्यांचा विश्वास नसतो. त्या मंडळींचा जिभेच्या हाडाशी संबंधही नसतो! आता अशी माणसे जर नेते असतील तर विचारायची सोय नाही. मागील आठवड्यात हात-पाय तोडणे आणि कोथळा बाहेर काढण्याची जाहीर भाषा झालीच का! अरेच्या असे काही बोलले तर नेतेपद लाभते असा गोड (खरेतर कटूच!) गैरसमज करून घेणारे आम्हाला या गोविंदांच्या रूपात दिसले. भविष्याची भीतीयुक्त चिंता त्यामुळे वाटली.
परदेशात कार्निव्हल नावाचा वार्षिक उत्सव साजरा होत असतो. साधारणत: नाताळच्या आसपास त्याची वर्णने छायाचित्रांसह आपल्या माध्यमातून झळकत असतात. भारतीय सभ्यतेचे विसर्जन झाल्याचे त्या छायाचित्रांतून दिसत असते. तो भडकपणा आपल्या समाजव्यवस्थेला मानवणारा नाही; परंतु पाश्चात्त्य रीतीरिवाजांचे, त्यात सणवारही आले, अंधानुकरण करता-करता आम्ही देशी सणांचा परदेशी साज चढवला. तो शोभत नाही, पण फ्युजनच्या जमान्यात खपवून घेतला जात आहे. आता तो दिवसही दूर नाही की “दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमात एखाद्या “आयटम सॉंग’ची फर्माइश येण्याची! काय सांगावे दिवाळी-पहाटचा आयोजक एखादा शिव्या घालत धुडगूस घालणारा नेताच असायचा!
दहीहंडीनिमित्त भाषेचा थर वाढावा असा आमचा अजिबात हेतू नाही, परंतु जो काही मनोरा आतापर्यंत आपल्या आधीच्या पिढ्यांनी रचला तो कोसळणार नाही याची तरी आपण काळजी घेणार आहोत की नाही? दही-हंडी हा उत्सव रांगडा असतो हे मान्य, पण त्यातून “राडा’ संस्कृती तयार होता कामा नये. पुढच्या वर्षी थरांबाबतचे निर्बंध सैल करताना दहीहंडी खेळताना मुखी सभ्य भाषा येईल याची काळजी घेऊ. अन्यथा आधीच ग्रहण लागलेल्या मराठी भाषेला बिभत्सपणाचे विरजण लागायचे!
– मिलिंद बल्लाळ