शमी आज घरी आली ती मोठ्या आनंदातच. शाळेने आज तिच्यावर एक मोठ्ठी जबाबदारी सोपवली होती. सगळा वर्ग सोडून बाईंनी या कामासाठी तिचीच निवड करावी, याचा तिला अभिमान वाटला. तिला वाटलं, ही मोठीच जबाबदारी, माझ्याशिवाय ती निभावणार कोण? गेल्यावर्षी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळाला होता, कदाचित त्याचाच परिणाम की काय यावेळी तिला व्यासपीठावरून बोलण्याची ही मोठ्ठी संधी चालून आली होती.
शमी लगेच उत्साहाने म्हणाली, “आई, आज की नाही, शाळेत काय झालं माहितीय? अगं, आज एक गंमतच घडली. आज आमच्या मराठीच्या बाई वर्गात आल्या आणि मला आमच्या मुख्याध्यापिका बाईंकडे घेऊन गेल्या. हेडबाई मला काय म्हणाल्या माहितीय? एक आठवड्याने आमच्या शाळेत लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम आहे. त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमच्या हेडबाईंनी मलाच करायला सांगितलंय. आहे की नाही विशेष?’ आई म्हणाली, “अरे व्वा..! म्हणजे पुस्तकातल्या कवींचे तुम्हा मुलांना प्रत्यक्ष दर्शनच घडणार की.
हे बघ शमू, तू त्यांच्या कवितेची पुस्तकं मिळव. वाचून काढ. त्यांचा परिचयसुद्धा तुझ्या शब्दांत छान तयार कर. तो परिचय एक दोनदा व्यवस्थित वाचण्याचा घरी आधी सराव कर. विसरायला नको काही. आणि हे बघ सूत्रसंचालनाच्यावेळी त्यांच्या कवितेच्या ओळी प्रसंगाला अनुसरून मध्येमध्ये म्हणत जा. अगं छान वाटेल संगळ्यांना.’ शमी म्हणाली, “करते बाई करते. आहे अजून चांगला आठवडा माझ्या हातात. करेन उद्या परवा तयारी.’ बाळूने कवींचा परिचय मिळवला. लिहून काढला. तो आयता परिचय शमीला दिला. शमीने स्वतःहून मेहनत घेऊन फारशी तयारी केलीच नाही.
अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला. शमीचा आत्मविश्वास आता थोडा डळमळला होता. तयारी कुठं केली होती तिने. पण आता सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली तर ती पार पाडायला पाहिजेच. ती शाळेत आली.
विद्यालयाचे सभागृह मुलांनी फुलून गेले होते. व्यासपीठावर अजून पाहुण्यांचे आगमन व्हायचे होते. सभागृहात बसलेल्या काही मुलांची चुळबुळ, कुजबूज सुरू झाली होती. विषय एकच, तो म्हणजे आजचे पाहुणे. ते कधी येणार? ते कसे असतील? ते काय बोलतील? ते कविता ऐकवतील ना? गोष्ट सांगतील ना? विनोद सांगून आपल्याला हसवतील ना? मुलांच्या ओठांवर केवढेतरी प्रश्न.
शमी आपली माइकचा ताबा घेऊन मुलांना शांत बसण्यासाठी सारख्या सूचना देत होती. “मुलांनो, आपल्या शाळेने नुकताच एक नवीन उपक्रम सुरू केलाय. तो म्हणजे लेखक आपल्या भेटीला. या उपक्रमांतर्गत आज आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत सुप्रसिद्ध कवी उत्तम कोळगावकर. त्यांची कविता इयत्ता सहावीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहे. पुस्तकातले कवी आज आपल्या भेटीला येणार. त्यांच्या कविता त्यांच्याचकडून आज आपल्याला ऐकायला मिळणार.
आहे की नाही मोठी गंमत. थोड्याच वेळात पाहुण्यांचे आगमन होईल.’ मुलांना शांत बसवण्यासाठी शमीची धडपड चाललेली होती. आता शमीला एक क्षण काय करावे ते कळेना. पण दुसऱ्या क्षणी तिला पटकन कोळगावकर सरांची सहावीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातली “या काळाच्या भाळावरती…’ ही कविता आठवली. त्या कवितेला तिनेच चाल बांधली होती. तिने लगेच कविता गायला सुरुवात केली.
या काळाच्या भाळावरती, तेजाचा तू लाव टिळा
आणि फुलू दे तुझ्या श्रमातुन, मानवतेचा इथे मळा
…सभागृहात हळूहळू शांतता पसरली. कवितेवर मुलांच्या माना डोलू लागल्या आणि त्याचवेळी पाहुण्यांचे आगमन झाले. पाहुणे संपूर्ण कविता होईपर्यंत शांतपणे सभागृहाच्या दाराशीच हेडबाईंसोबत उभे राहिले. शमीची कविता गाऊन झाल्यावर पाहुण्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायला तिने सांगितले. पाहुणे व्यासपीठावर विराजमान झाले. तयारी कमी असल्याने शमी थोडी गांगरलीच. आता पाहुण्यांचा परिचय तिने करून दिला. तोही थोडा चुकत चुकतच. तरी हा परिचय बाळूने अगदी आयता तिच्या हातात दिला होता. आई सारखं सांगत होती. लिहिलेला परिचय एक दोनदा अस्खलित घरी वाचून काढ म्हणजे शब्द छान तोंडात बसेल. पण आपण ऐकल्याचे न ऐकले केले. आपले चुकलेच. असे शमीला वाटले.
आता पाहुण्यांनी शमीकडे हसून पाहिले. होतं असं सुरुवातीला असंच काहिसं न बोलताही त्यांचे डोळे बोलले. मग मुलांशी संवाद साधायला ते उभे राहिले. त्यांनी त्यांच्या काही मजेशीर कविता सादर केल्या. मुलांशी गप्पा मारल्या. मुलांची कळी खुलली.
नको थांबवू तुझे चालणे, गोड असावे तुझे बोलणे
जिंकून घेशिल जग हे सारे, असे असावे तुझे वागणे
कितीतरी सुंदर संदेशपर कवितांनंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली तहान लागल्यावर विहीर खणू नये या आशयाची.
मग ते मुलांना म्हणाले, “मुलांनो, या गोष्टीसारखं आपण वागू नये. आपली नेहमी आधीच तयारी असावी बरं. मग हाती घेतलेल्या कामात नक्की यशस्वीता मिळते.’ टाळ्यांचा कडकडाट झाला. पाहुण्यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि ते बोलायचे थांबून खुर्चीत बसले. म्हणाली, “सर आपली गोष्ट मी माझ्या पुढील आयुष्यात नक्की लक्षात ठेवेन. त्याप्रमाणे वागेन. वेळच्या वेळी काम पूर्ण करण्याचा, सतत आग्रह धरेन.’ पाहुणे छोट्याशा गोष्टीचा झालेला मोठा परिणाम पाहत होते. मध्येच न राहवून ते उभे राहिले, म्हणाले, “या गोड मुलीने सूत्रसंचालन छान केले पुढील वेळेस पूर्ण तयारीनिशी ती आणखी सुंदर करेल. कविता तर छानच गायली तिने. याबद्दल मी तिला “मनात आहे पुष्कळ पुष्कळ’ हे माझं नवीन पुस्तक भेट म्हणून देत आहे.’ टाळ्यांचा पुन्हा एकदा कडकडाट झाली.
एकनाथ आव्हाड