गोव्यातील शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची परिषद नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर पाकिस्तानात गेलेले चीनचे परराष्ट्रमंत्री क्विन गांग आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनातून उभय देशांनी काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे. चीनचा काश्मीर राग जुना आहे. तो बदललेलाही नाही आणि बदलणारही नाही. येत्या काळात भारताशी कसे संबंध ठेवायचे या गोष्टी चीन आणि पाकिस्तान यांच्यावर अवलंबून आहेत. या उभय देशांची भूमिका कशीही असली तरी भारताची प्रतिक्रिया तितकीच कठोर राहणार आणि तसे संकेत भारताने शेजारी देशांना दिले आहेत.
पाकिस्तान आणि चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होते तेव्हा संयुक्त निवेदन जारी केले जाते. याही वेळेस निवेदन जारी केले गेले. यात म्हटले की, पाकिस्तानने आम्हाला (चीन) काश्मीरच्या स्थितीची माहिती दिली, यावर चीनने म्हटले की, ही एक इतिहासातील समस्या असून दोन्ही देशांनी एकत्र बैठक घेऊन संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणणे किंवा अन्य द्विपक्षीय कराराच्या आधारावर हा मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला आणि वेळोवळी असेच सल्ला दिला गेला आहे. एससीओच्या बैठकीत बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे आकलन केल्यास त्यांच्याकडून वेगळ्या भूमिकेची अपेक्षा देखील करण्यात आली नव्हती. भुट्टोने अनेक अतार्किक गोष्टी मांडल्या आणि त्यात देखील आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. बिलावल भुट्टो जे काही बोलले असतील तो त्यांच्या कुटनीतीचा आणि राजकारणाचा भाग आहे. एकप्रकारे ते त्यांचे आजोबा झुल्फिखार अली भुट्टो आणि आई बेनझिर भुट्टो यांचाच कित्ता गिरवत आहेत.
भारतात येऊन चिथावणीखोर भाषणे करा आणि स्वत:ला लाइमलाइटमध्ये आणणे, हीच नीती भुट्टो खानदानाची राहिली आहे. भारतद्वेष ही त्यांची जुनीच सवय आहे. बिलावल भुट्टो हे वेगळे आहेत, परंतु विचार बुरसटलेलेच आहेत. भारतात येऊन त्यांनी धमकी दिली. आपण जम्मू काश्मीरमध्ये जी-20 गटाची बैठक घेतल्यास त्यास असे उत्तर देऊ की आपण कधीही विसरू शकणार नाही. या आक्षेपार्ह वक्तव्याला भारताकडून चोख उत्तर देणे अपेक्षितच होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत भुट्टो यांच्या मताला तीव्र आक्षेप घेतला आणि भारताला काय वाटते हे देखील बजावून सांगितले.
एससीओच्या बैठकीचे यजमान भारताकडे असल्याने आपण औपचारिकता योग्य रितीने पार पाडली. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाबरोबर भारताची वागणूक योग्य होती आणि ती कुटनीतीच्या मर्यादेच्या अनुकुल होती. पण बिलावल भुट्टोच्या चिथावणीखोर वक्तव्यावर जयशंकर यांना शेवटी बोलावेच लागले. आपण आमच्याकडे पाहुणे म्हणून आलात आणि आपण चांगले पाहुणे नाहीत, हे सिद्ध केले. मग आम्हीही तुमचा चांगला पाहुणचार करावा, यासाठी बांधील राहत नाहीत. ज्या भाषेत बोलाल, त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. जयशंकर यांचे खडे बोल पाकिस्तानला जमीनीवर आणणारे होते. अशा प्रकारचे उत्तर देण्याबरोबरच भारताने या बैठकीत पकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यासमवेत द्विपक्षीय पातळीवर चर्चा करणार नसल्याचे ठरविले होते. म्हणून यावरही आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
उभय देशात असणारे सध्याचे संबंध आणि वातावरण पाहता संवादाची प्रक्रिया होईल असे कोणतेही संकेत मिळत नव्हते. माझ्या दृष्टीने अशा प्रकारच्या वर्तनाचा अनुभव येणे यामागे पाकिस्तानचा नाईलाजही राहू शकतो. कारण तो आता खूपच पोखरला गेला आहे. परंतु पाकिस्तानला भारत किंवा जगासमोर कमीपणा घ्यायचा नाही. हीच गोष्ट बिलावल भुट्टोने केली आहे. त्यांनी ठरविले असते तर दुसऱ्या मार्गाने आपले म्हणणे मांडू शकले असते. अनेक गोष्टी सांगू शकले असते. या आधारावर दोन्ही देशातील संबंध चांगले राहण्यास मदत मिळाली असती. आता दोन महिन्यानंतर एससीओचे शिखर संमेलन होत असून ते भारतात होत आहे. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सामील होण्याची अपेक्षा आहे. पण आता बिलावल भुट्टो यांनी असे काही वातावरण निर्मिती केली आहे की त्यामुळे शरीफ येतील की नाही, हे आताच सांगता येणार नाही. उभय देशातील कटूपणा वाढला आहे. बिलावल भुट्टो यांनी भविष्यातील वातावरण आणखीच खराब केले आहे.
पाकिस्तानात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे आणि निवडणुकीवरुनही शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यांत निवडणुका होत असतील तर नवे सरकार कसे असेल आणि त्यांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणूक झाली नाही तर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सत्ता सैनिकांच्या ताब्यात जाईल. त्यानंतर काही महिन्यांनी भारतात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. यादरम्यान पाकिस्तानकडून एखादी कृती झाली आणि त्यास भारत सरकार हे आपले यश मानत असेल आणि त्याच मुद्द्यावर निवडणूक लढल्या जातील. म्हणून केंद्र सरकारच्या पथ्यावर पडेल, असे कोणतेही वर्तन पाकिस्तानकडून आताच होईल असे वाटत नाही. असे काही घडले नाही तर भारत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही. आगामी निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येत असेल तर पाकिस्तानशी चर्चा करण्याची शक्यता कमीच राहू शकते. दुसरीकडे चीनकडून चांगल्या वर्तनाबाबतची अपेक्षा बाळगण्याचा विचार केला तर आतापर्यंत त्यांच्याकडून यासंदर्भात कोणतेही पाउल उचलले गेले नाही आणि त्यात अपेक्षा ठेवणे देखील योग्य नाही.
आगामी एससीओ शिखर परिषद आणि जी-20 गटाच्या नेत्यांच्या बैठकीत चीनचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. कदाचित चीनचे पंतप्रधान भारतात येतील आणि त्यानंतर अध्यक्षही येतील. या नेत्यांच्या दौऱ्यातूनही भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगले होण्याची अपेक्षा बाळगता येणार नाही. पूर्वी जी-20 गटाचे शिखर परिषद झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनिपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. आजच्या स्थितीतही त्यांच्याकडून अशा चर्चेची शक्यता असून नसल्यासारखीच आहे. खरच चीन चर्चेसाठी गंभीर असेल तर त्याला संबंध चांगले करण्यासाठी एक निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा अशा भेटीगाठीतून आणि चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही. भारताकडून देखील अशा द्विपक्षीय बैठकीवरून फारसा उत्साह दाखविला जात नाही. एससीओ गटाच्या संरक्षणमंत्र्यांच्या आणि परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीतून सकारात्मक परिणाम दिसून आले नसले तरी आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण अशा परिणामांची अपेक्षा देखील केलेली नव्हती. म्हणूनच निराश होण्याची गरज नाही.
हास्तांदोलन नाही
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांच्यासह चीन आणि इतर राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे गोव्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेसाठी नुकतेच भेटले. बिलावल भुट्टो यांच्यासह सर्व मंत्र्यांचे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी नमस्ते करून स्वागत केले; परंतु त्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. बिलावल भुट्टो यांच्याशी जयशंकर यांनी थेट चर्चा केलेली नाही. बिलावल भुट्टो हे 12 वर्षांच्या अवधीनंतर भारतात आलेले पहिले परराष्ट्र व्यवहार मंत्री ठरले आहेत.
– सुशांत सरीन