पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना झालेली अटक आणि त्यानंतर सबंध पाकिस्तानात उसळलेला हिंसाचार हा तेथील परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अपेक्षितच होता. मुशर्रफांनी स्थापन केलेल्या “नॅब’ या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या ब्युरोच्या अध्यक्षपदी माजी लेफ्टनंट जनरल नझीर अहमद बट्ट यांना नियुक्त करण्यात आले तेव्हाच इम्रान यांच्या गळ्याभोवती फास आवळला जाईल, हे स्पष्ट झाले होते. शरीफ सरकारने या अटकेबाबत कानावर हात ठेवले असले तरी पाकिस्तानातील हिंसाचार नियंत्रणात न आल्यास तेथील लष्कर शरीफांची गच्छंती करून आपल्या हाती सत्ता घ्यायला मागेपुढे पाहणार नाही.
पाकिस्तान या देशाच्या जन्मापासून त्यांच्या कुंडलीत काय लिखाण आहे ते कळायला मार्ग नाही. एकीकडे भारतासारखा देश जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून आणि साडे सात दशके अखंड लोकशाही टिकून राहिलेला देश म्हणून जगात सन्मानाने पुढे जात असताना पाकिस्तानात मात्र लोकशाही व्यवस्था रुजण्यात सातत्याने अडथळे येत गेले आहेत. लष्कराचा हस्तक्षेप आणि व्यवस्थेतील समन्वयाचा अभाव यामुळे तेथे कुठल्याही राजकारणी व्यक्तीस राज्यकारभार करणे कसे कठीण होते याचे उदाहरण म्हणून इम्रान खान यांच्या पतनाकडे पहावे लागेल.
पाकिस्तानात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पूर्वनियोजित रणनीतीद्वारे लष्कराने अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान खान यांचे सरकार पाडून आपल्या सोयीच्या राजकीय आघाडीकडे सत्तेची धुरा सोपवली होती. आयएसआयच्या प्रमुखपदी आपल्या पसंतीच्या जनरलची नियुक्ती करण्यावरून लष्करप्रमुखांशी भांडण झाल्यानंतर लष्कर इम्रान खानच्या विरोधात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर इम्रान खानला 9 मे रोजी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र इम्रान खान यांना अटक करताना ज्या प्रकारे हिंसक वागणूक देण्यात आली, ती पाकिस्तानच्या व्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगणारी ठरली. इम्रान खान सतत लष्कराच्या निरंकुशतेविरोधात आवाज उठवत होते.
8 मे रोजी त्यांनी लष्कराविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची स्क्रिप्ट तयार करण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू झाल्यामुळे अराजकतेची स्थिती आहे. इम्रान यांना न्यायालयाच्या आवारात अटक केल्यामुळे पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेतही संतापाचे वातावरण आहे. ही बाब कदाचित येत्या काळात सत्ता आणि न्यायव्यवस्था यांच्यातील संघर्षाचे कारण बनू शकते. पाकिस्तानात इम्रान खान यांची लोकप्रियता वाढत असल्यामुळे तेथील संघर्षाची प्रक्रिया दीर्घकाळ चालू शकते.
इम्रान यांनी एकाच वेळी सत्ताधारी पक्ष आणि लष्कर या दोघांचाही विरोध ओढावून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या एक हजारांहून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. कुठल्याही देशांमध्ये जेव्हा राजकीय अस्थिरता निर्माण होते तेव्हा तेथील अर्थकारणावर त्याचा दुष्परिणाम होतो. पाकिस्तानमधील अर्थकारण मुळातच डबघाईला आलेले आहे. संपूर्ण जगभरात पाकिस्तान हातात कटोरा घेऊन आर्थिक मदतीसाठी अक्षरशः भीक मागताना दिसला आहे. तेथे महागाईने परमोच्च पातळी गाठली आहे. अन्नधान्याची टंचाई लोकांच्या जगण्याला डागण्या देत आहे. अशी भेदक परिस्थिती असताना ताज्या संघर्षामुळे पाकिस्तानातील अर्थकारणालाही धक्का बसला आहे. इम्रान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 1.3 रुपयांनी खाली घसरले आहे.
आज भारतीय रुपयाचे मूल्य पाकिस्तानच्या 3.5 रुपयांपेक्षाही अधिक आहे. परकीय कर्जाच्या सतत वाढत जाणाऱ्या ओझ्यांमध्ये भविष्यात आशेचा किरण दिसत नाही. अलीकडच्या राजकीय अनागोंदीमुळे सामान्य पाकिस्तानी लोकांचे जीवन आणखी दयनीय होईल. असे असताना पाकिस्तानामधील सत्ताधारी पक्ष मात्र भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणे, काश्मीरमध्ये वेगवेगळ्या कुरघोड्या करणे यातच मश्गुल आहेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी इम्रान खान गांभीर्याने प्रयत्नशील होते; किंबहुना पाकिस्तानी जनता त्यांच्या पाठिशी इतक्या मोठ्या प्रमाणावर उभी राहण्यामागे हेही एक कारण होते. पण तेथील व्यवस्थेपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
इम्रान खान यांच्या विरुद्ध डझनभर प्रकरणे प्रलंबित आहेत. नुकतीच झालेली अटक ही इस्लामबादेजवळील अल कादीर विद्यापीठासाठी जमिनीच्या हस्तातंरणातील भ्रष्टाचार संदर्भात करण्यात आली आहे. इम्रान यांना ज्या “नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो’ म्हणजेच नॅबच्या ताब्यात दिले आहे, त्याची स्थापना पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केली होती. शरीफ कुटुंबियांची कोंडी करणे या हेतूने “नॅब’ जन्माला घालण्यात आली. नवाझ शरीफ यांना याच ब्युरोच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान असणारे शाहबाज शरीफ हे नवाझ शरीफ यांचे बंधू आहेत. त्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती करत याच ब्यूरोने आपली ताकद दाखवून दिली. अलीकडेच निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल नझीर अहमद बट्ट यांना या ब्यूरोचे प्रमुख करण्यात आले, तेव्हाच इम्रान यांच्या गळ्याभोवती फास आवळला जाईल, हे स्पष्ट झाले होते.
इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी पाकिस्तानातील लष्कराची इच्छा आहे. सत्ताकारणात आणि त्याच्या इतर आस्थापनांमध्ये खोलवर हस्तक्षेप करणाऱ्या लष्कराला लोकशाही पद्धतीने निवडून आलेला कोणताही मजबूत नेता पाकिस्तानात सत्तेवर असावा असे कधीच वाटत नाही. त्यामुळेच इम्रान खान यांना कलंकित ठरवून सत्तेपासून दूर ठेवण्याची, सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्याची योजना आखण्यात आली. इतिहासात डोकावल्यास झुल्फिकार अली भुत्तोंपासून नवाझ शरीफ यांच्यापर्यंत अनेकांना सत्तेवरून हटवून लष्करी सत्तेचा मार्ग मोकळा करण्यात आला.
षडयंत्रे आणि लष्करी बळाच्या वापरामुळे पाकिस्तानमधील लोकशाही वारंवार कोलमडताना दिसली आहे. आताही इम्रान खाननंतर त्यांचे सहकारी आणि समर्थकांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इम्रान यांच्या पाठोपाठ त्यांचे विश्वासू सहकारी आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला चिथावणी असा आरोप त्यांच्यावर आहे. या माध्यमातून इम्रान यांचा पक्ष निर्नायकी करण्याचा हेतू स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानातील तणाव कधी निवळेल हे सांगणे कठीण आहे. अनेक दशके राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा असणारे पाकिस्तानी लष्कर पुन्हा मार्शल लॉच्या माध्यमातून लोकशाही अधिकार दडपण्यास सुरुवात करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंतप्रधानपदावरून हकालपट्टी झाल्यापासून देशभरात इम्रान यांच्यावर एकूण एकशे चाळीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणे यापैकी पाकिस्तान मुस्लीम लिग या पक्षाने सुद्धा दाखल केली आहेत असे म्हटले जाते. एका प्रकरणातून इम्रान खान जरी सुटले तरी देखील त्यांना दुसऱ्या प्रकरणात त्यांना गुंतवण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे. या खटल्यांचा आधार काय आणि ते कुठल्या निकालावर पोहोचतात, हे तेथील न्यायालयांच्या निर्णयांवर अवलंबून असेल. सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तींना कायद्याच्या कचाट्यात आणणे ही गोष्ट पाकिस्तानात नवीन नाही.
पण अशा अटकेनंतर मोठ्या प्रमाणावर निदर्शने होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. हा असंतोष शमवणे हे विद्यमान सरकारसाठी हे निश्चितच एक गंभीर आव्हान आहे. इम्रान खान यांच्या अटकेबाबत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कानावर हात ठेवले आहेत. परंतु एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही, ती म्हणजे इम्रान यांच्या अटकेनंतर उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला नाही तर येत्या काळात याच शरीफांची सत्ता उलथवून टाकत पाकिस्तानी लष्कर सत्ता ताब्यात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही.
नजिकच्या भविष्यात पाकिस्तानचे एकंदरीत अस्तित्वच कसे राहणार याबाबत आज जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. याचे एक कारण आर्थिक दिवाळखोरी हे आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान भागात तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने आपले स्वतःचे सरकार स्थापन केले आहे. बलुचिस्तानमधील अलगाववादी चळवळ जोर धरत असून त्यांनी टीटीपीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा प्रवास आता शकले होण्याच्या दिशेने सुरू आहे. इम्रान यांची अटक ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरते का हे लवकरच समजेल.
– प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर