बीसीसीआयने महिला व पुरुष खेळाडूंच्या किमान वेतनात समानता आणण्याची गेल्या वर्षी केलेली घोषणा हवेतच विरल्याचे समोर आले आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी सध्या सदस्यांकडूनच केली जात असल्याचेही बोलले जात आहे. माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी याबाबत खूपच चांगला पुढाकार घेतला होता, मात्र त्यांची अध्यक्षपदावरून गच्छंती झाली व अन्य सदस्यांनी तो विषय ऑप्शनला टाकल्याचे समोर येत आहे.
सध्याच्या पद्धतीनुसार महिला व पुरुष संघाला प्रत्येक कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांतून मिळणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. बीसीसीआय येत्या तीन वर्षांत महिला संघाला 62 सामन्यांमधून 31.92 कोटी रुपये देणार आहे. पण पुरुष संघ एका वर्षात 45 सामन्यांतून 27.70 कोटी कमावणार आहे. समसमानची घोषणा करूनही बीसीसीआयचे महिला क्रिकेटकडे दुर्लक्षच होत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. नव्या वेळापत्रकानुसार भारतीय पुरुष संघ एका वर्षात 45 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे, तर महिला संघाला 62 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी चार वर्षे लागणार आहेत. बीसीसीआय आता पुरुष आणि महिला संघाला टी-20 साठी 3 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि कसोटीसाठी 15 लाख रुपये देणार आहे.
फेब्रुवारीत आयसीसीची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पार पडली. यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये महिलांची दुसरी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. मात्र या विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी भारतीय महिला संघाला 90 दिवस वाट पाहावी लागणार आहे. यानंतर महिला संघ तयारीसाठी मालिका खेळणार आहे. भारतीय महिला संघाची टी-20 मालिका जून 2023 मध्ये बांगलादेशमध्ये होणार आहे. यानंतर 2024 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरू होणार आहे. या तयारीसाठी भारतीय महिला संघ पाच टी-20 मालिका खेळणार आहे. पण दुसरीकडे भारतीय पुरुष संघ अवघ्या 8 दिवसांत एकदिवसीय व टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरू करेल.
कसोटी क्रिकेटही संथगतीने का?
भारतीय महिला संघाचा कसोटी क्रिकेटचा प्रवास सपशेल अपयशी ठरत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय महिला संघाने 2014 सालानंतर कसोटी सामना खेळलेला नाही. बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेटपटूंमधील भेदभाव कायम ठेवल्याचेच चित्र सध्यातरी दिसत आहे. भारतीय महिला संघ 26 महिने व 27 दिवसांनी कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय महिला संघाने चार वर्षांत केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे भारतीय पुरुष संघ एकाच वर्षात सात कसोटी सामने खेळत आहे. अन्य देशांकडे पाहिले तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे देश महिला गटातही सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत असतात. मग जागतिक क्रिकेटवर वर्चस्व असलेल्या आपल्या देशाची स्थिती अशी का, असा प्रश्नही कोणाला अद्याप पडलेला नाही.
केवळ मर्यादित षटकांचेच सामने खेळत राहिले तर त्यातून प्रगती होईल, पण ती केवळ याच प्रकारातील क्रिकेटसाठी. कसोटी क्रिकेटची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी बीसीसीआयने कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या सर्व देशांना आवाहन केले पाहिजे व जेणेकरून ते देश भारतात येऊन कसोटी सामने तसेच मालिका खेळतील. आपल्या महिला संघाच्या कसोटी मालिका या एक किंवा फार तर दोन सामन्यांच्या होतात. एखाद्या देशाने दौरा केला तर किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली पाहिजे. एक योजना हाती घेऊन आगामी पाच वर्षांचे वेळापत्रकही तयार करण्यात आले पाहिजे. या पाच वर्षांत भारतीय संघाने किमान तीन परदेश दौरे केले पाहिजेत व तेथेही कमीत कमी तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली पाहिजे. तसेच अनेक परदेशी संघांना निमंत्रण देत त्यांना भारतात बोलावून कसोटी मालिका खेळवल्या गेल्या तरच चित्र प्रगतीपथावर येताना दिसेल. सध्या आपल्याच महिला संघातील एखाद्या खेळाडूला विचारले तर तिलाही निश्चित सांगता येणार नाही की, भारताचा महिला संघ कसोटी सामना खेळून किती दिवस व महिने उलटले.
आर्थिक कारणे नाहीतच
काही वर्षांपूर्वी भारताचे महिला क्रिकेट हे एका संघटनेमार्फत चालवले जात होते. त्यात खेळाडू मिळत होते. मात्र, त्यांना आर्थिक, मानसिक स्थैर्य मिळत नव्हते. काही काळातच बीसीसीआयने भारताच्या महिला क्रिकेटलाही आपल्या छत्रछायेखाली घेतले व पाऊल वाटेवरचा त्यांचा प्रवास हमरस्त्यावरून सुरू झाला. आता हाच रस्ता एक्स्प्रेस वे करायचा आहे. मुळात भारताच्या महिला क्रिकेटला तसेच खेळाडूंना आर्थिक संकटाचा सामना सातत्याने करावा लागत होता, तो आता करावा लागत नाही. काही अपवादात्मक परिस्थितीतून पुढे येत असलेल्या खेळाडूंना हा प्रश्न अद्याप सतावत असला तरीही जेव्हा ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करून भारताच्या महिला संघातील जागा निश्चित करतील तेव्हा त्यांच्याकडेही लक्ष्मीची कृपा होताना दिसेल.
मैदाने व सुविधा पुरवा
भारतात जितकी क्रिकेटची मैदाने आहेत, त्यातील ज्या मैदानांवर मोठ्या स्तरावरचे क्रिकेट आयोजित करणे शक्य आहे त्यांची निवड केली गेली पाहिजे. काही शहरांतील मैदाने सुसज्ज आहेत, परंतु तेथे सामनेच खूप वर्षांनी होतात व त्यातही सातत्य नसते. पुण्याचेच उदाहरण तर सगळ्यांसमोरच आहे. ज्या सुविधा, अत्याधुनिक यंत्रणा व तंत्रज्ञान पुरुष खेळाडूंना मिळते तेच आता महिला क्रिकेटपटूंनाही सातत्याने मिळाले पाहिजे. यंदाच्या महिलांच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पाच संघ आहेत व या सर्व सामन्यांचे आयोजन एकट्या मुंबईतील तीन मैदानांवर केले गेले आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम नवी मुंबई, ब्रेबॉर्न व वानखेडे स्टेडियम मुंबई या तीन ठिकाणीच हे सामने होत आहेत. म्हणजे काय तर रोटेशन पद्धतीला बीसीसीआयनेच खो घातला आहे. पुरुष खेळाडूंचे सामने मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, गुजरात, नागपूर, लखनौ, कानपूर, रांची, पंजाब, मध्य प्रदेशात होतच असतात व तेथील प्रेक्षकांना सामन्यांचा आनंदही सातत्याने लुटता येतो. आता त्याच धर्तीवर महिलांचे सामनेही असे देशभरात विविध मैदानांवर खेळवले गेले तर त्या सामन्यात खेळत असलेल्या खेळाडूंकडून प्रेरणा घेत नवोदितांनाही इंडिया मटेरियल म्हणून पाहिले जाईल. जितक्या छोट्या शहरांमध्ये महिलांचे सामने होतील तेथे प्रेक्षकही मोठ्या संख्येने लाभतील व बीसीसीआयला आर्थिक नफाही चांगला मिळेल.
जिथे सातत्याने सामने होत असतात तेथील प्रेक्षक काहीवेळा सततच्या किंवा अतिक्रिकेटला कंटाळलेला असतो उलट छोट्या शहरांतील प्रेक्षकांना दोन ते तीन वर्षांतून सामना होत असल्याने हा सामना पाहण्याची संधी गमवायची नसते. पुरुष खेळाडूंबाबत बोलायचे झाले तर महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुलसारखे अनेक खेळाडू सध्या विविध मोठ्या ब्रॅंडच्या जाहिराती करत आहेत व त्यातून बक्कळ कमाईही करत आहेत. हे भाग्य भारतीय महिला संघाबाबत बोलायचे झाले तर स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा अशा काही बोटांवर मोजता येतील अशाच खेळाडूंबाबत हे चित्र दिसते. मग बाकीच्या काय केवळ खांद्यावर टॉवेल व हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात जाण्यासाठीच आहेत का, याचाही विचार केला गेला पाहिजे. पुरुष खेळाडूंप्रमाणे महिला खेळाडूंनाही सुविधा पुरवा, त्या पुरुषांपेक्षाही एक पाऊल पुढे जाताना दिसतील यात शंका नाही.
थेट प्रक्षेपणातही गांभीर्य हवे
भारतात सध्या महिलांची आयपीएल स्पर्धा सुरू आहे. मूळ पुरुष खेळाडूंची ऑस्ट्रेलियाविरुद्ध आधी कसोटी तर मग एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. त्याचे थेट प्रक्षेपण स्टार या वाहिनीवरून केले जाते. या कसोटी सामन्यांतील दिवसाचा खेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपतो. महिलांच्या आयपीएलचा सामना सध्याकाळी 7ः30 वाजता सुरू होतो त्यामुळे याच वाहिनीवरून महिलांच्या सामन्यांचे प्रक्षेपण करणे कठीण नाही. कसोटी मालिका संपल्यावर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका स्टारकडे असल्याने व ते सामने संध्याकाळी असल्याने महिलांच्या सामन्यांचे या काळात थेट प्रक्षेपण करणे शक्य नाही, हे मान्य. परंतु स्टार वाहिनीकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
स्टार स्पोर्टस 1, 2 3, असे त्यांचे पर्याय महिलांच्या सामन्यांसाठी कायमस्वरुपी राखून ठेवण्यासाठी आता बीसीसीआयनेच गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत. सध्या स्पोर्टस 18 या वाहिनीवरून हे सामने दाखवले जात आहेत. मात्र, त्यात पुरुष खेळाडूंप्रमाणे महिलांच्या सामन्यांबाबतही समान दृष्टिकोन ठेवता येणार नाही का. जर आज स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या जात आहेत तर बाकी क्षेत्र सोडा किमान क्रिकेटच्या व अन्य कोणत्याही खेळात याबाबत समानता यायलाच हवी. मानधन, वेतन, करार, ब्रॅंड प्रमोशन व संधी या गोष्टी पुरुष खेळाडूंना ज्या सहजतेने मिळतात त्या महिला क्रिकेटपटूंनाही मिळाव्यात, हीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे