गुरू दाता असतो आणि शिष्य हा याचक असतो. अनादी काळापासून या संकल्पनेचे आपण पाईक आहोत आणि मोठ्या अभिमानाने ही आमची संस्कृती आहे हे सांगत आलो आहोत. वास्तविक पहाता ही ज्ञानाची संक्रमिता आहे; परंतु जनमानसात ही कल्पना का रुजली असावी? एक चित्र डोळ्यापुढे आणा- एक गुरू उभा आहे, शिष्य त्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक ठेवत आहे. गुरू आशीर्वादासाठी त्याच्या मस्तकावर हात ठेवत आहे.
हा एक सर्किट डायग्रॅम आहे. ज्ञानसंपन्न गुरूच्या उर्जास्रोताला स्पर्श व्हावा म्हणून शिष्य पायावर डोके ठेवतो, ज्ञानाचे संक्रमण सुरू होते. गुरू शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून हे ऊर्जा किंवा ज्ञान सर्किट पूर्ण करतो. ही संकल्पना नीट रुजविण्यासाठी गुरू म्हणजे ज्ञान, यांच्या देहात आपले अज्ञानी शिष्यत्व झोकून देणं आवश्यक होतं. यासाठी गुरू अहंमन्य असला तरी शिष्यानं स्वतःकडे अल्पस्वल्प ज्ञान आहे हे विसरून जात लीन व्हावं ही गोष्ट जनमानसात ठसविली गेली.
पुराणकालीन एका कथेच्या पूर्वार्धात सृष्टीचं फारसं ज्ञान नसलेला बालक शंभर गाय बैलांचा कळप घेऊन वनात जातो. बारा वर्षे पूर्ण झाल्यावर हा कळप शंभराचाच असेल असं बंधन त्यांनी घालून घेतलेलं असतं. बारा वर्षांचा काळ जातो. त्याच्या ताब्यात असलेली एक तपापूर्वीची शंभर गुरांची संख्या नेमकी तेव्हढीच राखण्यात तो यशस्वी होतो. या बारा वर्षांच्या यशोकाळात तो ज्ञानसंपन्न होतो, हा या कथेचा उत्तरार्ध आहे. हे ज्ञान त्याला कुणी नेमून दिलेला गुरू देत नाही, तर गुरांची संख्या अबाधित राखण्यात चराचराचा एकट्यानं केलेला अभ्यास करून तो शिष्यत्वाच्या भूमिकेचं ज्ञानसंपन्न व्यक्तीत परावर्तित करतो. चराचर किंवा निसर्ग हाच त्याचा गुरू होतो.
तो गुरं घेऊन एक भूखंड निवडतो. गुरं नजरेसमोर राहावीत म्हणून त्यांना बंदिस्त करण्यासाठी त्या भूखंडाभोवती एक दगडी कुंपण घालायचं ठरवतो. दगड एकमेकांवर रचत असताना ते चपखल कसे बसतील याचं ज्ञान तो दगडालाच गुरू मानून करून घेतो. दगडांची चपखल रचना करूनही काही भेगा आणि फटी आढळून येतात. त्या मातीनं लिंपायचं तो योजतो. पुरेसा चिकटावा असणारी माती मिळवण्यासाठी तो मातीला गुरू बनवतो. ते लिंपण पार पाडल्यावर देखील त्या भिंतीची उंची त्याला पुरेशी वाटत नाही. यासाठी त्यावर काटेरी झुडुपं लावायचं तो ठरवतो. खुरट्या वनस्पतींना गुरू मानल्यावर त्याला मुबलक काटे असणारी वनस्पती आणि भूखंडात गुरांना चरण्यासाठी कुरण करण्यास योग्य गवताळ वनस्पती यांचं ज्ञान होतं. ही भिंत बांधून होताच त्याला वनस्पतीशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र यांची ओळख होते. याच भूखंडात तो फळे, भाजीपाला आणि धान्य याची स्वतःसाठी निर्मिती करतो.
एक दिवस एक वाघ कुठूनतरी येतो आणि एक गाय घेऊन जातो. आता वाघ त्याचा गुरू बनतो. त्याची शिकार करण्याची पद्धत तो समजावून घेतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की वाघ अंधाराचा फायदा घेतोय. रात्रीचा अंधार टाळणे शक्य नाही म्हणून कोपऱ्या कोपऱ्यात तो विस्तव धगधगता ठेवायचं योजतो. विस्तव पेटवताना वाऱ्याचा झोत त्रास देणं सुरू करतो. आता वारा त्याचा गुरू बनतो. वाऱ्याचा वहनाचा वेग आणि दिशा तो लक्षात ठेवतो. हाच वारा कुठल्या काळात कसा वाहतो याचं शिक्षण त्याला देतो. हा वारा ऋतुमानानुसार बदलत असतो. आता ऋतू हा त्याचा गुरू बनतो.
ऋतुचक्र त्याला अनेक गोष्टींचं ज्ञान देत राहतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या त्रयींनी ऋतू बंदिस्त असतात हे ज्ञान त्याला ऋतूच देतात. या ऋतुचक्रातील घटकांना तो गुरू मानतो. त्या त्या ऋतूंचा वनस्पती निपजण्यावर काय परिणाम घडतो याचं यथार्थ ज्ञान त्याला होतं. आता हा विशिष्ट ऋतुकाळ आपल्याला उपयोगी कसा पडेल याचा विचार करत प्रत्येक ऋतूची बैठक तो समजावून घेतो. ही बैठक वनस्पतींची वाढ आणि धान्य उत्पादन करणाऱ्या रोपांना कशी फायदेशीर ठरेल याची माहिती त्याला होते. अन्नसाठा करण्यासाठी ही माहिती त्याला उपयोगात आणता येते.
ऋतुकालाचं ज्ञानही तोकडं आहे याची जाणीव त्याला होते, कारण अचानक त्या त्या ऋतूवैशिष्ट्यापेक्षा वेगळी बदललेली वातावरण परिस्थिती त्याला अनुभवायला येते. याची कारणे शोधताना अंतराळातील ग्रहांची स्थिती कारणीभूत ठरतीय ही जाण त्याला येते. ग्रह आणि ग्रहस्थिती यांना अजमावताना तो आकाशाला गुरू मानतो आणि आकाशज्ञान त्याला होतं. आकाशाच्या स्थितीनुसार त्याला ऋतूंच्या बदलांचा अंदाज येतो. खगोलशास्त्र तो विकसित करतो.
गुरांच्या संख्येतील घट ही केवळ जंगली श्वापदांनीच बाधित होते असं नाही तर गुरांच्या मृत्यूच्या कारणात गुरांचं आजारपण देखील कारणीभूत आहे हे त्याला समजत जातं. हे आजारपण थोपवावं यासाठी झाडपाल्याची कुठली औषधं लागतात आणि त्यासाठी कुठल्या वनस्पतींची लागवड करण्याचं ज्ञान त्या विकारांना गुरू केल्यावर त्याला प्राप्त होतं. जंगली श्वापद आणि आजारपण यापासून काही प्रमाणात तो कळपाला सुरक्षा देऊ शकतो.
हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करायला हवं. या लहरी हवामानाच्या परिणामांना सामोरं जायला नियोजन आवश्यक आहे हे कळल्यावर नियोजनाला गुरू मानून तो नियोजनशास्त्राची मुहूर्तमेढ रोवतो. नियोजनाची बाराखडी तो तयार करतो. अनुभवातून काही आडाखे भूपत्रावर नोंदवून ठेवतो. या नोंदींना तो गुरू मानतो, तेव्हा लिखाणाची कला त्याला अवगत होते. आपल्या त्यावेळच्या भावनासुद्धा तो नोंदवायला लागतो. यातून त्याला आपल्या मनोव्यापारांची ओळख होते. हे अभ्यासताना मनाचे शरीरावर होणारे परिणाम त्याला दिसायला लागतात. पर्यायाने तो शरीरशास्त्र विकसित करतो. पशुपक्ष्यांचे मृतदेह आणि सांगाडे हे त्याचे गुरू बनतात. या गुरूच्या माध्यमातून त्याला मानवी शरीराचे अवयव, त्यांचं कार्य आणि महत्त्व ध्यानात येतं. औषध म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी करायची आणि कोणत्या आजाराला ती वापरायची याचं सम्यक ज्ञान देणारं धन्वंतरीशास्त्र त्याला उलगडू लागतं.
गुरांची संख्या घटू नये म्हणून काही प्रयोगात आपण यशस्वी होतोय परंतु त्यांची उपज आपल्या हाती नाही. औषधं आणि सुरक्षा देऊन आपण मृत्युदर कमी केला पण जन्मदर कसा सांभाळायचा? यातून गाय माजावर येणं, वळूंना ते निमंत्रण वाटणं याचा तो अभ्यास करायला लागला. ह्याचं नियंत्रण राखण्यासाठी माजावर येणाऱ्या गाईंची वासनापूर्ती करूनही गर्भधारणा कशी रोखता येईल याचं परिवारशास्त्र तो बनवतो. या पद्धतीनं तो बारा वर्षांनंतरही मूळ गुरांची शंभर ही संख्या तेव्हढीच ठेवण्यात यशस्वी होतो. या अनुषंगानं येणारी प्रत्येक अडचण ही गुरू मानून व वारंवार शिष्यत्व पत्करून तो ज्ञानसंपन्न होतो. सर्व शास्त्र आणि कला यात पारंगत होतो. या पुराणकथेतून एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला ज्ञानाची ओढ असेल तर निसर्ग, अवतीभोवतीची परिस्थिती व घटना यांचं तुम्ही बारकाईनं अवलोकन केलं तर तुम्हीच शिष्य आणि तुम्हीच गुरू बनून जाता.
– दीपक पारखी