गर्वाचे घर खाली’ ही म्हण यंदाच्या ऑस्ट्रेलिया संघाकडे पाहिले की खरी वाटते. 1960 ते जवळपास 1980 सालच्या सुरुवातीपर्यंत वेस्ट इंडिजचे जागतिक क्रिकेटवर असलेले वर्चस्व ऑस्ट्रेलियाने संपवले व आपले राज्य सुरू केले. आज त्यांच्या संघाची स्थिती पाहता तेच मांडलिक झाल्यासारखे कामगिरी करत आहेत.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात जास्त वेळा विजेतेपद मिळवणारा हाच का तो ऑस्ट्रेलियाचा संघ, असा प्रश्न निर्माण होत आहे. जेव्हा ते जिंकायचे तेव्हा समोरच्या संघाला एकही संधी द्यायचे नाहीत. विजयाचा घास समोरच्या संघाच्या घशातून ओढून बाहेर काढण्यात तर ते पटाईत होते. यंदाच्या स्पर्धेत मात्र, त्यांचा संघ झिम्बाब्वे किंवा 1996 सालच्या केनिया संघासारखा भासत आहे. एक सामना जिंकण्यासाठीही त्यांना धाप लागत आहे. 1987, 1999, 2003, 2007 व 2015 अशी विश्वकरंडकाची विजेतीपदे त्यांनी मिळवली व आपले जागतिक वर्चस्व सातत्याने सिद्ध केले. मात्र, त्यानंतर त्यांचे प्रमुख खेळाडू एकतर निवृत्त झाले किंवा त्यांची कामगिरी खालावल्याने त्यांचे संघातील स्थान गेले. अशा वेळी नवोदितांना संघात संधी मिळाली; परंतु आता असे चित्र दिसत आहे की त्यांच्या नवोदितांकडे फारशी गुणवत्ता नाही किंवा जी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची खरी ओळख होती तीच दिसेनाशी झाली आहे.
विंडीजच्या अवस्थेशी साम्य
जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे वर्चस्व यासाठी अबाधित होते की त्यांचा एक खेळाडू संघाबाहेर असला तरीही तो अंतिम 11 खेळाडूंच्याच तोडीचा होता. संघातील कोणाला दुखापतीमुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने संघातून बाहेर बसावे लागले तरीही संघात येणारा नवोदित थक्क करणारी कामगिरी करायचा. कर्टली ऍम्ब्रोस संघाबाहेर गेला तर त्याच्या जागी अफलातून कामगिरी पॅट्रीक पॅटरसनने केल्याचे सगळ्यांना आठवत असेल. मात्र, त्यांच्या संघातील वेगवान गोलंदाजीचा तोफखाना जवळपास दीड दशक संघात होता. त्यामुळे नव्या दमाच्या गोलंदाजांना फारशी संधीच मिळाली नाही. तेच चित्र फलंदाजांच्याबाबतही झाले. गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, विव्ह रीचर्डससारखे खेळाडू दोन दशके संघातून खेळले मग सेकंड बेंचला संधी मिळणार कशी व कधी. सध्या ऑस्ट्रेलियाची अवस्था अशीच बनली आहे. त्यांचे दिग्गज खेळाडू इतकी वर्षे संघात होते की नवोदितांना संधी मिळण्यासाठी 2016 साल उजाडले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता व भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सातत्याने पराभूत करत नवे जागतिक वर्चस्व निर्माण करण्याकडे कूच केलेही होते. ऍलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पॉंटिंग, मायकल क्लार्क या कर्णधारांनी त्यांना सुगीचे दिवस आणले; पण त्यांच्याच दीर्घकाळ संघात राहण्यामुळे त्यांच्या पर्यायांना संधीच मिळाली नाही. हे ऑस्ट्रेलियाच्या खालावलेल्या कामगिरीचे एक कारण असावे.
नव्यांकडे ती जिगर नाही
ऑस्ट्रेलियाचा संघ ओळखला जात होता तो काहीही करू पण सामना जिंकू, या वृत्तीसाठी. आजच्या संघात ती वृत्तीच दिसलेली नाही. एकतर अत्यंत मवाळ प्रवृत्तीचा कर्णधार त्यांना लाभला आहे. खरेतर लाभला आहे का डोक्यावर आणून बसवला आहे यावर वाद होऊ शकतो. कर्णधाराकडे विशेषतः ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराकडे जी आक्रमकता असायला हवी तीच पॅट कमिन्सकडे नाही. एकूणच ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट आक्रमकता, स्लेजिंग, मैदानावर वाद व मैदानाबाहेरचे रंगील वातावरण अशीच होती. त्यांचे खेळाडू मैदानावर सरस कामगिरी तर करत होतेच; परंतु विविध कारणांनी मैदानाबाहेरही विविध गोष्टींमुळे वादात सापडत होते. महान गोलंदाज असला तरीही शेन वॉर्न, अष्टपैलू अँड्य्रू सायमंड्स हे तर आपल्या मैदानाच्या बाहेर जे दिवे लावत होते, त्यामुळे जास्त कुप्रसिद्ध होत होते. बारमध्ये भांडण करणे, रस्त्यावर मद्याच्या नशेत गोंधळ घालणे ही तर त्यांची खासियत होती. ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरतो तोच जिंकण्यासाठी. मग हा विजय मिळवण्यासाठी काहीही करावे लागले तरीही चालेल याच वृत्तीने त्यांचा खेळ असायचा. सध्याचा संघ मवाळ आहे, समोरच्या संघावर दडपण राखत किंवा स्लेजिंग करत वर्चस्व राखण्यात कमी पडत आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या पोटात एक फायर असते किंवा खेळताना जिगर असते तीच यंदाच्या संघात दिसत नाही, हे प्रत्येक जण मान्य करेल.
स्मिथच्या गैरवर्तनाचा फटका
ऑस्ट्रेलियाच्या भन्नाट क्रिकेट फॅक्टरीतील स्टीव्ह स्मिथ हा नवे उत्पादन ठरला होता. त्याच्याकडे ते सगळे होते जे एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूकडे असणे गरजेचे आहे. मात्र, चेंडूशी छेडखानी करणे, लेपल माइक वापरणे, तसेच डगआउटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफमधील प्रशिक्षकाकडून इशारे घेत त्यानुसार मैदानावर पंचांचे लक्ष नसताना काही गोष्टी करणे हे स्मिथला भोवले. ऑस्ट्रेलियाच्या परंपरेत स्मिथ पक्का बसतो मात्र, त्याच्या बाललीलांमुळेच त्याचे कर्णधारपद गेले. एकीकडे मीडिया ट्रायल करायची, माध्यमांमध्ये वाट्टेल तसे मत व्यक्त करत समोरच्या संघावर सामन्यापूर्वीच दडपण आणण्याचा प्रयत्न करायचा, तसेच प्रत्यक्ष सामन्यात समोरच्या संघातील सर्वात प्रमुख खेळाडूला स्लेजिंग करून जेरीस आणायचे हे असले उद्योग ऑस्ट्रेलियाचा संघ सातत्याने करतो, तेच स्मिथही करायचा मात्र, अन्य कर्णधारांना कुठे थांबायचे ते समजत होते व स्मिथ तिथेच कमी पडला.
आपल्या संघाचा कर्णधार सौरव गांगुली किंवा महेंद्रसिंह धोनी असताना ज्या पद्धतीने नवोदितांना संधी दिली जात होती तसेच नवख्या खेळाडूवर लगेचच मोठी जबाबदारी देण्याचे सामर्थ्य या दोन कर्णधारांकडे होते तीच स्मिथचीही गुणवत्ता होती. मात्र, कधी कधी त्याचा संयम सुटायचा आणि त्याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागायचे. अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा पोरगा सुधारणार नाही हे मान्य केले व त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले. त्यांच्या मंडळाने ऍरन फिंचपासून अनेक खेळाडूंकडे नेतृत्व देऊन पाहिले; परंतु टिपिकल खडूस वृत्तीचा कर्णधार अद्याप त्यांना गवसलेला नाही. अन्य संघातील कित्येक खेळाडूंनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केले मात्र, अद्याप ऑस्ट्रेलियाला त्यांच्या परंपरेतील कर्णधार गवसलेला नाही.
दर्जा कमी झाला हेच सत्य
काही वर्षांपूर्वी जेव्हा ऑस्ट्रेलियाचे पहिले पाच फलंदाज बाद व्हायचे तेव्हा सायमंड्स, मायकल बेव्हनसारखे खेळाडू टिच्चून उभे राहायचे. तसेच त्यांच्याकडे आपल्या राहुल द्रविडसारखा स्टीव्ह वॉ होता. कित्येकदा त्याने तळातील फलंदाजांना हाताशी घेत निसटलेले सामने संघाला जिंकून दिले आहेत. जिंकणे हेच त्यांचे अंतिम ध्येय असायचे व त्यासाठी ते कोणत्याही थराला जायचे. त्यांचा माजी कर्णधार बॉर्डर एकदा म्हणाला होता की, संध्याकाळी कोणता संघ जिंकला हेच पाहणे महत्त्वाचे असते व आम्हाला पराभव पचवायला अन्य संघांपेक्षा जास्त वेळ लागतो. हे खरे आहे कारण शारजामध्ये जेव्हा सचिनने त्यांची पिसे काढली होती, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त धसका सचिनचाच घेतला होता. त्यानंतर तो कोलकातातील कसोटी सामना ज्यात ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन दिला व व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडने इतिहास घडवला. त्यानंतर आजवर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला कधीही फॉलोऑन दिला नाही.
शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा किंवा त्यानंतरचा ब्रेट ली असे नानाविध अफलातून गोलंदाज त्यांच्या भात्यात असूनही त्यांची डाळ भारताविरुद्ध कधीही शिजली नाही. स्पर्धा तिरंगी असो, कसोटी मालिका असो किंवा द्विपक्षीय सामने असोत त्यांचा अश्वमेध सातत्याने भारतानेच रोखला आहे. यंदा भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही त्यांना सलामीच्या लढतीत भारताकडूनच पराभूत व्हावे लागले. 2 बाद 74 अशा स्थितीतून त्यांचा संपूर्ण संघ 199 धावांवर गारद झाला. हा तो पूर्वीचा ऑस्ट्रेलियाचा संघ नाहीच. त्यांचे 9 फलंदाज बाद झाले तरीही ते संयम या शब्दावर विश्वास ठेवत नाहीत व आपल्याच गर्वात खेळतात व अगदी काल परवापर्यंत जिंकतही होते. आता त्यांच्या संघातील हेच किलर इंकस्टिन गायब झाल्यासारखे वाटते.
सेंटर ऑफ एक्सलन्सवरच मदार
ऑस्ट्रेलियाला अफलातून क्रिकेटपटूंचा पुरवठा करत असलेले क्रिकेट सेंटर ऑफ एक्सलन्सनेच आता यावर तोडगा काढायला हवा. त्यांनी त्यांच्या देशात खेळल्या जात असलेल्या शेफिल्ड शिल्डपासून यच्चयावत स्पर्धांमधून खेळाडू निवडून त्यांना तयार केले पाहिजे. जागतिक क्रिकेटमध्ये जी अवस्था वेस्ट इंडिजची झाली त्याच उंबरठ्यावर आज ऑस्ट्रेलियाचा संघ उभा आहे. भारतीय संघाचा दबदबा वाढत आहे ही आपल्या संघाची चांगली गोष्ट आहे. पण दात व नखे काढलेल्या वाघाविरुद्ध जिंकण्यात काय मजा आहे. आज तरी ऑस्ट्रेलियाच नव्हे तर पाकिस्तानसह अनेक संघांची हीच अवस्था आहे. यातून पाकिस्तानची शाश्वती उरलेली नसली तरीही ऑस्ट्रेलियाकडून फिनिक्स भरारीची अपेक्षा निश्चितच आहे. ऑस्ट्रेलियाबाबत एकूण बोलायचे तर गर्वाचे घर केव्हाच खाली झाले आहे, आता गरज आहे ती नव्या जोमाने उभे राहण्याची. ऑस्ट्रेलियाचा संघ यात यशस्वी होणार का, हेच आता पाहायचे आहे.
अमित डोंगरे