पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ चार वर्षे विजनवास भोगल्यानंतर मायदेशी परतले आहेत. येताच त्यांनी लाहोरमध्ये भाषण करून पुढील दिशा स्पष्ट केली. पाकिस्तानची दयनीय अवस्था आणि बुडणारी बोट वाचविण्यासाठी अनुभवी चेहऱ्याची गरज होती. सत्तेच्या चाव्या पडद्यामागून फिरविणाऱ्या पाक लष्कराला नवाज शरीफ यांच्या रूपाने हा चेहरा मिळाला आहे. नवाज यांनीही सर्वस्व ‘अल्लाह’च्या इच्छेवर सोडले आहे.
नवाज शरीफ यांना पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे ते गेल्या चार वर्षांपासून परागंदा झाले होते. आता पाकिस्तानमध्ये लष्कराला नवाज शरीफ हवे आहेत. त्यामुळे नवाज यांच्यावरील आरोप मागे घेण्याची तयारी तेथील न्यायव्यवस्थेने केली आहे. नवाज यांचे आगमन होताच त्यांना जामीन देण्यात आला. नवाज यांच्या आगमनाने तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तेथे होणाऱ्या सर्व घडामोडींवर भारताला बारीक लक्ष ठेवावे लागेल.
पाकिस्तानात लष्कराला जे हवे तेच होत असते. शरीफ यांच्या पाकिस्तानात परतण्याची योजना बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्यांना पूर्ण नियोजन करून परत बोलाविण्यात आले आहे. त्यांच्या भावाने आधीच नवाज यांच्या घरवापसीची घोषणा केली होती. त्यांच्या परतण्याने सगळ्याचा हिशेब झाला आहे. यामध्ये त्यांना लष्कराचे छुपे संरक्षणही आहे. लष्कराच्या संमतीशिवाय शरीफ पाकिस्तानात आलेले नाहीत. निवडणुकीद्वारे सत्ता मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. लष्कराला इम्रान खान यांच्या लोकप्रियतेची बरोबरी साधायची असेल, तर पाकिस्तान राजकारणात असलेली एकच व्यक्ती इम्रान यांच्या उंचीची आहे आणि त्यांना उघडपणे आव्हान देऊ शकते, ती म्हणजे नवाज शरीफ. त्यामुळे संपूर्ण अजेंडा घेऊन, संपूर्ण आराखड्यासह त्यांना आणण्यात आले आहे.
त्यांचे लाहोरमधील भाषण पाहिल्यास, त्यांनी ज्या काही मुद्द्यांना स्पर्श केला आहे, ते केवळ देशांतर्गत राजकारणावर होते. त्यांनी प्रथम आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली. पाकिस्तानात जागतिक नाणेनिधीचा निधी पूर्णपणे संपला आहे. पाकिस्तानात प्रचंड महागाई आहे. तेथे विजेची टंचाई आहे. महागाई असो वा अन्य कोणताही मुद्दा; शरीफ यांनी त्या सर्व मुद्द्यांना स्पर्श केला त्याचा परिणाम पाकिस्तानच्या देशांतर्गत राजकारणावर होतो. आपल्यात सुडाची इच्छा नसल्याचेही शरीफ यांनी म्हटले आहे.
म्हणजे ते पुन्हा सत्तेत आले तरी कोणाचाही सूड घेणार नाहीत. त्यामुळे हे सर्वस्वी निवडणुकीच्या राजकारणासाठी घडत असून नवाज जे बोलत आहे, त्यामागे लष्कर आहे. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता पूर्णपणे संपुष्टात यावी, यासाठी लष्करही प्रयत्नशील आहे. इम्रान खान सध्या तुरुंगातच राहणार आहेत. लष्कर इम्रान खान यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ठेवेल, असे दिसत आहे. त्यांचा पक्ष निश्चितपणे निवडणूक लढवणार असून ते तुरुंगातूनही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांचा पक्ष आणि शरीफ यांचा पक्ष यांच्यात थेट लढत होणार असून केवळ नवाज शरीफ यांचा पक्ष (मुस्लीम लीग-एन) जिंकेल असे फासे लष्कराकडून टाकले जातील.
पाकिस्तानचा हिशेब अगदी सोपा आहे, ज्याला लष्कराचा आशीर्वाद मिळतो तो जिंकतो आणि या वेळी इम्रान खान यांना लष्कर अनुकूल नाही. लष्कराचा त्यांना आशीर्वाद नाही. लष्कर सध्या त्यांच्यावर नाराज आहे, ते सत्तेवर येऊ शकणार नाहीत. पाकिस्तानमध्ये अल्लाह, आर्मी आणि अमेरिका हे तीन “अ’ अत्यंत महत्त्वाचे आहेत. शरीफ यांनीही भाषणाच्या शेवटी म्हटले आहे की, ते सत्तेवर येणे केवळ अल्लाहच्या इच्छेवर अवलंबून आहे. शेवटी त्यांनी सर्व काही अल्लाहवर सोडल्याचे सांगितले आहे. शरीफ यांना लष्कराचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ते अल्लाहच्या नावाचा जप करत असल्याने त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे;
मात्र 2018 मध्ये जेव्हा लष्कराने नवाज यांना हटवले, तेव्हा उभयतांत संबंध अजिबात चांगले नव्हते; पण आता समीकरणे बदलली आहेत. आपली सर्वोत्तम खेळी शरीफ यांच्याद्वारेच शक्य असल्याचे लष्कराला वाटत आहे. किमान लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे,हे लष्कराला दाखवून द्यावे लागेल. नवाज हे लष्करासाठी फेव्हरेट आहेत. तालिबान पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत नाही, तर दहशतवादी घटनांमध्ये हस्तक्षेप करतो. तेथील पश्तून पट्ट्यात दहशतवाद्यांचे जाळे वाढत आहे. आयएसके आणि तहरिक-तालिबानचे जाळे तेथे पसरले आहे. शरीफ यांना तालिबानचा पाठिंबा आहे आणि त्यांचे संबंध खूप मधुर आहेत.
पाकिस्तानसोबत चीनचा “चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ शरीफ यांच्या काळात बांधला गेला. शरीफ पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानचे चीनशी संबंध सुधारतील आणि संबंध सुधारले म्हणजे चीन पाकिस्तानला अधिक निधी देण्यास राजी होईल, असे पाकिस्तानी लष्कराला वाटते. याशिवाय तालिबानशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्या आघाडीतही थोडी सुधारणा होईल. याशिवाय ते लोकशाहीवादी चेहराही आहेत. या वेळी थेट सत्ता ताब्यात घ्यायची नाही, असे लष्कराचे गणित आहे. लष्करला शरीफ यांना प्रस्थापित करायचे आहे. इम्रान खान तुरुंगातून बाहेर यावेत असे लष्कराला वाटत नाही. राजकीय अस्थैर्य दूर करून लष्कर अप्रत्यक्षपणे सत्तेच्या चाव्या हाती ठेवेल. ही पाकिस्तानची संरचनात्मक समस्या आहे, की तेथील राज्यव्यवस्था लष्कराशिवाय काम करू शकत नाही. तेथे जो कोणी सत्तेवर येतो, त्याला लष्कराच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते.
नवाज यांच्या पुनरागमनावर नजर टाकली, तर त्यांची पूर्वीची कारकीर्द भारताशी जुळवून घेणारी होती. भारताशी संबंध सुधारावे लागतील. पाकिस्तानच्या बाबतीत आपण नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण, आपल्या पाठीत तीन-चार वेळा वार केले गेले आहेत. त्यामुळे धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चार वर्षांनंतर दुबई विमानतळावरून पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी शरीफ यांनी पत्रकारांना या आशादायक गोष्टी सांगितल्या. आता ते पाकिस्तानात परतले आहेत. त्यांच्या पाकिस्तानात परतण्याचा परिणाम समजून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात डोकावयाला हवे.
लंडनला निर्वासित होण्यापूर्वी, ते एव्हनफिल्ड आणि अल-अझिझिया सारख्या गुंतवणुकीशी संबंधित भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात पाकिस्तानच्या तुरुंगात दीर्घ शिक्षा भोगत होते. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले; पण पनामा पेपर्स लीक प्रकरणी 2017 मध्ये त्यांना पंतप्रधानपदावरून हटविण्यात आले. त्यांच्यावर दहा वर्षे कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात आली होती. आजारपणावर उपचाराच्या बहाण्याने ते लंडनला गेले आणि नंतर तेथेच राहिले. आता ते मायदेशी परतल्याने त्याच्यावर प्रलंबित असलेल्या खटल्यांचे आणि शिक्षेचे काय झाले हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. एव्हनफिल्ड आणि अल-अझिझिया प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.
अचानक सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. असे चमत्कार पाकिस्तानात वारंवार घडतात. इम्रानप्रमाणेच तोशाखान्याच्या गैरवापराशी संबंधित खटला शरीफ यांच्यावरही आहे, ज्यात जारी केलेले वॉरंटही पुढे ढकलण्यात आले आहे. त्यांच्या पाकिस्तानात परतण्याचा मार्ग मोकळा करण्याची क्षमता पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांच्याशिवाय इतर कोणातही नाही. याशिवाय पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, जे इम्रान खानचे समर्थक होते आणि गंभीर खटल्यांमध्येही त्यांना जामीन देत होते, ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी काझी फैज ईशा सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर विराजमान आहेत. त्यामुळे शरीफ यांना गंभीर प्रकरणातही दिलासा मिळत आहे.
साहजिकच न्यायव्यवस्था आणि राज्यव्यवस्था यांच्याशी पाक लष्करप्रमुख यांनी हातमिळवणी केली आहे. तेथील निवडणुका अनिश्चित काळासाठी रोखणे पाकिस्तानी लष्कराला शक्य नाही; मात्र लष्कर निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत असल्याचे भूतकाळातील अनुभव सांगतात. निवडणुकांच्या ‘व्यवस्थापनात’ लष्कराच्या निर्णायक भूमिकेमुळे पाकिस्तानातील लोकशाही ही केवळ औपचारिकता राहिली आहे. पाकिस्तानी लष्कराला स्टाफ कॉलेज ट्रेनिंगमध्ये इस्लामिक युद्धाच्या पद्धती शिकवल्या जातात. पाकिस्तानी लष्करालाही मोठ्या प्रमाणावर धर्मयुद्धासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. शरीफ यांचे पाकिस्तानात परतणे ज्या प्रकारे न्यायालयीन यंत्रणा उद्ध्वस्त करून शक्य झाले आहे, त्यावरून आसिफ मुनीर यांनाही शरीफ यांच्याकडून अपेक्षा असतील, असा अंदाज बांधता येतो. शरीफ सत्तेवर आले तर त्यांची ही चौथी खेळी असेल.
या नव्या गेमप्लॅनमध्ये पाकिस्तानी लष्कराला कोणत्याही पक्षाने प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकायची नाही. इम्रान खान यांच्याशी बरोबरी शरीफच करू शकतात, याचे आकलन पाकिस्तानी लष्कराने केले असावे. सर्व खटले आणि शिक्षा पुढे ढकलून नवाझ शरीफ यांचे परतणे विनाकारण झालेले नाही. अशा प्रकारे, सैन्य नेहमीप्रमाणेच किंगमेकर आणि नियंत्रकाची भूमिका बजावत राहील. शरीफ हे मुळात उद्योजक आहेत. व्यापारी स्वभावाचे नेते आहेत. त्यांना आर्थिक स्थितीची समज इम्रान खानपेक्षा खूप चांगली आहे. आता पाकिस्तानला हे समजू लागले आहे, की चांगल्या अर्थव्यवस्थेशिवाय ते पुढे चालणार नाही.
नवाज यांचे मुस्लीम देशांशी चांगले संबंध आहेत. ते पुन्हा सत्तेवर आल्यास खाकी वर्दीच्या इशाऱ्यावर (अपेक्षेप्रमाणे) चालेल, अशी आशा लष्कराला आहे. मुळातच शरीफ यांचा राजकीय जन्मच दिवंगत लष्करी हुकूमशहा झियाउल् हक यांनी घातला होता. त्यांच्यावर राजकीय बालंट तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांच्याशी बिनसल्याने आले होते. काही वर्षांनी शरीफ पुन्हा सत्तेत आले तेव्हाही त्यांचे लष्कराशी बिनसल्याने पुन्हा सत्ताहीन व्हावे लागले. मागील इतिहास पाहता शरीफ हे लष्कराशी पंगा घेतील असे सुतराम वाटत नाही. त्यांच्या घरवापसीत पाकिस्तानचे भवितव्य दडले आहे.
– आरिफ शेख