हे या जन्मात तरी शक्य नाही! किंवा डोळे मिटण्याआधी तरी मला नातवाचं/नातीचं तोंड बघू दे! अशी वाक्यं आपण अनेकदा ऐकतो. या सगळ्यांमध्ये त्या त्या गोष्टी ती व्यक्ती जिवंत असे तोपर्यंत शक्य नाहीत, असं गृहीत धरलं जातं. याचाच अर्थ आपल्याला आपल्या आयुष्याची मर्यादा माहीत असते किंवा मर्यादेची कल्पना असते. आयुष्याला अर्थातच मर्यादा आहे कारण कुणीही अमर नाही.
भगवद्गीतेत म्हटलं आहे:
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
याचा अर्थ, ज्या ज्या गोष्टींची उत्पत्ती होते त्या त्या गोष्टी निश्चितच लयाला जातात. आयुर्मर्यादा म्हणजे ज्या जास्तीत जास्त काळापर्यंत व्यक्ती किंवा सजीव जिवंत राहू शकेल असा काळ. आयुर्मर्यादा आणि आयुर्मान यात फरक आहे. आयुर्मान याचा अर्थ वेगळा आहे. आयुर्मान म्हणजे सर्वसामान्यतः व्यक्ती किंवा सजीव किती काळापर्यंत जगेल याचं अनुमान. याला इंग्रजीत “लाइफ एक्स्पेक्टन्सी’ असं म्हणतात. उदाहरणार्थ, मानवाची आयुर्मर्यादा 120 वर्षे आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण 1997 साली मृत्यू पावलेली जेन कॅलमेंट ही फ्रेंच स्त्री तब्बल 122 वर्षे जगली.
आयुर्मान प्रत्येक देशात वेगळं असतं. तसंच ते पुरुष व स्त्री यांच्यातही भिन्न असतं. जागतिक पातळीवर सरासरी पुरुषाचं आयुर्मान 68.9 वर्षे तर स्त्रीचं 73.9 वर्षे आहे. भारतासाठी हेच आयुर्मान अनुक्रमे 65.8 आणि 68.9 असं आहे. म्हणजे भारतीय स्त्रीचं आयुर्मान हे जागतिक पुरुषाच्या आयुर्मानाएवढं आहे.
गमतीची गोष्ट अशी की सर्वात जास्त आयुर्मानाचा मान हॉंग कॉंगला मिळाला असला (83.2 व 87.9) तरी शंभर वर्षांच्या वर वय असलेली जगात सर्वात जास्त म्हणजे नव्वद हजारांच्यावर माणसं जपानमध्ये आहेत. सर्वात कमी आयुर्मान असलेला देश म्हणजे आफ्रिकेतील चाड देश आहे. तिथे पुरुषाचं आयुर्मान 50.8 वर्षे तर स्त्रीचं 54.3 वर्षे आहे. अर्थातच आरोग्याची खालावलेली पातळी हे या कमी आयुर्मानाचं कारण आहे.
सामान्यतः स्त्रीचं आयुर्मान हे सर्वत्र पुरुषापेक्षा नक्कीच जास्त असतं. तसंच हे चित्र सर्व देशांमध्ये दिसून येतं. याचं कारण स्त्री सतत घेत असलेले कष्ट असं सांगितलं जातं. आपण जर सतत काम करत राहिलं तर तीच दीर्घआयुष्याची गुरूकिल्ली ठरू शकते, असं समजायला हरकत नाही. स्त्रीची कष्ट करण्याची आणि रोगराई, वेदना यांचा सामना करण्याची क्षमताही पुरुषांपेक्षा खूप जास्त असते, असं आढळून आलं आहे.
प्राणिजगतात मुंगीसारख्या कीटकाचं आयुर्मान हे सहा महिन्यांचं असतं. दिव्यावर झेप घेणाऱ्या कीटकांचं आयुष्य तर केवळ काही दिवस असतं. हत्ती आणि पोपट 80 वर्षांपर्यंत जगू शकतात. गॅलॅपॅगोस येथील भूचर कासवाचं आयुर्मान 200 वर्षांचं आहे, तर एका समुद्री सूक्ष्म जलचराचं आयुष्य 500 वर्षांपर्यंत आहे, असा दावा केला जातो. केवळ विभाजनानं पुनरुत्पत्ती करणारा अमिबा तर अमरच म्हटला पाहिजे.
मानवी जीवन हे मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा कसं जगला याला जास्त महत्त्व आहे.
समाधानी आणि निरोगी आयुष्य हेच सर्वंकष ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी योग्य, नियमित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावाशिवाय काम हे आवश्यक घटक आहेत.
रणजित देसाई लिखित “स्वामी’ कादंबरीतील एक वाक्य आठवतं: रमा, कोण किती जगला यापेक्षा कसं जगला याला महत्त्व आहे… असं काहीसं ते वाक्य आहे. याच प्रकारचा एक संवाद हृषिकेश मुखर्जींच्या “आनंद’ चित्रपटातही आहे. त्यात आनंद (राजेश खन्ना) म्हणतो, बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं!
चला तर मग आयुर्मर्यादेकडे आणि आयुर्मानाकडे एक डोळा ठेवून समाधानी आणि समृद्ध आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू या.
– श्रीनिवास शारंगपाणी