काही काही पदार्थ आणि त्यांच्या खाण्याच्या वेळा यांचं एक समीकरण, कॉम्बिनेशन असतं. त्या विशिष्ट वेळी तो पदार्थ खाताना जी चव लागते तिची खुमारी काही औरच असते. सकाळी नऊ दहा वाजता नाश्त्याच्यावेळी दिलेली वाफाळलेली इडली आणि ओल्या नारळाची चटणी… ऐन दुपारी साडेबारा एक वाजता उकाड्याच्या दिवसात वाढलेली खरपुस पुरणपोळी आणि तिच्यावरचं साजुक तुपाचं वर्तुळ… आणि संध्याकाळ ऑफीसमधून थकुनभागून आल्यावर समोर येणारी गरमागरम कांदाभजी… या वेळच्या चवीला जी लज्जत असते तिची सर त्या पदार्थाला इतर कोणत्याही वेळी येत नाही.
अशी ही कांदाभजी आणि नंतर येणारा वाफाळलेला चहा “फ्रेश’ करत असला तरी कांदाभजी अथवा इतर कोणतीही भजी खाण्याचा एक हटके “माहोल’ असतो. भजी आणि पाऊस यांच काय नातं आहे मला माहीत नाही. पण वर्षा ऋतूचा पहिला शिडकावा आणि कुंद झालेल्या वातावरणात आपल्या रसनेला गरम गरम भजींची आठवण सगळ्यात आधी येत असते!
अशीच संध्याकाळी पाच सहाची वेळ… बाहेरून चिंब भिजून आलेल असावं… पावसाची रिपरिप… हवेत किंचित गारठा… पावसाळी वातावरण आणि समोर बायकोनं आणून दिलेली गरमागरम कांदाभजीची प्लेट… किंवा एखाद्या पावसाळी रविवारी, जिवलग मित्रमंडळींची किंवा सग्या सोयऱ्यांची मैफल जमलेली असावी… गप्पांना रंग चढलेला असावा… किचनमधल्या भज्यांच्या तळणीचा गंध घरभर पसरलेला असावा… आणि समोर ठेवलेल्या गरम गरम चहाचा स्वाद घेऊन आलेली वाफ आपल्या आजूबाजूला पसरलेली असावी… आणि मैफिलीतील एखाद्या “धाकल्या दिरा’नं किंवा मित्रानं बेचैन होऊन आवाज द्यावा… अहो वैनी… किती वेळ… काय भज्याचं पीठ आणायला पाठवलं की काय कुणाला..! का आज नुसतं वासावरच भागवायचा विचार आहे तुमचा? आणि मग अख्खी “मैफल’ हास्यकल्लोळात बुडून गेलेली.
“विंदा’च्या शब्दांत सांगायचं झालं तर त्यावेळेपुरतं तरी आपल्यासाठी जगात “खाद्यात्मिक अनुभूती’चं वेगळ काही परमोच्च सुख असूच शकत नाही. कांदाभजी दिसायला मात्र अगदीच साधारण, कुरूप या सदरात मोडणारी… “रंग माझा वेगळा’ म्हणणारी… मिरची भजी वेडीवाकडी उंच वाढलेली, तर तळलेली कांदाभजी एखाद्या चायनीज हॉटेलमध्ये “व्हेज क्रॅबस्’ म्हणून सहज खपून जाणारी… बटाटा भजी ही स्थूल अंगाची, तर पालकभजी नको तेवढ्या बारीक बांध्याची… मिरची भजी रागीट, कांदाभजी कडक तर बटाटा भजी शांत स्वभावाची… पण कोणत्याही प्रकारची भजी खाताना त्याबरोबर गोड चटणी किंवा एखादा सॉस खाणं म्हणजे भजी या खमंग आणि चटकदार पदार्थाचा घोर अपमान आहे. अशा अरसिकांनी पिझ्झा किंवा बर्गर यांच्या स्टॉलवर जावं आणि सॉसची बाटली रिकामी करावी हे उत्तम.
अशा भजी या रगेल आणि रंगेल पदार्थाची तशीच अवखळ नटखट मैत्रीण म्हणजे फक्त आणि फक्त तळलेली हिरवी मिरची. किंबहुना तळलेल्या हिरव्या मिरचीशिवाय भजी खाणं म्हणजे साजूक तुपाच्या धारेशिवाय पुरणपोळी किंवा लालभडक तवंग असलेल्या “तर्री’ शिवाय कोल्हापुरी मिसळ खाण्यासारखं.
अशी ही भजी कोणत्याही राशीची असली तरी सगळ्यांशी तिचे “छत्तीस’ गुण जमतात. अगदी वाड्यावस्तीवरच्या पत्र्याबांबूच्या टपरीमधील प्लॅस्टिकच्या तुटक्या डिशपासून ते श्रीमंताच्या लग्नात वधूवरांच्या चांदीच्या ताटापर्यंत भजी थाटामाटात बसलेली असतात.
भजीची प्लेट समोर आलेली असताना मला नाही आवडत भजीबिजी, असं म्हणणारा कुणी भेटला तर त्यानं महाराष्ट्रात राहू नये, असं माझं ठाम मत आहे. हे म्हणजे स्वर्गामध्ये इंद्रानं आपल्या पत्नीला प्रिये, आजकाल मला अमृत नको वाटायला लागलंय, पूर्वीसारखं गोड (मधुर म्हणायला पाहिजे) राहिलं नाही, असं म्हणण्यासारखं झालं.
अशी ही भजी खाण्याचा एक अवघड प्रसंग म्हणजे प्रवासात एसटीची बस रस्त्यात चहासाठी थांबल्यावरचा… थांब्यावरची गरम भजी खाता खाता आपलं थोडं लक्ष भजांकडे, थोडं लक्ष ड्रायव्हर कंडक्टर कुठे बसलेत इकडे आणि उरलेलं
एसटीतल्या आपल्या सामानाकडे असतं आणि त्यावेळी घाईघाईत खाल्लेल्या भजांचे चटके प्रवास संपेपर्यंत आपल्याला जाणवत राहतात.
हल्ली भजांच्या गाड्यांवर “इथे घाण्याचे शुद्ध तेल वापरले जाते’ अशा पाट्या लिहलेल्या असतात! (त्याच्या कपड्यांवर पडलेल्या या “शुद्ध’ तेलाच्या काळ्या तपकिरी डागांकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचं असतं) तिथली भजी खाणं ह्याचं एक वेगळंच “थ्रील’ असतं… काळ्याकुट्ट कढईत गरम तेलात भजी तळत असताना ती कढईतील गरम गरम भजी घेण्यासाठी आपण वाट बघत थांबलेले असतो…
जसजसा कढईत झारा फिरायला लागतो तसतसं तोंडाला सुटणारं पाणी वाढायला लागतं… आणि झारीत भजी घेऊन तो जेव्हा बाहेर काढतो आणि असं वाटतं की आता आपल्या प्लेटमध्ये ती येणार… तो पुन्हा ती भजी कढईत सोडून देतो… आणि आपली अवस्था मात्र पाहू रे किती वाट अशी होऊन जाते. त्यावेळचं ते जे फिलींग आहे ते प्रत्यक्षच अनुभवावं लागतं, शब्दांत पकडता येत नाही. चला, तर मग आता चौकातल्या भजांच्या गाडीवर प्रत्यक्षच ते अनुभवायला… नाहीतरी बाहेर पाऊस सुरू झाला आहेच…
– कृष्णकेशव