बऱ्याच वेळेला आपल्याला “कळतंय पण वळत नाही’ अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. आपल्याला काही अनुकूल बदल स्वीकारायचे असतील तर थोडी मनाला उभारी द्यायलाच हवी, ती कशी द्यावयाची याविषयी थोडेसे…
आपल्याला काही आपल्या आवडी-निवडी असतात. काही चांगल्या वाईट सवयी असतात, पण खरे पाहिले तर आवडी-निवडी, चांगल्या वाईट सवयी हे सर्व मनाचे खेळ आहेत. म्हणूनच आपण आपल्या मनाला योग्य ती दिशा दाखवायची आहे. आपणच आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या आपल्या मनाला आपल्या प्रगतीचे साधन बनवायचे आहे.
आपल्याला काही साध्य करावयाचे असेल, तर त्यासाठी जे गुण आपल्या अंगी असणे आवश्यक आहे ते असावेच लागतात. जर आवश्यक ते गुण नसतील तर ते आत्मसात करावेच लागतात, तेव्हा कुठे आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला जर उत्तम कसरतपटू व्हावयाचे असेल, तर बऱ्याच सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतील. सकाळी लवकर उठणे, व्यायामाचा कंटाळा न करणे, जिभेवर संयम ठेवणे अशा कितीतरी सवयी लावून घ्याव्या लागतील तेव्हा कुठे आपण कसरतपटू होऊ. यातील एक जरी सवय आपण लावून घेतली नाही, दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम कामगिरीवर होतो. कामगिरी खालावते.
आपण काम करत असतानाही आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घ्यावयाच्या असतात. अशा चांगल्या सवयींमुळे आपलेच काम सुसह्य होत असते. आपल्याला कोणतीही वस्तू शोधावी लागू नये यासाठी ती जागच्या जागी ठेवणे आवश्यक असते. जर नाही ठेवली तर ती वस्तू शोधण्यात वेळ जाईल. जो वेळ जाईल तो कामातला महत्त्वपूर्ण वेळ जाईल. परिणामी आणखी चांगले काम करण्याची क्षमता असूनही आपली कामगिरी खालावली जाईल. बरेचजण असे असतात की, त्यांना वेळेचे महत्त्व हे फक्त रस्त्यावरून गाडी चालवीत असतानाच जाणवते. वेळ वाचविण्यासाठी अतिशय वेगात, नियम मोडून गाडी पळवतील, पण हीच मंडळी त्यांच्या गबाळेपणामुळे आयुष्यातील बराच वेळ वाया घालवीत असतात, हे लक्षात घ्यायलाच तयार नसतात.आपण आपल्या वेळेचे महत्त्व जाणतो म्हणूनच फक्त स्वतःला थोडी शिस्त लावून वस्तू जागच्या जागी ठेवून, प्रत्यक्ष कामाचा वेळ वाचवू शकतो आणि अधिक प्रभावीपणे वापरू शकतो.
कधी आपल्याला एखादे काम वेळेत पूर्ण करावयाचे असते. अशा कामाला आपण उशिरा सुरुवात केली, तर जस जशी अंतिम दिनांक जवळ येत जाते तसतशी आपली जास्त धावपळ होते, कामाचा ताण वाढू लागतो, जाणवू लागतो. तर इतर कामाला आपण वेळच देऊ शकत नाही. असे एक दुष्टचक्रच सुरू होते. एका कामाचा परिणाम दुसऱ्या कामावर होत असतो, अशा प्रकारे एक ना धड भाराभर चिंध्या, असे होऊन जाते. म्हणूनच आपण ज्या कामाची वेळेची मर्यादा आहे, ते काम वेळीच सुरू करून, त्या कामासाठी योग्य तो दर्जा राखण्यासाठी श्रम व वेळ देऊन चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकतो. याशिवाय इतरही काम व्यवस्थित पूर्ण करू शकतो. फक्त गरज आहे ती योग्य त्या नियोजनाची.
सुरुवातीला आपल्याला शिस्त अंगी रुजविण्यासाठी थोडा त्रास होईल, पण एकदा का शिस्त अंगी बाणावली गेली की पुढचे सर्वच काम सुसह्य आणि दर्जेदार होत जाते. बऱ्याच प्रसंगी आपण आपल्या चांगल्या सवयींमुळे खूप फायद्यात राहू शकतो. आपण कोणाला धनादेश देण्यापूर्वी जिथे रकमेचा आकडा लिहिला जातो त्यावर पारदर्शक चिकटपट्टी चिटकवून दिली, तर त्या धनादेशात कोणालाही फेरफार करता येत नाही. येथे चिकटपट्टी चिटकविण्याचा आपण कंटाळा केला, तर कोणी गैरफायदा घेऊ शकतो. पुढचा सगळा सव्याप-सव्य टाळण्यासाठी आपल्याला फक्त चिकटपट्टी लावून धनादेश देण्याची सवय लावून घ्यावयाची आहे.
एखादी सवय लावून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्रास होऊ शकतो. सुरुवातीला आपले मन नवीन सवय स्वीकारत नाही, पण आपण जर थोडा मोह टाळला तर आपल्या जीवनातील नवीन बदल कमी कालावधीत स्वीकारू. आपण जर ठरविले की बिन साखरेचे दूध आता रोज प्यावयाचे. पहिल्या दिवशी बिन साखरेचे दूध आपल्याला अजिबात आवडणार नाही. तरी आपण साखर टाकण्याचा मोह टाळून ते तसेच प्यावयाचे. दुसऱ्या दिवशी आपल्या मनाची थोडी तयारी झालेली असेल. असे रोजच होऊ लागते. अशा प्रकारे कोणतीही सवय लागण्यासाठी एकवीस दिवस पुरेसे असतात. बाविसाव्या दिवशी आपण एक प्रयोग करावयाचा. आज दूध पिताना साखर घालून प्यावयाचे. साखरयुक्त दूध आपल्याला आवडणार नाही. हीच ती सवय आपण आता पूर्णपणे मोडली. असे हे सर्व मनाचे खेळ आपण लक्षात घेऊन आपल्या मनाला आपणच आपल्या प्रगतीचे साधन बनवायचे आहे.
बऱ्याच वेळा काही नियम असतात. त्या नियमांचे पालन करणे सुरुवातीला जाचक वाटू शकते. ते नियम बनविताना सगळ्यांचा विचार करून बनविलेले असतात. सगळ्यांना समान वागूणक मिळाली पाहिजे यासाठीच नियम बनविलेले असतात. जसे एखादे काम करण्यासाठी सर्वजण रांगेत असतात. एखादा कोणी येतो तो रांगेत उभे न राहता पुढे जाऊ पाहतो. आपण असे करता कामा नये. जे नियम असतील ते डावलून नाही तर स्वीकारूनच काम केले पाहिजे. आपण सामाजिक भान राखून स्वच्छता राखली पाहिजे. नाहीतर सामाजिक आरोग्य धोक्यात येते. भारतात केवळ वाहतुकीचे किंवा इतर सामाजिक नियम पाळले जात नसल्याने बरेच नुकसान होत आहे. प्रत्येकानेच जर सर्वच नियम पाळावयाचे ठरविले आणि शिस्तबद्ध वर्तन ठेवले तर भारताची बरीच प्रगती होईल.
आपण आपल्या मन मंदिराच्या गाभऱ्यात बसून आपल्या मनोदेवतेला आपल्या शिस्तीची व संयमाची पुष्पे अर्पण करावयाची आहे, त्यामुळेच आपली मनोदेवता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या प्रगतीस सहाय्यभूत ठरणार आहे.
अनिकेत भालेराव