अविनाश साबळे याने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले व एका क्षणात त्याची कीर्ती जगभरात पोहोचली. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे, याचे साबळे हा सर्वोत्तम उदाहरण आहे.
बीडसारख्या छोट्या गावात जन्मलेला साबळे लहापणापासून धावण्याचा सराव करत होता. वयाच्या सहाव्या वर्षीपासूनच तो विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये धावू लागला व त्याचा वेग पाहून हा जागतिक कीर्ती संपादन करेल असा विश्वासच त्याने त्याच्या कामगिरीद्वारे दिला. मैदानी स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या भारतीय खेळाडूंची नावे पटकन घ्यायची ठरवले तरीही एका हाताची बोटे देखील कमी पडतात. साबळेने मात्र, आता दुसरा हातही तयार ठेवा पदकांची संख्या मी वाढवतो, हा दिलासा दिला व चीनमध्ये खराही करून दाखवला.
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत साबळेने 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. इतकेच नव्हे तर त्याने आता पुढील वर्षी पॅरिसला होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली दावेदारी प्रस्थापित केली. या स्पर्धेत त्याने 8-19-50 सेकंद वेळ देताना अन्य खेळाडूंच्या कामगिरीला मागे टाकले. या शर्यतीत केवळ 50 मीटरचे अंतर बाकी असताना साबळेच्या जवळपासही कोणी स्पर्धक नव्हता यावरूनच त्याचा वेग लक्षात येतो.
वयाच्या सहाव्या वर्षीपासून मैदानी स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी धावण्याचे स्वप्न साबळेने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खरे करून दाखवले, आता त्याच्याकडून पॅरिसमध्येही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. पतियाळात 2019 साली झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत साबळेने 7-20-20 अशी वेळ देत नवा उच्चांक प्रस्थापित केला होता. कुटुंबाची स्थिती बेताचीच असली तरीही आपला मुलगा देश पातळीवर नाव उंचावेल असा विश्वास त्याच्या वडिलांसह सगळ्यांनाच होता. त्यातच 12 वी पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्याला भारतीय सेनादलात नोकरीही मिळाली. त्यामुळे त्याला थोडेफार आर्थिक स्थैर्यही प्राप्त झाले.
त्याने गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णयश मिळवले होते. मात्र, त्याला ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या मिळालेल्या नाहीत. मध्यंतरी त्याच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत करण्याची मागणीही सरकारकडे केली होती. खेलो इंडिया, साई व टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) या योजनांचा काही प्रमाणात त्याला लाभ झाला मात्र, चीनमध्ये जे यश त्याने मिळवले ते केवळ त्याच्या जिद्दीमुळे. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले. एकतर त्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवेलच; पण आगामी पॅरिस ऑलिपिकची पात्रताही मिळवली. पी. टी. उषा व मिल्खा सिंग यांच्या पाठोपाठ आता येणारी पिढी साबळेचे नाव घेणार यात शंका नाही.
कारण आजवर महत्त्वाच्या मैदानी स्पर्धेत असे भारतीय खेळाडू खूप कमी आहेत की ज्यांनी असा नावलौकीक मिळवला आहे. साबळे महाराष्ट्राचा खेळाडू असला तरीही आता तो देशाचा खेळाडू म्हणून ओळखला जाणार आहे. कधीकाळी 500 मीटरची मॅरेथॉन जिंकून केवळ 100 रुपयांचे बक्षीस मिळवलेल्या साबळेने आता आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वात मोठे यश मिळवले आहेत. त्याचे आई व वडील वीट भट्टीवर एक कामगार म्हणून काम करतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून पुढे आलेला साबळे नव्या पिढीसाठी प्रेरणा बनला यात शंका नाही. सेनादलात सेवा सुरू झाल्यावर त्याला मॅरेथॉनसाठी सहभागी व्हायचे होते. त्यावेळी त्याने 3000 मीटर स्टिपलचेसची निवड केल्यावर सरुवातीला अनेकांनी त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
केवळ 400 मीटर अंतर धावल्यावरही त्याला खूप थकल्यासारखे वाटायचे; पण त्याचे जिद्द सोडली नाही व त्याचवर्षी तो राष्ट्रीय विजेता बनला. ही केवळ स्वप्नवत वाटचाल नसून एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही. अमेरिकेतील मैदानी स्पर्धेत दोन महिन्यांपूर्वी त्याने 30 वर्षे अबाधित राहिलेला विक्रम आपल्या नावावर जमा केला. तेव्हाच त्याने आशियाई स्पर्धेसाठी तयारी सरू केली होती व आता त्यात सुवर्णयश मिळवल्यावर तो पॅरिससाठी सज्ज बनला आहे. जे यश देशाचा आणखी एक अव्वल धावपटू पानसिंग तोमर करू शकला नाही तो पराक्रम साबळेने केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळात सुवर्णपदक मिळवणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला. आता त्याच्याकडून करोडो देशवासियांचे स्वप्न असलेल्या सुवर्णपदकाची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपेक्षा आहे.
अमित डोंगरे