भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना आगामी पॅरिस ऑलिम्पिकबाबत अपेक्षा वाढवल्या आहेत. सिंधूने तिच्या कारकिर्दीत दोन वेळा ऑलिम्पिक पदके मिळवली आहेत; परंतु तिलाही सुवर्णपदकाने हुलकावणीच दिली आहे. त्यामुळेच तिच्यावर रजतकन्या हा शिक्का बसला होता. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत मात्र तिने ही नामुष्की पुसून काढताना एकेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
आता तिच्याकडून पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. कारकिर्दीला जवळपास 13 वर्षे झाल्यावरही सिंधूसमोरची दोन आव्हाने आहेत तशीच कायम राहिली आहेत. यातील पहिले आव्हान आहे ते ऑल इंग्लंड विजेतेपदाचे, तर दुसरे आव्हान आहे ते ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे. ऑल इंग्लंडमध्ये तिने सातत्यपूर्ण कामगिरी करूनही तिला आजवर पदकाचा रंग सोनेरी करता आलेला नाही. मात्र, ही उणीव तिने यंदा राष्ट्रकुलमध्ये भरून काढली. खरेतर फुलराणी सायना नेहवाल व सिंधू यांच्याकडे या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची क्षमता निश्चितच आहे; पण सायना आता पॅरिस ऑलिम्पिक खेळेल का, हाच मोठा प्रश्न आहे. सिंधूबाबत बोलायचे तर तिलाही कारकिर्दीची अखेर ऑलिम्पिक सुवर्णपदकाने व्हावी अशीच अपेक्षा असेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला नाही का कारकीर्द संपत असताना विश्वकरंडर विजेतेपदाची भेट मिळाली. तशीच आता सिंधूनेही देशवासीयांना ऑलिम्पिक सुवर्णपदकाची भेट द्यावी.
सेनचीही क्षमता
भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांचाच फाइंड असलेला लक्ष्य सेन सध्या केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा प्रस्थापित करत आहे. पदुकोन यांनीच या हिऱ्याला शोधले, त्याला पैलू पाडले व त्याने यंदा राष्ट्रकुलचे सुवर्णपदकही जिंकून आपल्या गुरूला सार्थ गुरूदक्षिणा दिली यात शंका नाही. आता येत्या काळात हाच लक्ष्य सेन आपले ऑलिम्पिक मटेरियल आहे हे देखील सिद्ध होईल. जागतिक स्तरावर लक्ष्य सातत्याने गेल्या दोन ते तीन मोसमांपासून विविध स्पर्धांमध्ये खेळत आहे व यशही मिळवताना दिसत आहे. आता केवळ त्याने ऑलिम्पिकचे पदकच नव्हे तर आपल्या गुरूप्रमाणे ऑल इंग्लंड स्पर्धेचेही विजेतेपद मिळवले तर भारताकडेही जागतिक बॅडमिंटनची महासत्ता म्हणून पाहिले जाईल यात शंका नाही.
चाळीशीतही शरथची कमाल
भारताचा सर्वात अनुभवी टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल याने वयाची चाळीशी पार केली यावर विश्वासही बसत नाही अशीच त्याने यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी केली आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत चार पदके मिळवताना वयाच्या चाळीशीतही आपणच सर्वोत्तम असल्याचेही सिद्ध केले. त्याने पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले. त्याने पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण तर, जी. साथियानसह पुरुष दुहेरीत रजतपदक पटकावले. तसेच श्रीजा अकुलासह खेळताना त्याने मिश्र दुहेरीचेही सुवर्णपदक मिळवले. यापूर्वी 2006 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने पुरुष एकेरीत सुवर्णपदक मिळवले होते. तर, 2010 साली भारतात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेतही त्याने वर्चस्व राखताना चार पदकांना गवसणी घातली. वय हा केवळ एक आकडा आहे हे त्याने सातत्याने दाखवून दिले आहे. कामगिरी कमी-जास्त होऊ शकते दर्जा मात्र, कायम राहातो हे त्याच्याकडे पाहून लक्षात येते. तो आगामी पॅरिस ऑलिम्पिकला पात्र होणार का, हा जरी प्रश्न असला तरीही त्याच्यापेक्षा एक प्रश्न मोठा झाला आहे तो म्हणजे त्याच्या तंदुरुस्तीचा. त्याने आपल्या तंदुरुस्तीकडे जास्त गांभीर्याने लक्ष दिले व पात्रता स्पर्धेत यश मिळवत पॅरिसची पात्रताही मिळवली तर तो देखील कारकिर्दीची अखेर ऑलिम्पिक सुवर्णपदकाने करू शकतो.
तंदुरुस्तीसाठी योजनाच हवी
जागतिक क्रीडा क्षेत्रात आज प्रत्येक खेळाडू सरस कामगिरी बरोबरच आपल्या तंदुरुस्तीवर जास्त लक्ष देताना दिसतात. आपल्या खेळाडूंना याबाबत आधी गांभीर्य नव्हते. आता विविध देशांचे खेळाडू पाहिल्यावर आपले खेळाडू देखील तंदुरुस्तीकडे लक्ष देत असल्याचे दिसते. मात्र, जर एखाद्या खेळाडूला ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा तत्सम मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असेल तर त्यांना याकडे लक्ष द्यावेच लागेल. इतकेच नव्हे तर स्पर्धांबाबत सिलेक्टिव्ह असले पाहिजे. कोणत्या
स्पर्धेत खेळायचे व कोणत्या स्पर्धेसाठी विश्रांती घ्यावी, आहार, व्यायाम यांबाबत आता भारतीय क्रीडा क्षेत्रातही योजना तयार केली जावी व त्यानुसार प्रत्येक खेळाडूने आपली कारकीर्द प्लॅन करावी अशी अपेक्षा आहे.