दुपारची वेळ होती. सुखदाच्या घरी सगळ्या जणी जमल्या. सगळ्यांची अंगतपंगत अंगणातच बसली. शमी म्हणाली, “आता खेळाला सुरुवात करूया. कोणता खेळ? नियम काय? कसा खेळायचा? ते सारं सांगते. पण त्यात जास्त वेळ नको घालवायला. म्हणतात ना, नमनाला घडाभर तेल नको.’ सुखदा लगेच हसली.
शमी म्हणाली, “आता हसायला काय झालं तुला?’ सुखदा म्हणाली, “अगं तू तुझ्या आईसारखंच डिट्टो बोलतेस.’ शमी म्हणाली, “म्हणजे कशी गं?’ सुखदा म्हणाली, “अगं, म्हणजे, तूसुद्धा बोलताना तुझ्या आईसारख्याच म्हणी वापरतेस.’ शमी हसतच म्हणाली, “अय्या, चला मला आता यावरूनच एक नवा खेळ सुचलाय.
आपण प्रत्येकीनेच आपल्यावर राज्य येताच एक एक म्हण सांगायची आणि तिचा अर्थसुद्धा.’ ऐश्वर्या म्हणाली, “सोप्पाय खेळ. चालेल. चला खेळूया.’ शमी म्हणाली, “खेळाचे नियम साधे सोप्पे. म्हण आणि तिचा अर्थ सांगायचा पण इथे कुठलीही म्हण सांगून चालणार नाही बरं का? जिच्यामध्ये संख्यांचा वापर केलाय तिच म्हण सांगायची. चालेल?’ अनन्या म्हणाली, “हो हो चालेल.’ कृतिका म्हणाली, “प्रयत्न तर करूया. नवा खेळ आहे, चुकतमाकत खेळूया, शिकूया.’
शमी म्हणाली, “चला तर मग, ऐश्वर्या, तुझ्यापासूनच सुरुवात करूया.’ ऐश्वर्या म्हणाली, “कुठेही जा पळसाला पानं तीनच. म्हणजेच सगळीकडे परिस्थिती सारखीच.’ शमी म्हणाली, “अगदी बरोब्बर. यात तीन ही संख्याही आलीय आणि अर्थसुद्धा तू बरोबर सांगितलास. आता माझ्यावर राज्य ना? चला मी सांगते, “चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी मिळतेच.’ सुखदा म्हणाली, “व्वा छानच की. आता सुचिता तुझी पाळी.’ सुचिता थोडी विचारात पडली. मग आठवून काही वेळाने म्हणाली, “झाकली मूठ सव्वालाखाची.
म्हणजे आपले अवगुण झाकावे. ते उघड करू नयेत.’ शमी म्हणाली, “व्वा गं, अगदी बरोबर सांगितलंस. आता कृतिका तुझा नंबर.’ कृतिका पटकन म्हणाली, “चौदावे रत्न दाखवणे. म्हणजेच खूप मार देणे.’ अनन्या लगेच म्हणाली, “ये ये, चुकलं चुकलं, यात संख्या आहे पण ही काही म्हण नाही. हा तर वाक्प्रचार आहे. हारलीस तू.’ कृतिका पटकन म्हणाली, “ओके, ओके. पाचा मुखी परमेश्वर ही तरी म्हण आहे ना? या म्हणीचा अर्थ सर्व लोक बोलतात ते खरे मानावे.’ अनन्या म्हणाली, “हो, ही म्हण आहे. यात संख्याही आहे. पण आता तुझी एक संधी हुकली. तुझ्यावर एक हंडी चढली. आता मेघना तू सांग.’ मेघना म्हणाली, “पाचही बोटे सारखी नसतात. म्हणजे सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात.’
शमी म्हणाली, “अगदी बरोबर. आपला खेळ मस्तच रंगत चाललाय. आता अनन्या तुझा नंबर.’ अनन्या म्हणाली, “दुष्काळात तेरावा महिना. म्हणजेच आधीच्याच संकटात भर पडणे.’ शमी म्हणाली, “अरे व्वा! मस्तच की. आता सुखदा तुझी पाळी.’ सुखदाला जिच्यात संख्या आहे अशी एकही म्हण पटकन आठवेना. शर्वरी लगेच तिला म्हणाली, “हरलीस का? मी सांगू?’ सुखदा पटकन म्हणाली, “नाही, हा. सांगते जरा थांब. आठवली आठवली.
नव्याचे नऊ दिवस. म्हणजेच एखादी गोष्ट नवी तोपर्यंत त्याचे कौतुक वाटते.’ शमी म्हणाली, “छानच, आता शर्वरीची पाळी.’ शर्वरी म्हणाली,”थापाड्याच्या घरी बारा औतं, बघायला गेलं तर एकही नव्हतं. याचा अर्थ थापाडा मनुष्य खोटं बोलतो.’ शर्वरीच्या या म्हणीवर सारेच खळखळून हसले. शमी हसत हसत म्हणाली, “बरंय बाई, आपल्यात कुणी थापाडे नाही, आपण सारेच गप्पाडे आहोत.’ यावर पुन्हा सारे खो खो हसले. शमी काहीतरी आठवून म्हणाली, “ये मी तुम्हाला ना, एका थापाड्या दामूची गंमत सांगते हा…
बोलघेवडा दामू, भलत्याच बाता मारी
त्याच्या बाता ऐकून, वैताग यायचा भारी
एकदा म्हणाला गावच्या, नदीला आला पूर
पॅराशूट घालून म्हणाला, उडून गेलो दूर
उडत उडत ताडोबाच्या, जंगलात म्हणाला गेलो
तिथल्या वाघांसोबत, जरा पत्ते खेळून आलो
रात्री आकाशात म्हणाला, चंद्राला आलो भेटून
चांदण्या आणून खिशात, दिल्या मुलांना वाटून
घराच्या वाटेवर म्हणाला, राक्षस भेटला मला
पॅराशूटची गंमत दाखवून, हसवले मी त्याला
दामू अशा रोज रोज, खूप मारायचा थापा
संपत नव्हत्या त्याच्या, लंब्याचवड्या गप्पा
दामू समोर येताच आता, माणसं जातात दूर
म्हणतात याच्या थापांना, येईल नाहीतर पूर
…थापाड्या दामूची काव्यकथा आवडली साऱ्यांनाच.
खेळाला खरोखरच चांगलाच रंग चढत गेला. भोळ्याचे देव सोळा, साठी बुद्धी नाठी, देणाऱ्याचे हात हजार, दमडीचा सौदा अन् येरझरा चौदा, दहा गेले अन् पाच उरले, एक गाव बारा भानगडी, एक पाय तळ्यात अन् एक पाय मळ्यात, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, माझे तेच बरे सोळा आणे खरे …बापरे खेळता खेळता संख्या असलेल्या म्हणींचीच केवढी मोठ्ठी यादी झाली. सुखदाच्या आईने वर्दी दिली. म्हणाली, “अगं मुलींनो, ते फ्रिजमधलं आंबे सारखं हाका मारताय तुम्हाला.’ यावर सगळ्याच जणी हसल्या.
एकनाथ आव्हाड