घटत्या लोकसंख्येमुळे व्यथित झालेल्या चीनने रोज नवनवे कायदे बनवायला सुरुवात केली आहे. आता चीनने “वधू मोल’ ही परंपरा संपुष्टात आणली आहे. वर हे वधूला हुंडा देतात ही इथली परंपरा आहे. येथे लग्नाच्या विधींना जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो. याशिवाय लग्नात खूप खर्च होतो. त्यामुळे अनेकांची लग्नेही होत नाहीत. आता चीन सरकारने ही परंपरा संपवण्याची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी चीन सरकारने लग्नाशिवायही अपत्य जन्माला घालण्यास मान्यता दिली आहे. चीन लोकसंख्या वाढवण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करत आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन सातत्याने नवनवीन प्रयत्न करत आहे. चीनमधील जन्मदर गेल्या काही दशकांमध्ये घसरला आहे. येथे वृद्ध लोकांची संख्या अधिक झाली आहे, तर तरुण आणि कष्टकरी लोकांची संख्या कमी झाली आहे. यामुळे त्रासलेल्या चीनने गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. हुंडा प्रथेविरोधातही लोकांनी पावले उचलली.
आता लोकांनीही हुंडा प्रथा आणि महागड्या लग्नांविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय महिला दिनानिमित्त चीन सरकारकडून अनेक ठिकाणी सामूहिक विवाहही आयोजित केले जात आहेत. “लिव्ह-इन’मध्ये राहणे कायदेशीर असेल,त्यांची अपत्ये कायदेशीर असतील. चीनमध्ये अधिक अपत्ये निर्माण करण्यासाठी लोकांना विशेष सुविधा दिल्या जात आहेत. चीनमध्ये परंपरावादी समाज आहे आणि तेथे कठोर नियम पाळले जातात; पण आजकाल चीन सरकार लोकसंख्या वाढवण्यासाठी अशा अनेक उपायांचा अवलंब करत आहे.
चीनच्या सिचुआन प्रांताने नियम बदलले आहेत आणि आता लग्न झालेल्या दाम्पत्याना प्रसूती रजा आणि वैद्यकीय खर्च देण्यास सुरुवात केली आहे. सिचुआनमध्ये आता अविवाहित मातांनाही त्या सरकारी सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या आतापर्यंत फक्त विवाहित जोडप्यांना मिळत होत्या. सिचुआन हा चीनचा पाचवा सर्वात मोठा प्रांत आहे. त्याची लोकसंख्या साडेआठ कोटी असून ती कमी होत आहे. या कारणास्तव, सिचुआन प्रांताने उर्वरित देशापेक्षा एक पाऊल पुढे विचार केला आहे. देशाच्या तीन अपत्य धोरणाऐवजी, सिचुआनने अपत्य संख्येवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. सरकारने येथे नवविवाहित जोडप्यांना अपत्य होण्यासाठी तीस दिवसांची सशुल्क विवाह रजा देण्याची घोषणा केली आहे. पती-पत्नी एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात आणि लोकसंख्या वाढवण्यात भागीदार बनू शकतात, हा त्याचा उद्देश आहे. पूर्वी चीनमध्ये लग्नासाठी फक्त तीन दिवसांची पगारी रजा मिळत होती.
चीनची मोठी लोकसंख्या वृद्ध होत असताना जन्मदर घटला आहे. अशा परिस्थितीत चीन सरकार महागड्या लग्नांवर बंदी घालत आहे. चीनमध्ये वर हे वधूस हुंडा देतात अशी परंपरा आहे. याला “कैली’ किंवा “वधू भाव’ म्हणतात. चीनमध्ये लग्नाच्या विधींना जवळपास एक वर्ष लागतो. याशिवाय लग्नासाठी कुटुंबीयांवर खूप पैसा खर्च होतो. लोकांच्या एकूण उत्पन्नाच्या दहापट रक्कम लग्नातच खर्च केली जाते, असे म्हणतात. चीनची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा वेगाने कमी होऊ लागली आहे. चीनसाठी ही चिंतेची बाब आहे. कारण सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनमध्ये काम करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.
अशा स्थितीत आरोग्य यंत्रणा आणि पेन्शनवरील भार वाढत असला, तरी उत्पादन कमी होत आहे. यामुळे चीन चिंतीत आहे. आगामी काळात चीनची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. साठ वर्षांनंतर चीनची लोकसंख्या सर्वात कमी झाली आहे. हे पाहता सरकारने कुटुंब विकास संस्थेला जन्मदर वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. आर्थिक मंदीच्या भीतीने, अधिकाधिक लोक स्थिर होऊ शकतील आणि अपत्ये जन्माला घालू शकतील यासाठी लोकांनी लग्नावर कमी खर्च करावा अशी चीनची इच्छा आहे. महागाईमुळे चीनमध्ये कमी लोक लग्न करू शकतात आणि अशा परिस्थितीत अपत्येही कमी जन्माला येतात. मध्य हेबेई प्रांतात लोकांनी लग्नाच्या या कठोर प्रथेविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लग्नाच्या या “हुंडा पद्धती’ विरोधात जनजागृती मोहीम सुरू झाली आहे.
चीनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी सामूहिक विवाहही केले जात आहेत. चीनमध्ये अनेक ठिकाणी जास्त अपत्ये जन्माला घालणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय विवाहितांना अधिक सुट्ट्याही देण्यात आल्या आहेत. याशिवाय “लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मुलांची नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. चीनमधील “वन चाइल्ड’ पॉलिसीनंतर महिलांची संख्या कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी आणखी पैशांची मागणी सुरू केली. चीनच्या ग्रामीण भागात लैंगिक असमानता अधिक आहे. जाणकार सांगतात की, मुलीच्या घरच्यांची मागणी जास्त असल्याने अनेक जण लग्नापासून माघार घेतात. चीनमध्ये हुंडा प्रथेविरोधात मोहीम सुरू झाली असली तरी ती संपवणे सोपे नाही. ही प्रथा तेथील लोकांच्या परंपरेचा भाग बनली आहे.
लोकसंख्येचा वृद्धीदर शून्यावर आणणे हे चीनचे स्पष्ट उद्दिष्ट होते. चीनचे हे धोरण 2016 पर्यंत म्हणजे 36 वर्षे चालू राहिले; पण आता चीनने लोकसंख्येच्या “निगेटिव्ह ग्रोथ’च्या युगात प्रवेश केला. चीनची लोकसंख्या कमी होण्याची 60 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या “नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये चीनची लोकसंख्या 141 कोटी 18 लाख होती. 2021 च्या तुलनेत साडेआठ लाखांनी कमी होती. गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या चीनच्या जन्मदरातील घट आता विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे यावरून दिसून येत आहे. आता चीनमध्ये जन्मदर एक हजार मागे केवळ 6.77 इतका कमी झाला आहे. काही लोक चीनच्या जन्मदरातील या बदलाला धोक्याची घंटा मानत आहेत. चीनची लोकसंख्या कमी झाल्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याचीही अनेकांना चिंता आहे. त्यांना आशा आहे की निरंतर समृद्धी यापुढे लोकसंख्येच्या वाढीवर अवलंबून राहणार नाही. चीनच्या लोकसंख्येतील ही स्थिरता कायम ठेवावी, असे मत कल्याणकारी संस्था “पॉप्युलेशन मॅटर्स’ या संस्थेने व्यक्त केले आहे. कारण, याचा फायदा तेथील नागरिकांना होईल आणि पर्यावरणालाही होईल, अशी अपेक्षा आहे.
एखाद्या देशातील महिलांनी सरासरी 2.1 पेक्षा कमी मुलांना जन्म दिला तरीही, तेथील मृत्यूदर स्थिर राहणे आणि स्थलांतरा अभावी अनेक दशके लोकसंख्या वाढतच राहते. अगदी अलीकडेपर्यंत, चीनची लोकसंख्या तुलनेने तरुण होती. चीनमध्ये प्रति महिलेच्या जन्माच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 1990 च्या दशकापासून चीनमधील प्रजनन दर सातत्याने घसरत आहे आणि 2020 मध्ये 1.28 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्याच वर्षी भारतात एक महिला सरासरी 2.05 मुलांना जन्म देत होती, तर अमेरिकेत हा दर 1.64 होता. अगदी कमी जन्मदर आणि वृद्ध लोकसंख्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जपानमध्येही त्या वर्षी प्रजनन दर 1.34 टक्के होता. पहिली गोष्ट म्हणजे चीनमध्ये महिला आणि पुरुषांच्या संख्येत असमतोल आहे. एक मूल धोरणामुळे चीनमध्ये मुला-मुलींच्या गुणोत्तरात मोठी तफावत निर्माण झाली आहे. अनेक मुलींचा एकतर गर्भपात करण्यात आला किंवा त्यांना सोडून देण्यात आले.
आज चीनच्या लोकसंख्येमध्ये प्रत्येक दहा महिलांमागे 11 पुरुष आहेत. यावरून असे दिसून येते, की प्रत्येक 11 पैकी एका पुरुषाला स्वतःच्या वयाचा जोडीदार शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. चीनमधील राहणीमानाच्या खर्चात झालेली वाढ आणि वाढत्या वयात लग्न करण्याचा निर्णय हेदेखील तेथील लोकसंख्या घटण्याचे कारण मानले जाते; मात्र चीनची मूल्यंही बदलत आहेत. एकापाठोपाठ एक असे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे की चीनमधील महिला आता एक किंवा दोन अपत्यांचे कुटुंब आदर्श मानतात. किंबहुना अनेकांना अपत्ये व्हावे असे वाटत नाही, तर चीनने 2015 मध्येच एका जोडप्यासाठी दोन अपत्यांचे धोरण लागू केले होते. चीनच्या प्रजनन दरात सातत्याने घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेषतः जेव्हा लोकसंख्येचे सरासरी वय वाढत आहे आणि आता बाळंतपणासाठी सक्षम वयाच्या स्त्रियांची संख्यादेखील कमी होत आहे; मात्र असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे कठीण दिसते. पहिला म्हणजे इमिग्रेशन. सध्या चीनमधील लोकसंख्येमध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. चीन आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर खूप भर देत आहे. मग चीन सरकार ज्या प्रकारे आपल्या नागरिकांना अधिक अपत्ये जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्याचाही परिणाम दिसून येतो. सध्या तरी लोकसंख्या वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा कोणताही परिणाम दिसून येत नाही; पण आता चीन लोकसंख्या वाढवण्यासाठी जनतेवर दबाव आणणारी पाऊले उचलू शकतो, अशी भीती तज्ज्ञांना वाटत आहे.
– आरिफ शेख