ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. चिंतनशील विचारांची कास धरणारे न्या. चपळगावकर विद्वत्तेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सामाजिक आणि राजकीय विचारवंतांच्या परंपरा जोपासताना ते गेल्या पाच ते सहा दशकांपासून विविध माध्यमातून समाजाची वैचारिक मशागत करत आहेत. सध्याच्या काळात टोकाची भाषा आणि सार्वजनिक सभा, संकेतातून अनेकांचे भान सुटलेले असताना तर्कसंगत आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत भूमिका मांडणाऱ्या चपळगावकर यांच्या निवडीचे स्वागत करायला हवे.
ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी चुरस होती. यामध्ये न्या. चपळगावकर यांची 96 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाला यंदा 200 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे वर्धा येथे साहित्य संमेलनाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वर्ध्याच्या भूमीवर साहित्य सारस्वतांचा आगामी मेळा रंगणार आहे. न्या. चपळगावकर यांच्या निवडीबद्दल सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मराठी भाषा, मराठी साहित्य यांच्याविषयी आपले मत मांडण्याची मोठी संधी आहे, असे मत न्या. चपळगावकर यांनी मांडले आहे.
सामाजिक आणि राजकीय विचारवंतांच्या परंपरा जोपासणारे न्या. चपळगावकर हे गेल्या पाच ते सहा दशकांपासून विविध माध्यमातून समाजाची वैचारिक मशागत करत आहेत. त्यांचा जन्म मराठवाड्यातला. वडील हैदराबाद मुक्ती संग्रामातील नेते असल्याने त्यांना लहानपणापासून स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांचा सहवास लाभला. हैदराबाद मुक्ती संग्राम हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. रामानंद तीर्थ हे त्यांचे श्रद्धास्थान. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ मराठीचे अध्यापन आणि वकिली केली. लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख होते.
न्यायाधीश झाल्यानंतरही त्यांचा साहित्याशी आणि साहित्यिक घडामोडींशी सतत संपर्क होता. सर्व प्रकारच्या चळवळीत सहभागी असल्याने ते मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. चौफेर वाचन, अभ्यास, मार्मिक निरीक्षणे आणि प्रासादिक शैली यामुळे त्यांचे लेखन रसाळ आहे. पाच ते सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी अनेक किस्से ऐकले, वाचले आहेत. त्याचा ते लेखात लीलया पद्धतीने वापर करतात. एका पुस्तकात य. दि. फडकेंवरील लेखात ते म्हणतात, की इतिहास जेवढा प्राचीन तेवढा तो सांगणाऱ्याला कमी अडचणीचा असतो.
ललित साहित्य आणि कवितांचे त्यांनी लेखन केले. वडिलांचे राजकारण आणि समाजकारणांच्या संस्कारापासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे आस्थेने पाहण्यास सुरुवात केली आणि ते वैचारिक लेखनाकडे वळाले. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अज्ञात सैनिकांना जगासमोर आणले. स्वातंत्र्यलढा, त्यानंतरच्या राजकीय आणि सामाजिक चळवळी आणि विचारवंतांच्या वैचारिक भूमिकांवर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. राज्यघटना, निवडणूक कायदा, माहिती अधिकार कायदा अशा कायद्यांना सामान्यांच्या भाषेत उपलब्ध करून दिले. त्यांच्या लेखनात औपचारिकता कधीही जाणवली नाही. चिंतनशील विचारांची कास धरणारे न्या. चपळगावकर विद्वत्तेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
चपळगावकर ही गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषयांवर भूमिका मांडत आले आहेत. नाशिकच्या साहित्य संमेलनात देखील त्यांनी काही मुद्दे मांडले होते. चमकदार, चटपटीत वाक्य वापरून भाषण सजविण्याची त्यांना कधीच गरज पडली नाही. बुरसटलेल्या मानसिकतेवर कठोर प्रहार करण्याची शैली पुरेशी ठरते. तुमच्या माझ्या मनातलं, हरवलेले स्नेहबंध या पुस्तकातून त्यांचे हळवे मन दिसते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, अनंतराव भालेराव, नामदार गोखले, स्वामी रामानंद तीर्थ, केशवराव कोरटकर अशांच्या विषयी लिहिताना ते अभ्यासक, निरीक्षक आणि साहित्यिक अशा तिन्ही लेखनशैलीची एकत्रपणे प्रचिती देतात.
सध्याच्या काळात टोकाची भाषा आणि सार्वजनिक सभा, संकेतातून अनेकांचे भान सुटलेले असताना तर्कसंगत आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत भूमिका मांडणाऱ्या चपळगावकर यांच्या निवडीचे स्वागत करायला हवे. पंडित नेहरूंच्या वैचारिक मुशीत तयार झालेले आणि न्यायदानाच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम करूनही लेखनातील लालित्य कायम राखलेले आणि विपूल लेखन करूनही आणखी काही सांगण्याची तयारी करणारे नाना ऊर्फ नरेंद्र चपळगावकर हे आग्रही भाषेत भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनात स्मरणरंजन कधीच नसते. आणीबाणीच्या काळानंतर मूल्य, निष्ठा, बांधिलकीत घसरण होत असून त्याचा अनुभव आपण घेत आहोत.
स्वातंत्र्याच्या आधीचा काळ ज्यांनी अभ्यासला, स्वातंत्र्यानंतरचा भारलेला काळ हा भविष्यातील नागरिक म्हणून अनुभवला आणि आजचा काळ जे अस्वस्थपणे पाहात आहेत, अशा निवडक अभ्यासू ज्येष्ठ भाष्यकारांत न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे प्रमुख नाव आहे. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी एक संस्थांनी माणसं या पुस्तकात चपळगावकर यांनी लेखनाचा सांगितलेला उद्देश चिंतनशील आहे. संस्थांनी माणसं या संग्रहात ज्या व्यक्तीची चित्रे आहेत, त्या सगळ्या व्यक्ती इतिहासाचीच अपत्ये आहेत. अर्थात केवळ इतिहास सांगणे हा या लेखनाचा उद्देश नाही, तर इतिहास घडविणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणे, हा त्याचा हेतू आहे. या सगळ्या व्यक्तीच्या जीवनात संघर्ष आहेत, नाट्य आहे, इतिहासाला वळण देण्याचा प्रयत्न आहे. काहीवेळा काळाची दिशा पूर्णपणे दुर्लक्षून, आपल्याच इच्छेचा भूतकाळ कायम राखण्याचा प्रयत्नही आहे, असे लेखक म्हणतात.
बदलत्या काळावर भाष्य करणाऱ्या न्या. चपळगावकरांची मते ही परखड आणि कालातीत आहेत. मराठी भाषकांचे म्हणजे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन सहा दशकं लोटली आहेत. महाराष्ट्रातील बदलांवर चपळगावकर यांनी केलेले भाष्य मार्मिक आहे. राज्यातला पहिला बदल हा शिक्षण पद्धतीत झाल्याचे ते सांगतात. शिक्षण पद्धती पूर्वीसारखी राहिली नाही. शिक्षणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अगदी खेडोपाडी महाविद्यालय झाली आहेत. शिक्षणाच्या प्रसारामुळे मुली शिकल्या आणि त्यांची प्रगती झाली. पूर्वी मुलींना शहर गाठावे लागायचे आणि घरातून परवानगी मिळत नसायची. मग त्यांचे शिक्षण थांबायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वातावरण बदलास हातभार लागला, असे ते म्हणतात.
दुसरा बदल हा कृषी क्षेत्रात झाला. सरकारच्या साह्याने शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीत झाल्याचे ते म्हणतात. आणि तिसरा बदल झाला तो दळणवळणांच्या साधनात. पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसायचे. एखादी बस असायची. पण आता चित्र बदलले आहे. परिणामी 25 टक्के लोकसंख्या ही गावाकडून शहरात आली. पण काही काम न करता ती परत खेड्याकडे वळाली. हे चित्र निर्माण झालं आणि त्यास एक नैतिक दडपण असणारे नेतृत्व हवं होते. ते आजवर झालेलं नाही, अशी खंत चपळगावकर व्यक्त करतात.
औरगाबाद येथे वास्तव्य करणारे नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतील दिवस यांसारख्या पुस्तकाचे लेखन केले आहे. पुण्यात जानेवारी 2012 रोजी झालेल्या 13 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद चपळगावकर यांनीच भूषविले होते. तसेच मार्च 2014 मध्ये झालेल्या 9 व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील चपळगावकर हेच होते. 2011 मध्ये भैरूरतन दमाणी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
23 नोव्हेंबर 2003 पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी संचालक आहेत. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. चपळगावकर यांचे अनेक वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध झाले आहेत. ललित, समीक्षा, न्यायविषयक कथा, व्यक्तिचित्रणे प्रकाशित आहेत. 2005 मध्ये माजलगाव (जि. बीड) येथे झालेल्या 26 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे संपादन त्यांनी केले असून त्यांची सुमारे 30 पुस्तक प्रसिद्ध आहेत. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक संस्थांचे वाङ्मयीन पुरस्कारही मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देणारे चपळगावकर यांना साहित्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.
– विश्वास सरदेशमुख