राजकारणात एखाद्याला सन्मानाने “भाई’ म्हणावं, असं व्यक्तिमत्त्व म्हणजे केशवराव धोंडगे. कंधार, जि. नांदेड येथे मन्याड नदीच्या खोऱ्यात या ढाण्या वाघानं माणसं जोडली, टिकवली.. राजकारणापेक्षा “माणूस’ म्हणून भाईंची कारकीर्द बहरली. पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार झालेल्या भाईंनी अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा “लाल बावटा’ मराठवाड्यात फडकवत ठेवला. निर्भीड आणि स्वाभिमानी बाणा ही त्यांची ख्याती. नाठाळाच्या माथी शाब्दिक काठी हाणणाऱ्या या नेत्यानं प्रसंगी माफी मागितल्याचे किस्सेही मन्याड खोऱ्यात आदराने सांगितले जातात. आयुष्यभर गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या नेत्यानं 1 जानेवारी 2023 रोजी देह ठेवला… तेही शेकडो आठवणी मागे ठेवून!
रांगडेपणा, तरीही आपलेपणा
भाई केशवराव धोंडगे म्हणजे धिप्पाड शरीरयष्टीचा माणूस. पठारी प्रदेशात जडणघडण झाल्यानं बोलण्यात रांगडेपणा असला, तरी वेगळाच आपलेपणा. जनसामान्यांत थेट मिसळण्याचा स्वभाव, सत्य आणि न्यायासाठी काहीही करायची तयारी. पांढरा शुभ्र पोषाख, विशिष्ट पद्धतीने नेसलेलं धोतर, त्याचा एक लांब सोगा हाती धरलेला. त्याचा वापर प्रसंगी तोंड झाकायला आणि पुसायलाही ते करायचे आणि पुन्हा कंबरेत खोचायचे. अशी स्वारी मग गल्ली ते दिल्ली शाब्दिक आक्रमण करायची. बरं कोणी एखादा नवखा भेटायला गेला, तर “जय क्रांती’ने स्वागत व्हायचं. मनगटावर खास अत्तर लावून हाती खडीसाखर देणारे भाई हे वल्लीच! अगदीच ओळखीचा एखादा भेटला, तर गालाचा मुका घेणारे केशवराव धोंडगे एकमेव! माझ्यासह अनेकांच्या हृदयावर केशवराव धोंडगे यांची ही प्रतिमा कायम कोरलेली राहणार आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. त्यानिमित्त भाई केशवराव धोंडगे यांचा विधिमंडळात नुकताच गौरव करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भाईंचा हा अखेरचा मुंबई दौरा ठरला.
विधिमंडळात मराठवाड्याचा पहाडी आवाज
कंधार तालुक्यात गऊळ येथे जन्मलेले केशवराव धोंडगे हे 1957 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर 1962, 1967, 1972 या तीन वेळा विधानसभा; तर 1977 मध्ये नांदेड लोकसभा निवडणूक जिंकली. 1985 आणि 1990 या काळात ते विधानसभा सदस्य होते. म्हणजे पाच वेळा त्यांनी विधानसभा जिंकली व एकदा खासदार होते. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक अशा अकरा मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केले. एक काळ होता, जेव्हा विधानसभेत मराठवाड्याचा पहाडी आवाज गर्जायचा तो केशवराव धोंडगे यांच्या रुपानेच.
“जय क्रांती’ अशी घोषणा देत विधानसभेत भाषणं, शब्दकोट्या, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी मांडताना खास भाषणशैलीने भल्याभल्यांना ते गारद करत. अगदी आतापर्यंत ते फोनवर बोलत असतानाही “जय क्रांती’ असं बोलूनच समोरच्याशी संवाद साधत. भाईंचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं जातं, ते म्हणजे विधानसभेचं कामकाज सुरू होण्याआधी ते सभागृहात हजर असत. तर, त्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सभागृहातून ते सर्वांत शेवटी निघत. आजकालच्या लोकप्रतिनिधींचे विधिमंडळातील कामकाज पाहिले, तर कदाचित भाईंनाही ते पटलेच नसेल.
गुराखी संमेलन अन् लेखन-वाचन
भाई केशवराव धोंगडे तसे अजब रसायन होते. विधिमंडळ दणाणून सोडणारा हा हजरजबाबी नेता कधीकधी गुराढोरांत रमायचा. कष्टकरी-शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून बांधावर जायचा. कंधारजवळच्या एका डोंगरावर या अवलिया नेत्यानं 1985 मध्ये वेगळं संमेलन भरवलं, ते म्हणजे गुराख्यांचं. “जागतिक गुराखी संमेलन’ ही परंपरा त्यानंतर सुरूच राहिली. पंचक्रोशीच नव्हे, तर शेजारच्या तालुक्यांमधले शेकडो गुराखी, भटके, विमुक्त अन् मागणारे या गडावर यायचे. तिथं व्यासपीठावर प्राणी.
वेगवेगळ्या चर्चा, ग्रामीण गाण्यांवर नाच-गायन, समाजातील उपेक्षित घटकांच्या रचना आणि बरंच काही. एकीकडे गुराख्यांसोबत रमणारे आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड लेखन आणि त्यापेक्षा अधिक वाचन करणारे भाई पाहिले, की भरून पावल्यासारखं वाटायचं. अंगी अभ्यासाची वैज्ञानिक दृष्टी होती, शिवाय सगळे पौराणिक ग्रंथ गाठीशी. त्यातलं भलं-बुरं शोधण्याची विवेकशील दृष्टी. पलंगावर पुस्तकंच पुस्तकं! आमदार-खासदार राहिलेला माणूस पुस्तकांना जीव लावतो हे अपवादाचं चित्र. वयाच्या शंभरीच्या टप्प्यावरही भाई दररोज चार-सहा पानांचा मजकूर लिहायचे. आजवर 50 च्या आसपास ग्रंथ भाईंनी लिहिले आहेत.
पवार, ठाकरे ते अत्रे आणि भाई…
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, प्र. के. अत्रे आदी नेत्यांसोबतचा भाईंचा स्नेह होता. पण, वैचारिक भूमिका अगदी टोकाच्या. अत्रे आणि भाई या दोन्ही सत्पुरुषांनी एकमेकांवर अग्रलेख लिहिले. टीकेची धार तेवत ठेवली. भाईंनी आपल्या “जय क्रांती’ साप्ताहिकातून अत्रेंवर पराकोटीचे शाब्दिक आसूड ओढले. पण, अत्रे गेले तेव्हा हमसून हमसून रडणारे भाई… अशा अनेक आठवणी कंधार आणि पंचक्रोशीतील भाईंचे साथी सांगत आले आहेत.
अफलातून प्रतिज्ञा
भाई नेहमीच कष्टकरी माणसांत रमले. पण, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखणारा मेंदू त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच प्रेरणेतून भाईंनी कंधारसारख्या ओसाड-उजाड तालुक्यात गावोगावी, वाडी-तांड्यावर शिक्षणाची गंगा पोहचवली ती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. “आधी कॉलेजला मान्यता; मग लग्न’ अशी अफलातून प्रतिज्ञा त्या काळी भाईंनी केल्याचे प्रसंग सांगितले जातात.
भरभरून बोलणारे भाई
कंधार हे माझे आजोळघर. त्यामुळे काही वर्षांपूर्वी भाईंना भेटण्याचा प्रसंग आला होता. सोबत काही ज्येष्ठ व्यक्तीही होत्या. त्यावेळी राजकारणापासून सहकार आणि सामाजिक घटनांपर्यंत भाई भरभरून बोलले. (तेव्हा माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे फोटो, रेकॉर्डिंग करता आले नाही, हे दुर्दैव) काही नेत्यांच्या धोरणांवर त्यांच्या शब्दांत टीका केली. त्यावेळी आलेल्या प्रत्येकाला भाईंनी “जय क्रांती’चा अंकही दिला होता आणि जाताना प्रत्येकाला कडकडून मिठीही मारली. असे भाई आठवले, की डोळे पाणावतात आणि छाती थरथरते. खरं तर अशी माणसं शतकातून एकदाच जन्म घेतात आणि त्यानंतर विधाताही काही काळ विश्रांती घेत असेल.
लढवय्या नेता
आणीबाणी काळात नाशिक मध्यवर्ती कारागृहात 14 महिने कारावास. हजारो सत्याग्रह विविध नावे देऊन यशस्वी केले. त्यात पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, लाटणं मोर्चा, शेणचारऊ सत्याग्रह, खईस कुत्री सत्याग्रह ही ठळक नावे.
– प्रसाद खेकाळे