सिनेनगरी लॉस एंजेलिस येथे रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका या मुख्य संघटनेशी संलग्न असलेल्या 11,500 लेखकांनी संप पुकारल्याच्या वृत्ताची सध्या जगभरात चर्चा आहे. या संपामुळे अमेरिकी दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित होणारे कित्येक कार्यक्रम बाधित होऊ लागले आहेत. बदलत्या वातावरणात आपल्या लेखनाला योग्य मोबदला मिळावा असे लेखकांचे म्हणणे आहे. यंदाच्या संपामागे केवळ मानधन हे एकच कारण नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅटजीपीटी तंत्रज्ञानामुळे भविष्यात कलाकार- लेखकांच्या नोकऱ्यांचे भवितव्य अंधःकारमय झाल्याचा मुद्दाही यामध्ये आहे. त्यामुळे या संपाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.
कृषिक्रांती आणि आद्योगिक क्रांतीपेक्षा माहिती क्रांतीने मानवी जीवनाला नवी कलाटणी दिली आहे. किंबहुना मानवी जीवनाचा चेहरामोहराच यामुळे बदलून टाकला आहे असे ऍलविन टॉपलरने “तिसरी लाट’ या ग्रंथामध्ये म्हटले आहे. या लाटेने कला, साहित्य, संस्कृती सर्वांना व्यापून टाकले आहे. विशेषत: कलावंतांच्या आणि प्रतिभाशाली साहित्यिकांच्या विश्वात या नव्या संज्ञापन क्रांतीने नवे वादळ घडवून आणले आहे. अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर विकसित करण्यात आलेल्या “चॅट जीपीटी’ या तंत्रामुळे एक नवा भूकंप झाला आहे. हा भूकंप म्हणजे 15 वर्षांनंतर हॉलिवूडमधील अमेरिकन लेखकांनी केलेला संप होय.
रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका ही संघटना 1961 पासून कार्यरत आहे. आजवर या संघटनेने 4-5 वेळा असे संप घडवून आणले आहेत. यापैकी 1988 चा संप 153 दिवस चालला होता. 2007-2008 चा संप 100 दिवस चालला होता. यावर्षी 2 मे रोजी सुरू झालेल्या संपाने जवळपास तीन आठवड्यांचा काळ पूर्ण केला आहे. आजही हा संप केव्हा मिटेल याचा नेम नाही. या संपाचे अर्थशास्त्र काय? त्यामागची लेखकांची नैतिक भूमिका काय? कलात्मक आणि सर्जनशील अभिव्यक्तीवर त्याचे काय परिणाम होत आहेत? तसेच अमेरिकन व्यवसाय, उद्योग मंदीच्या तडाख्यात सापडला असताना हे नवे संकट कोणकोणत्या समस्यांची गुंतागुंत निर्माण करणार आहे हे सर्व प्रश्न नव्याने डोकेदुखी ठरत आहेत.
मागील वेळच्या 2007-2008 चा संप हा दोन ते तीन बिलियन डॉलर्सचा दणका देणार होता. यावेळीच्या संपानेही दररोज दोन दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत आहे, असा अंदाज आहे. संप लवकर मिटला नाही तर आधीच खिळखिळ्या झालेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला आणि मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या अर्थकारणाला आणखी धक्के बसण्याचा धोका संभवतो. खरे तर हॉलिवूड हे जागतिक मनोरंजन उद्योगाचे राजधानीचे केंद्र म्हटले पाहिजे. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस या भागात कितीतरी स्टुडिओंचे जाळे आहे. तेथील प्रमुख 32 स्टुडिओमध्ये या संपाच्या धुराळ्याने चांगलचे वादळ निर्माण केले आहे.
संपाची कारणे कोणती?
रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका या संस्थेने ज्या मालकांशी, निर्मात्यांशी पंगा घेतला आहे त्यांचे नाव आहे अलायन्स ऑफ मोशन पिक्चर्स ऍन्ड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स. यामागील खरे कारण म्हणजे काम अधिक आहे आणि वेतन मात्र कमी दिले जाते हे आहे. तसेच नव्या तंत्रज्ञानाने जे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण केले आहेत, त्यामुळे लोकांच्या नोकऱ्यावर आणि पोटावर पाय पडत आहेत, असा संघटनेचा दावा आहे. विशेषतः अनेक आघाडीवरच्या कंपन्यांनी मंदी आणि कोविड महामारीचे संकट या दोन्ही कारणामुळे अनेकांना नोकरीतून कमी केले आहे. शिवाय स्टुडिओ कक्षातील लेखकांच्या जागेवरही संकट येत आहे. त्यामुळे हा संप वेळीच मिटला नाही तर चित्रपट निर्मितीची गती मंदावण्याचा धोका आहे. तसेच प्रमुख वाहिन्यांवरील रात्रीचे मनोरंजनाचे उशिराचे कार्यक्रम हे सुद्धा अंधारामध्ये जात आहेत. कारण त्यांचे सर्व लेखक या संपात आघाडीवर आहेत. अनेक मान्यवरांनी या संपामध्ये पुढे येऊन संपाला नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. या संपातील प्रमुख मुद्दे खरोखरच विचारात घेण्यासारखे आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या मते, निर्मात्यांचा नफा वाढला आहे पण तरीही लेखकांना पुरेसे वेतन व मानधन दिले जात नाही. 2007 मध्ये हॉलीवूडचा एकूण नफा पाच बिलियन डॉलर इतका होता. तो 2023 मध्ये जवळजवळ 25 ते 30 बिलियन डॉलर झाला आहे. म्हणजे सहा पटीने नफा वाढला आहे; पण मालक मंडळी या नफ्यातील मलिदा स्वतःकडे ठेवतात आणि लेखकांना मात्र गाजर दाखवले जाते, असे लेखकांचे म्हणणे आहे. या सर्व वादाचा मुख्य केंद्रबिंदू आहे स्ट्रीमिंग मीडिया. कारण स्ट्रीमिंग मीडियामध्ये उलाढाल खूप असते, कल्पकताही असते. परंतु लेखकांचा असा दावा आहे की अशा प्रकारच्या शोमध्ये लेखकांच्या वाट्याला येणारा लाभ कमी आहे. दशकापूर्वीच्या तुलनेमध्ये अलीकडे लेखकांच्या सरासरी उत्पन्नात बरीचशी घट झाली असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. लेखकांना मानसन्मान, बहुमान तर हवा असतोच; पण त्याशिवाय पुरेसे मानधनही हवे असते. ते कमी मिळू लागते तेव्हा नाराजी वाढते.
चॅट जीपीटीने वाढवली समस्या
या सर्व समस्येत भर टाकली आहे ती चॅट जीपीटी तंत्राने! कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आपण कोणतीही कथा, कादंबरी तयार करू शकतो आणि जुन्याचे नवे आणि नव्याचे जुने करू शकतो असे निर्मात्यांना वाटते. या प्रकारचे तंत्रज्ञान सुरू झाले तर त्याचा परिणाम सर्जनशील आणि प्रतिभाशाली कलावंतावर होईल, हे लक्षात घेऊन या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रांचा वापर कमी प्रमाणात व्हावा, असे लेखकांचे म्हणणे आहे. संहिता तयार करण्याचे काम हे संशोधन करण्यापेक्षा वेगळे असते. ते कलात्मक प्रतिभा शक्तीचे असते. त्यामुळे केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे या प्रकारची प्रतिभाशाली कामे होऊ शकत नाहीत. तेव्हा लेखकांना जर पुरेसे स्वातंत्र्य आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी पोषक वातावरण कायम ठेवायचे असेल तर कृत्रिम बुद्धिमता तंत्राचा वापर कमी व्हा असे लेखकांचे म्हणणे आहे. याउलट या क्षेत्रात या तंत्राचा वापर करून फक्त लेखकांना हात फिरवण्याची संधी द्यावयाची आणि निर्मिती तंत्राचा उपयोग करून आपण पुढे जावयाचे अशी निर्मात्यांची भूमिका आहे. त्यामुळे लेखकांची धाकधुक हे तंत्रज्ञान जसे वापरले जात आहे तशी वाढली आहे. कॅलिफोर्नियातील युनिव्हर्सल सिटी स्टुडिओवर लेखकांनी या सर्वाविरोधात जबरदस्त धरणे धरली आणि मोर्चाही काढला. नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या संस्थेवरही निदर्शने करण्यात आली. लॉसएंजेलीस, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या सगळ्या मुख्य शहरातून आंदोलकांनी लक्ष वेधले आणि आपल्या मागण्यासाठी मिश्कील मार्मिक अशा पद्धतीचे फलक घेऊन या तंत्राविरुद्ध आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे संबंध जगातील प्रसारमाध्यमातून लेखकांच्या या संपाची दखल घेण्यात आली.
संपाचा फटका
खरे तर निर्माता संघटनेने मूलभूत करार करून त्यांच्या काही समस्या वेळीच सोडवण्यावर भर द्यायला हवा होता. पण अनेक महिन्यांपासून चर्चेचे गुऱ्हाळ चालू राहिले. आता आंदोलनाच्या प्रक्रिया पाहता पुढे हे सर्व प्रकरण कोणत्या वळणावर जाणार याबद्दल शंका वाटू लागते. विशेषतः अनेक प्रकारच्या कार्यक्रमावर या संपाचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. ऍपल टीव्हीने तयार केलेल्या काही प्रोग्रॅमविषयीसुद्धा प्रश्न निर्माण झाले आहेत. कॅलिफोर्नियातील लाइव्ह स्ट्रीम करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या कार्यक्रमांचे गणित बिघडले आहे. कामाच्या प्रमाणात दाम ही लेखकांची मागणी रास्त आहे. लेखक संघटनेचा असा दावा आहे की नव्या प्रस्तावाने लेखकाला दरवर्षी 429 दशलक्ष डॉलर अधिक मिळतील. तर प्रतिवादी संघटनेच्या मते या ऑफरमुळे फक्त 86 दशलक्ष डॉलर त्यांना देता येतील. तेव्हा संघटनेची मागणी आणि मालकांची देण्याची दानत यामध्ये मोठेच अंतर दिसते. परिणामी संप बराच काळ चालेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मार्ग कसा निघणार?
आणखी एक मुद्दा असा की कामावरून कमी करणे आणि अनिवार्य कर्मचारीच ठेवणे या पद्धतीचे तंत्र निर्माते वापरत आहेत. अनिवार्य कर्मचारी कोणते आणि आवश्यक कोणते यात एक प्रकारचे सूक्ष्म अंतर दिसून येते. खरे तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लेखक संघटना असे म्हणते की प्रत्येक सदस्याला त्याचे स्वतःचे पेन्शन आणि त्याला स्वतःच्या आरोग्यसेवा निधी प्राप्त झाल्या पाहिजेत. परंतु मोशन पिक्चर्स आणि टेलिव्हिजन प्रोड्युसर्स संघटनेने मात्र हा प्रस्ताव नाकारला आहे. इथेच खरे दुखणे आहे. वाटाघाटी आणि संप मिटवण्याचा क्रिया अल्पगतीने पुढे जात आहेत. त्यामुळे हा प्रश्न अधिक रेंगाळेल असे वाटते. लेखक संघटनेने वाटाघाटीसाठी 20 सदस्यांचे एक शिष्टमंडळ तयार केले आहे. हे शिष्टमंडळ बोलणी करण्यासाठी विविध प्रकारचे मुद्दे आणि प्रस्ताव घेऊन संघटनेबरोबर विचारविनिमय करत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या, मोर्चे व धरणे धरणाच्या कार्यक्रमात सुद्धा 200 हून अधिक प्रमुख नेतेमंडळी आहेत.
भविष्यकाळात हा संप आणखी बराच काळ टिकण्याचा धोका दिसतो. संघटना आणि प्रत्यक्ष निर्माते यांच्यातला सुसंवाद वाढल्यास त्यातूनच काहीतरी मार्ग निघू शकतो. लेखक आणि कलावंतांना पुरेसा वाटा न देण्याची प्रवृत्ती जगभर सगळीकडे दिसते. संपाला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामध्ये आघाडीवरचे नाटककार, एकपात्री प्रयोगाचे कलावंत हेसुद्धा पुढे येत आहेत. त्यामुळे संपकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे. हे सर्व चित्र पाहता भविष्यकाळात या संपाचा हॉलिवूडच्या प्रकृतीवर काय परिणाम होईल हे मात्र निश्चितच सांगता येणार नाही. या प्रकारच्या लेखकांच्या संपाचे वादळ भारतामध्ये बॉलिवूडमध्ये सुद्धा येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु काही तज्ज्ञांच्या मते असा परिणाम भारतामध्ये अल्पप्रमाणात होईल किंवा होणार नाही.
– प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर