भारतीय दुबळे नसून पराक्रमी, शूर, उत्तम प्रशासक आहेत हे शिवरायांनी पोर्तुगीज, डच, इंग्रजांना दाखवून दिले. परकीय व्यापारावर त्यांनी बंदी घातली नाही, तर त्यामध्ये सामान्य रयतेला जाच होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. अशा धोरणी राज्याच्या परकीय धोरणाची आपल्या देशाला आज देखील गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लगत असणाऱ्या या युरोपीय सत्तांशी शिवरायांचा संबंध येणे अपरिहार्य होते. याप्रसंगी शिवरायांची त्यांच्याशी काय भूमिका होती हाच या लेखाचा उद्देश आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यापूर्वीच पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच हे युरोपीय वसाहतवादी भारतात व्यापाराच्या निमित्ताने चांगलेच स्थिरावलेले होते. पोर्तुगीज भारतात इ. स. 1498 साली आले (वास्को-द-गामा). गोव्यावर त्यांचे वर्चस्व होते. पुढे इ. स. 1580 पर्यंत दीव, दमण, मुंबई बेट इत्यादी भाग त्यांनी जिंकला. इ. स. 1668 मध्ये मुुंबई बेट त्यांनी लग्नात भेट म्हणून इंग्रजांना दिले. इ. स. 1602 मध्ये डचांनी वखार स्थापन केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. 1614 साली सुरत येथे वखार स्थापन केली. फ्रेंचांनीदेखील इ. स. 1668 साली सुरत येथे वखार स्थापन केली. डचांनी वेंगुर्ले (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे वखार स्थापन केली. इंग्रजांनीदेखील राजापूर येथे वखार स्थापन केली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे इंग्रजांची वखार होती.
छत्रपती शिवाजीराजांनी 1658-59 साली आरमाराची उभारणी सुरू केली. त्यासाठी पोर्तुगीज कारागीरांची मदत घेतली. शाहिस्तेखानला धडा शिकविल्यानंतर 27 एप्रिल 1663 रोजी पोर्तुगीजांनी पत्र पाठवून शिवरायांचे अभिनंदन केले. मुघलांसारख्या बलाढ्य शक्तीला पराभूत करणाऱ्या शिवरायांच्या शक्तीची प्रचिती पोर्तुगीजांना आली, हे सदर पत्रावरून निदर्शनास येते. दरम्यान शिवरायांनी विजापूरच्या आदिलशाही अंमलाखालील डिचोली आणि साखळी हे प्रांत जिंकून घेतल्यामुळे पोर्तुगीजांनी आपला वकील रामजी शेणवी यांना शिवरायांकडे पाठवून अभिनंदन केले. इ. स. 1664 साली शिवरायांनी विजापुरी सरदार खवास खानाचा दक्षिण कोकणात पराभव केला. त्यावेळेस पोर्तुगीज व्हाइसरायने 7 जानेवारी 1665 रोजी शिवाजी महाराजांचे अभिनंदन केले. शिवरायांनी सुरत शहरावर छापा टाकून वखारीतील खजिना आणला तेव्हा पोर्तुगीज व्हाइसरायने शिवरायांची तुलना सिकंदर आणि सीझरशी केली आहे. या सर्व घडामोडींवरून लक्षात येते की शिवरायांचे अभिनंदन करून पोर्तुगीज शिवरायांशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होते. शिवरायांच्या पराक्रमाची भीती पोर्तुगीजांनीदेखील घेतलेली होती.
शिवरायांनी 50 गलबतांचे आरमार तयार केले होते. पण त्यांचा तडाखा कोणाला बसणार याबाबत पोर्तुगीज, डच, इंग्रज साशंक होते. शिवरायांनी पहिली आरमारी मोहीम गोव्याला ओलांडून बेदनूरवर काढली आणि बेदनूर जिंकले. पोर्तुगीज शिवरायांच्या वाट्याला गेलेले नाहीत. पण पोर्तुगीजांनी जयसिंगाला पत्र पाठवून शिवरायांचे आरमार समुद्रात बुडवू त्यासाठीचा खर्च मुघलांनी द्यावा, असे सांगितले; पण शिवाजीराजे आग्रावरून सुखरूप स्वराज्यात आल्याचे समजल्यावर पोर्तुगीजांनी पत्र पाठवून (5 जुलै 1667) शिवरायांचे अभिनंदन केलेले आहे. म्हणजेच वरून शिवरायांचे अभिनंदन करायचे आणि आतून शिवरायांना विरोध करायचा हे पोर्तुगीजांचे धोरण शिवराय ओळखून होते. त्यामुळेच पोर्तुगीजांना धडा शिकवायचा निर्णय शिवरायांनी घेतला.
शिवाजीराजांनी नोव्हेंबर 1667 साली पाच हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वार घेऊन पोर्तुगीजांवर हल्ला केला. हजारो सैनिक कैदी केले आणि दीड कोट पगोडा (पोर्तुगीज चलन) हस्तगत केला. तेव्हा पोर्तुगीजांनी शिवाजी राज्यांच्या संकटातून सुटका करून घेण्यासाठी पाद्री गालेसालू मार्तीस, रामजी शेणवी आणि वकील गोझांलो मार्टिन यांना तह करण्यासाठी शिवरायांकडे पाठवले. 11 डिसेंबर 1667 रोजी पोर्तुगीजांनी शिवरायांशी तह केला. त्या तहान्वये
1) पोर्तुगीजांनी बंडखोरांना मदत करू नये.
2) पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या मालावर जास्त दंडक लावू नये.
3) धर्मांतराला प्रोत्साहन देऊ नये, असे ठरले.
शिवरायांनी पोर्तुगीजांना रोखले. त्यांच्या अत्याचाराला पायबंद घातला. 1675 साली शिवरायांनी फोंडा किल्लादेखील घेतला. त्यांनी वसई आणि दमण जिंकूण चौथाईचा अधिकार प्राप्त केला. इ. स. 1670 साली पोर्तुगीज व्हाइसराय पोर्तुगालच्या राजास पत्राद्वारे शिवाजीराजांबद्दल कळवितो, “शिवाजी मोठा प्रबळ राजा असून सामर्थ्यवान अशा अनेक प्रबळ शत्रूंना न जुमानता जरा जपून वागतो. त्याची प्रजा त्याचे सारखीच मूर्तिपूजक असली तरी तो सर्व धर्मांना नांदू देतो. या भागातील अत्यंत धोरणी आणि राजकारणी पुरुष म्हणून त्याची ख्याती आहे.’ तर 15 नोव्हेंबर 1679 च्या पत्रात पोर्तुगीज गव्हर्नरने त्याच्या राजास कळविले आहे की, “शिवाजीची तुलना हूण सेनानायक “ऍटिला’ याच्याशी होऊ शकते. तो बचावाची आणि चढाईची युद्धे कुशलतेने खेळतो.’
वेंगुर्ले या ठिकाणी डचांची वखार होती. डचांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांनादेखील जेरीस आणले होते. शिवरायांनी इ. स. 1663 साली शिवरायांनी चार हजार घोडेस्वार आणि दहा हजार पायदळानिशी कुडाळ, सावंतवाडी जिंकली आणि डचांवर अंकुश निर्माण केला. शिवाजीराजांची आक्रमकता, बुद्धिकौशल्य पाहून डचदेखील भयभीत झाले. शिवाजीराजांनी डचांना मुंबई जिंकण्यासाठी मदत करायची आणि त्याबदल्यात डचांनी शिवरायांना मुरूड जंजिरा जिंकण्यासाठी मदत करायची असा करार झाला होता. वेंगुर्ल्याच्या डचांना पत्र पाठवून शिवरायांनी सुरूंग उडविणारे तज्ज्ञ पाठवावेत, अशी मागणी केली होती. डचांच्या वाढत्या हालचालींना पायबंद घालून त्यांच्यावर शिवरायांनी चांगलाच वचक निर्माण केला होता. शिवरायांनी बसनूरमध्ये डचांकडून तीन लाख गिल्डर (डच चलन) वसूल केले. डचांनी शिवरायांकडून अभयपत्र मिळवले. त्यानुसार जिंजी प्रांताप्रमाणे जकात घ्यावी. प्रवासाचे परवाने द्यावेत त्याप्रमाणेच गुलामांचा व्यापार न करण्याची अट शिवरायांनी डचांना घातली.
इंग्रजांचा आणि शिवाजीराजांचा संबंध पन्हाळा वेढ्याच्या प्रसंगी 1660 साली आला. इंग्रजांची राजापूरला वखार होती. त्या ठिकाणचा प्रमुख रेव्हिंग्टन याने पन्हाळा वेढाप्रसंगी सिद्दी जौहरला तोफा आणि गोळे पुरवले होते, याची कल्पना महाराजांना होती. शिवरायांनी तहात पन्हाळा विजापूरकरांना दिला. मार्च 1661 साली शिवरायांनी राजापूरवर स्वारी केली. तेथील इंग्रजांची वखार लुटली आणि खणून काढली. इंग्रज अधिकारी गिफर्ड याला कैद केले. त्यांना रायरीच्या कैदेत ठेवण्यात आले. शिवरायांचा विजापूर दरबारातील मित्र सरदार “रूस्तुम-इ-जमान’यांच्या मध्यस्थीमुळे महाराजांनी इंग्रज जिफोर्डची मुक्तता केली. इ. स. 1664 च्या सुरत लुटीच्या प्रसंगी प्रतिकार करणाऱ्या इंग्रज तुकडीतील तीन इंग्रज ठार झाले होते.
मुरूड-जंजिरा येथील सिद्दीला धडा शिकवण्यासाठी इंग्रजांनी मदत करावी यासाठी महाराजांनी सप्टेंबर 1671 साली सुंदरजी नावाचा वकील मुंबई इंग्रजांकडे पाठवला होता; परंतु इंग्रजांनी राजापूर वखारीची 39,957 होनांची नुकसानभरपाई शिवरायांकडून वसूल करण्याची हूरहूर लावली होती. महाराजांनी फक्त पाच हजार होन देण्याचे कबूल केले. पण इंग्रजांनी अमान्य केले. पुढे इंग्रजांनी 19 मे 1673 रोजी टॉमस निकल्स या वकिलांना शिवरायांकडे पाठवले. त्यानंतर 24 जून 1673 रोजी इंग्रजांनी नारायण शेणवी यांना शिवरायांकडे रायगडावर नुकसानभरपाईसाठी पाठवले. शिवरायांनी बारा हजार होन देण्याचे कबूल केले. पण इंग्रजांनी ती रक्कम अमान्य केली. शिवरायांनी इंग्रजांना 39,957 होनांचा हिशेब मागितला. इंग्रज अधिकारी चाइल्ड उस्टीक आणि डे हे हिशेबाच्या कामाला लागले. शिवरायांनी इंग्रजांना रेंगाळत ठेवून सिद्दीला मदत केल्याबद्दल चांगलाच धडा शिकवला.
नारायण शेणवीला निराजी पंडिताकडून 1674 च्या एप्रिलात शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती मिळाली. इंग्रजांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी हेन्री ऑक्झिंडेनला 1200 रुपयांचा नजराणा घेऊन 4 मे 1674 रोजी रायगडाकडे पाठवले. हेन्री ऑक्सिंडेन हा जॉर्ज रॉबिन्सन आणि टॉमस मिचेल यांना मदतीला घेऊन रायगडाकडे खाना झाला. हेन्री ऑक्सिंडेन याने 6 जून 1674 ला राज्याभिषेक प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि रुपये 690चा हिरेजडित शिरपेच, रुपये 450 ची हिरेजडित सळकडी, रुपये 510 चे मोती; संभाजीराजांना रुपये 125 ची दोन लाल खचित सलकडी, रुपये 250 ची आठ हिऱ्याची एक कंठी इत्यादी नजराणा दिला. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे रसभरीत वर्णन हेन्री ऑक्सिंडेनने लिहून ठेवले आहे. इंग्रजांनी शिवरायांशी सलोख्याचा तह केला. पण सिद्दीला, मुघलांना मदत कराल तर मदतीची अपेक्षा करू, अशा सूचनादेखील दिल्या.
शिवरायांनी इंग्रजांकडे 50 मोठ्या तोफांची मागणी केली होती, पण मुघलांच्या भीतीने ती इंग्रजांनी केली नाही. इ. स. 1675 साली शिवरायांनी धरणगाव येथील इंग्रजांची वखार लुटली. धरणगावच्या लुटीची भरपाई मिळावी, म्हणून ऑस्टिन रायगडावर आला. तेव्हा ऑस्टिनला सांगण्यात आले की, अशी काय लूट झाल्याचे महाराजांना ज्ञात नाही. ऑस्टिन परतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्तुगीज, डच किंवा इंग्रज यांचेशी जे धोरण होते, ते केवळ त्यांचा अनुनय करण्याचे नव्हते. त्यांच्या भव्य अशा औद्योगिक प्रगतीने महाराज भारावून गेले नाहीत; तर त्यांच्या वाढत्या साम्राज्याला पायबंद घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या आधुनिकीकरणाचा उपयोग स्वराज्यनिर्मितीसाठी महाराजांनी करून घेतला. पण त्यांची बेबंदशाही महाराजांनी माजू दिली नाही. गुलामांची विक्री करू नका, अशी सक्त ताकीद परकियांना देण्याइतके महाराज मानवतावादी होते. परकीय शक्तींच्या प्रगतीने दिपून जाऊन त्यांच्या अंकित जाण्याइतके महाराज भाबडे नव्हते. तर त्यांच्यावर अंकुश ठेवून एतद्देशीयांचे हितसंबंध जोपासणारे स्वाभिमानी राजे होते. स्वदेश, स्वराज्य, स्वभाषा, स्वसंस्कृती यांचे सवंर्धन आणि संरक्षण करण्याबरोबच परराष्ट्रीय भाषा, संस्कृती, धर्म, स्त्रिया यांचा आदर शिवरायांनी केला. भारतीय दुबळे नसून पराक्रमी, शूर, उत्तम प्रशासक आहेत हे शिवरायांनी पोर्तुगीज, डच, इंग्रजांना दाखवून दिले.
नेपोलियन, सिकंदर पराक्रमी होते. पण शिवाजीराजांची नैतिकता, संवेदनशीलता त्यांच्याकडे नव्हती. पाश्चिमात्यांचे आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर शिवाजीराजांनी केला. पण परकियांची दादागिरी त्यांनी खपवून घेतली नाही. पाश्चिमात्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबच आपले स्वराज्य, स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, हे त्यांनी परकियांच्या पुन:पुन्हा निदर्शनास आणून दिले. परकीय व्यापारावर त्यांनी बंदी घातली नाही, तर त्यामध्ये सामान्य रयतेला जाच होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. रक्तपिपासू सत्ताधीशांना लुटून शिवरायांनी गरिबांचे स्वराज्य निर्माण केले. ती लूट त्यांनी स्वत:साठी वापरली नाही. आजपासून सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणजे सतराव्या शतकात शिवरायांचा पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी युरोपीय सत्तांशी संबंध आला. त्यामुळे शिवाजी महाराज वंदनीय राजे आहेत.
-श्रीमंत कोकाटे,
इतिहास अभ्यासक