नाटकशाळा खुद्द पेशव्यांच्या असल्यामुळे त्यांची राहण्याची, उदरनिर्वाहाची व्यवस्था स्वतंत्र केलेली असायची. गायक आणि संगीत समीक्षक वामनराव देशपांडे “महाराष्ट्रातील संगीताचे कार्य’ या पुस्तकात लिहितात, “पेशवाईच्या अखेरपर्यंत पावा भीमराव, राणी शिंपी, विठू गुरव, त्र्यंबक आत्माराम, विठोबा पारनेरकर हे थोरले माधवराव आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या आश्रयाखाली होते.
दुसऱ्या बाजीरावांच्या राजवटीत दावलखान, मेंढूसेन, विलासबरसखान आणि चिंतामणी मिश्र यांसारखे अनेक धृपद गायक संगीताची जोपासना करीत होते.’ यातून असा निष्कर्ष काढता येतो की, पेशवाईच्या काळात शास्त्रीय संगीताचे चांगले वातावरण निर्माण झाले होते. ते बावन्नखणीत झिरपले होते.
झिरपताना ते महाराष्ट्रातील लोककलेचा बाज घेऊन नव्या रूपाने, नव्या दमाने लोकरंजनासाठी पुढे आले. नानासाहेब पेशव्यानंतर सवाई माधवराव आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळात नावारूपाला आलेल्या व्यंकट नरसी, चंद्री नायकीण, सगुणी कलावंतीण, लक्ष्मी परभीण या कलावंत महिला बावनखणीतल्याच होत्या. नानासाहेब पेशव्यांच्या काळात बावनखणी नावाची कलावंतिणींचे दिवाणखाने असलेली एकच वास्तू होती. सवाई माधवराव आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बावनखणीचा विस्तार होत गेला. एकेका कलावंतीणीची एकेक स्वतंत्र वास्तू म्हणजे दिवाणखाने उभे राहिले. त्यामुळे शुक्रवारपेठेचा परिसर बावन्नखणी म्हणून ओळखला जाऊ लागला.
महाराष्ट्राला बैठकीच्या लावणीची देणगी देणाऱ्या बावन्नखणीचे नाव लोककलेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. बावन्नखणीतून अनेक गायिका निर्माण झाल्या. अनेक नर्तिका निर्माण झाल्या. वादक, संगीतकार निर्माण झाले. पेशवेशाहीचा अस्त झाल्यानंतर ही सर्व कलाकार मंडळी पांगली. टीचभर पोटाची खळगी भरेल तेथे वास्तव्यासाठी वीतभर जागा शोधू लागले. याच भटकंतीतून तमाशा नावारुपाला आला. महाराष्ट्राचे भूषण असलेला तमाशा लोकप्रबोधनाची पताका मिरवीत गावोगाव फिरू लागला. स्वतंत्रपणे राजदरबारी सादरीकरण होणाऱ्या लावणीने तमाशात प्रवेश केला.
तिला तबल्याऐवजी ढोलकीची साथ मिळाली आणि लावणी लोकांच्या मना मनात रुतून बसली. कालौघात तमाशावरही अनेक संकटे आली. त्याला अश्लीलतेच्या नावाखाली डावलले जाऊ लागले. तमाशाला राजाश्रय मिळाला नाही. आज तमाशाला घरघर लागली असली तरी महाराष्ट्रातल्या लोककलाकारांनी तमाशा कला जीवापाड जपली आहे. अनेक तमाशा फड त्याचे जतन व संवर्धन करीत आहेत. लावणीही सातासमुद्रापार गेली आहे.
पुन्हा नव्या दमाने नाट्यगृहातून प्रवेशली आहे. ज्या स्त्रियांना लावणी शब्द उच्चारायचीही परवानगी नव्हती, त्या स्त्रियांसाठी लावणीचे स्पेशल कार्यक्रम होऊ लागले आहेत. लोककलेवर कितीही संकटे आली तरी लोककलेच्या उपासकांनी लोककला जिवंत ठेवली आहे. म्हणूनच त्यासर्वांना नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करण्यासाठी दोन्ही हात आपोआपच कपाळासमोर येतात आणि मस्तक त्यांच्या चरणांशी झुकते. (समाप्त)
– प्रा. डॉ. बाबा बोराडे