काय म्हणता, पहिल्याच पावलाला अडखळलात. अहो, अडखळणारच ना, नीट लक्ष दिले तरी इथल्या गर्दीत ठेच ही लागणारच. काय म्हणता “वटान’ म्हणजे काय ते लक्षातच आले नाही. काही हरकत नाही, चाळीत राहिलेल्यांनाही हा शब्द सहजासहजी लक्षात येत नाही, तर तुम्हाला हा शब्द कसा कळणार? साध्या-सोप्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचे तर वटान म्हणजे वऱ्हांडा, अगदी मुंबईच्या माणसाला समजेल अशा शब्दांत सांगायचे म्हणजे चाळीची गॅलरी.
आता तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही का अडखळला. चाळीच्या या वऱ्हांड्यात असलेली अडचण तुम्हाला काय सांगायची? वऱ्हांड्यात ठेवलेल्या बिऱ्हाडाच्या सामानाला नवीन माणूस हमखास अडखळणार हे ठरलेलेच. रोज वावरणारा माणूसही या अडथळ्यांना ठेचकळल्या शिवाय चालू शकत नाही. तुम्ही तर पहिल्यांदाच इथे आला आहात.
खरं तर वऱ्हांड्याचा उपयोग जिन्यांपासून आपापल्या खोलीमध्ये पोहोचण्यासाठी आहे. पण चाळीतली खोलीतली थोडकी जागा बघितली तर याचा उपयोग एका पेक्षा अनेक गोष्टींसाठी होत असे याचे नवल वाटणार नाही. अगदी थोडक्यात सांगायचे तर हा वऱ्हांडा म्हणजे चाळीतल्या कोणत्याही बिऱ्हाडाचे अर्धे सामान सांभाळणारी जागा अशी नवी ओळख चाळकऱ्यांनी या वऱ्हांड्यांना दिली होती.
सर्वप्रथम आपण या वऱ्हांड्याची रचना पाहू या. प्रत्येक चाळीला स्वत:चे वेगळेपण जपणारा एक वऱ्हांडा असतो. बैठी चाळ असो किंवा बहुमजली चाळ असो, प्रत्येक चाळीला छोटा का होईना वऱ्हांडा असणारच. या वऱ्हांड्याशिवाय बिऱ्हाडकरू आपल्या खोलीत पोहोचणारच नाही. चाळीच्या जिन्यांपासून चाळीच्या प्रत्येक खोलीपर्यंत माणसांना जाण्या-येण्यासाठी खरंतर या वऱ्हांड्याची योजना केलेली असते.
पण दहा बाय बाराच्या खोलीत राहाणाऱ्या बिऱ्हाडाचे सामान त्याच्या खोलीत मावत नसल्याने आपल्या समोरच्या या मोकळ्या जागेत प्रत्येकाचा अर्धा संसार सामावला जायचा. मालकाने अजिबात कंजूसपणा न करता बांधलेल्या काही चाळींना खोलीच्या दोन्ही बाजूंना वऱ्हांड्याची खैरात केलेली असायची. अशा चाळीतल्या बिऱ्हाडांना खोलीच्या मागेपुढे सामान ठेवण्याची ऐश करायला मुबलक जागा मिळत होती.
चटई क्षेत्राचा पुरेपूर वापर करून घेणारे आजकालच्यासारखे काही मालक होते, त्यांनी आपल्या चाळीत जागेची बचत करायला फक्त एकच वऱ्हांडा दिला होता. काही चाळीत वटान मध्ये ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला समोरासमोर खोल्या असत. अशा चाळीतल्या लोकांची सामान ठेवण्यावरूनही रोजच्या रोज भांडणे होत असत, हे काही वेगळे सांगायची गरज नाही.
चाळ संस्कृतीमध्ये या वऱ्हांड्याचे अनन्य साधारण महत्त्व होते. चाळीच्या खोल्यांची पागडी या वऱ्हांड्याच्या जागेवरून कमी जास्त होत असे. वऱ्हांड्याचा मुख्य उपयोग जिन्यांपासून आपल्या खोलीपर्यंत जाण्याचा मार्ग हा होता. पण म्हणतात ना, मुळात कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा हे शिकायचे असेल तर जगाच्या पाठीवर मुंबईकरांचा हात धरणारे कोणीही नाही. या वऱ्हांड्यात प्रत्येक बिऱ्हाडचे वरकड सामान ठेवलेले असे.
कित्येक खोलीच्या बाहेर घरातल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांना निवांतपणे बसण्यासाठी जुन्या जमान्यातल्या लाकडांच्या मजबूत खुर्च्या ठेवलेल्या असत. घरात चालू असलेल्या स्वयंपाकादी कामांच्यामुळे गरम होऊ नये म्हणून या खुर्चीत बसून बाहेरची मोकळी हवा खात हे सीनियर सिटीजन बसत. दिवसभर वऱ्हांड्यात बसून असल्याने चाळीत घडणाऱ्या अनेक घडामोडींचे हे प्रत्यक्षदर्शी प्रेक्षक असत.
आजच्या भाषेत सांगायचे तर संपूर्ण चाळीचे ते सीसीटीव्ही कॅमेरे होते. बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर डोळे मिटून बसलेल्या या म्हाताऱ्यांना सगळ्या गोष्टी कशा काय दिसतात हे मला तेव्हापासून पडलेले कोडे आजही सुटलेले नाही. चाळीमध्ये घडणारी कोणतीही गोष्ट यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नसे. बसल्या जागेवरून येणाऱ्याजाणाऱ्यांवर अचूक लक्ष ठेऊन ही माणसे सगळ्यांचे पितळ उघडे करण्यात पुढे असत.
सकाळच्या पहिल्या सूर्य किरणाबरोबर वऱ्हांड्यात स्थापन झालेली ही मूर्ती रात्री अंथरुणे टाकल्यानंतरच विसर्जित होत असे. दिवसभर चाळीत घडणाऱ्या घटनांचे एकमेव साक्षीदार असल्याने व त्या बातम्या संपूर्ण चाळीत पोहोचवण्याचे काम करीत असल्याने या लोकांना चाळीतली टारगट मंडळी “बीबीसी लंडन’ असेही म्हणत असत.
असो, त्यांच्या या खुर्चीला लागूनच घरातल्या दिवसभराच्या कामाला लागणाऱ्या वरकड पाण्याची पिंपे भरून ठेवलेली असायची. कुटुंबाच्या आकारमानावरून एक किंवा अनेक पिंपे भरून ठेवलेली असत. पिण्याचे पाणी मात्र घरात माठात किंवा हंडा-कळशात भरून ठेवलेले असे. या पिंपाशेजारी एखादे मोडकळीला आलेले जुने लाकडी कपाट भिंतीला टांगून ठेवलेले असे.
या कपाटांचा उपयोगही बहुविध प्रकारे होत असे. कपाटाच्या दरवाजा नसलेल्या भागात घरातल्या माणसांचे चप्पल बूट विराजमान झालेले असत. तर बिऱ्हाडातल्या बाहेर झोपायला जाणाऱ्या माणसांचे बारदान दरवाजा असलेल्या कपाटाच्या भागात दिवसा आराम करत असे. या कपाटांच्या खालच्या जागेत लोटा परेडसाठी लागणारी एक-दोन टमरेल असायची.
त्याकाळी टमरेल म्हणवून घ्यायचा मान फक्त वापरून झालेल्या डालड्याच्या डब्यांना मिळायचा. टमरेल किंवा चिनपाट (हा खरंतर टिनपॉटचा अपभ्रंश आहे) म्हणजे डालड्याचा डबा असा एक अलिखित नियम समस्त मुंबईने मान्य केला होता. डालड्याचा डब्बा रिकामा झाला की सर्वप्रथम त्यांचे तोंडांकडील बाजू कापली जाई.
त्याच्या समोरासमोरील बाजूंना खिळ्याने भोक पाडून त्यातून तार बांधून पकडण्यासाठी कडी केली जायची. अशाने रिकामा डालड्याचा डब्बा पण कामात यायचा आणि टमरेल विकत घ्यायचा खर्च वाचायचा. या टमरेलच्या बरोब्बर वर भिंतीला दोन मोठे सिमेंटखिळे मारून एक जुनी पुराणी काथ्याची रश्शी बांधलेली असे. त्याचा उपयोग प्रामुख्याने घरातली बारदाने सुकविण्यासाठी केला जायचा.
बाहेर बसलेल्या आजोबांच्या खुर्चीच्या डोक्यावर वटणाच्या सिलिंगला आपल्या घरासमोरच्या जागेत रोजचे धुतलेले कपडे वाळवण्यासाठी रश्शी बांधून ठेवलेली असे. सकाळी या रश्शीवर विराजमान झालेले कपडे दुसऱ्या दिवशीचे कपडे धुवून आल्यानंतरच आपली जागा सोडत. या रश्शीच्या मधोमध वरच्या सिलिंगला एक हुक उलटा लटकत असे.
दिवाळीत या हुकाला कंदील लटकवण्याचे काम केले जाई. कंदिलाचे खाली दिवाळीत घरातल्या स्त्रिया इतक्या गर्दीतून मोठ्या हिकमतीने रांगोळी काढण्यासाठी जागा निर्माण करीत. त्या जागेवर रांगोळी काढून झाल्यावर जाणाऱ्यायेणाऱ्यांच्या पावलाने रांगोळी पुसून जाऊ नये म्हणून त्यावर घरातला पाट ठेवत असत.
तो पाट लोकांना लक्षात यावा म्हणून त्यावर एक पणती लावून ठेवीत. एवढी सज्जता करूनही शेवटी ती रांगोळी पंधराव्या मिनिटाला पुसून जात असे. पण या स्त्रियांच्या सहनशक्तीला दाद द्यायला हवी. एवढे होऊनही वर्षानुवर्षे त्यांच्या रांगोळी काढण्यात कोणताही खंड पडला नाही आहे. दिवाळीत लटकवलेला कंदील सहसा नव-वर्ष संध्येला आपली जागा रिकामी करत असे.
– डॉ. नरेंद्र कदम