चुका करणे हा मनुष्य स्वभाव आहे. हाच स्वभाव आपण बदलून जर अचूकतेकडे पोहोचलो तर आपल्या आयुष्यात बराच फरक कसा पडू शकतो, नेमके याच विषयी थोडेसे…
आपण विजयी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतो. या प्रयत्नांत शिस्त, वक्तशीरपणा, कौशल्य विकास वगैरे सर्वच आले. या सर्वांमुळेच आपली विजयाची, आपले ध्येय साध्य करण्याची शक्यता वाढतच असते. पण आपल्याला आणखी एका दुर्लक्षित, पण महत्त्वाच्या घटकाकडे लक्ष द्यावयाचे आहे, तो म्हणजे “चुका टाळा’.
बऱ्याच वेळा आपण चुका केल्यामुळे पराभूत झालेलो असतो.
क्रिकेटमध्ये असे कितीतरी सामने आहेत, त्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने अतिरिक्त धावा जास्त प्रमाणात दिलेल्या असतात. आणि त्याच संघाचा पराभव जेवढ्या अतिरिक्त धावा दिलेल्या असतात तेवढ्याच धावांच्या कमी अधिक फरकाने झालेला असतो. मग अशा वेळी त्या संघाने जर अतिरिक्त धावा दिल्या नसत्या तर विजय त्यांचा होता. त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे अपयशाचे धनी झालेले असतात.
बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्या ध्येयापासून, विजयापासून वंचित राहिलेलो असतो. जर आपला सहकारी काही चुकीचे काम करून बसला तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो, अशा वेळी आपण सहकाऱ्यांना संभाव्य चुका टाळण्यासाठी काय करावे याबाबत जागृत करू शकतो. ज्या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत त्याबाबत इतरांना सजक करून सोडावे. आपण जेथे चुकलो, तेथे आपला सहकारी चुकणार नाही याची काळजी घ्यावी. कधी प्रतिस्पर्धी किंवा इतर कोणाच्या विक्षिप्त वागण्याचा फटका आपल्याला बसलेला असतो. कोणी संकेत अथवा नियम मोडून काही काम केलेले असते त्यामुळेही आपले काम मुश्कील होऊन बसलेले असते.
चुका टाळण्यासाठी आपण संयम कधीच ढळू द्यावयाचा नाही.
बऱ्याच वेळा असेही होते आपला प्रतिस्पर्धी हा खूपच सरस असतो. त्याला टक्कर देणे हे आपल्यालाही एक आव्हानच असते. अशा प्रसंगी आपण संयमाने परिस्थिती हाताळायची असते. येथे आपण युक्ती वापरू शकतो ती म्हणजे आपण स्वतःहून कोणतीच कृती आधी करावयाची नाही. त्याच्या कृतीवर आपण रक्षात्मक पवित्रा अवलंबवायचा. थोडक्यात, आपण आक्रमण नाही तर रक्षणावर भर द्यावयाचा. असे तंत्र केवळ खेळातच नव्हे तर इतरही सर्वत्र क्षेत्रात वापरता येऊ शकते. असे रक्षात्मक धोरण स्वीकारत असतानाच आपण प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवायची की तो कुठे चूक करतो.
तो जी चूक करेल तेथे त्याला कोंडीत पकडून पुनरागमनाची संधी मिळू द्यावयाची नाही. थोडक्यात, जो ज्या क्षेत्रात प्रबल आहे तेथे त्याला आव्हान न देता इतर दुसऱ्या क्षेत्रातील त्याची कमजोर बाजू ओळखून तेथे त्याला नामोहरम करू शकतो. पण अशा प्रकारे रक्षात्मक पवित्रा अवलंबत संधीची वाट पाहणे यासाठी संयम आवश्यक असतो. तेवढा संयम आपण दाखविणे आवश्यक असते नाहीतर इतर कोणी बाजी मारून जाईल.
आपण प्रतिस्पर्ध्यावर काही प्रयोग करत असतो तसा प्रतिस्पर्धीही आपल्यावर काही प्रयोग करतो. आपल्याला कोणी मुद्दाम डिवचून, चिडवून काही विपरीत कृती करण्यासाठी उत्तेजित करत असतो, संयम आपल्याला येथेही दाखवावा लागतो. आपण शांत राहून परिस्थिती हाताळायची असते. म्हणजेच आपण स्वतःहून कोणतीही चूक करायची नसते. कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्यापेक्षा प्रत्यक्ष आपण त्या परिस्थितीतून जात असल्याने आपल्याला काय योग्य वाटते, काय करावे याचा सर्वांगाने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.
आपण चुका टाळण्यासाठी जास्तीत जास्त अचूकता कशी राखता येईल याकडे लक्ष द्यावयाचे. क्रिकेटपटू कपिल देव यांनी त्यांच्या कारर्किदीत एकही नो बॉल टाकला नाही. प्रतिस्पर्धी संघाला आपल्या चुकीमुळे कशासाठी फुकट जास्त धावा द्यावयाच्या? आपणही आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त अचूकता राखायची म्हणजे आपले लक्ष साध्य होण्याची शक्यता वाढते.
चूक ही किती गंभीर आहे ते कामाच्या व्याप्तीवरही अवलंबून असते. जसे एक किलो तांदूळ खरेदी केले त्यात शंभर ग्रॅम कमी तांदूळ आले. त्याचबरोबर शंभर किलो तांदूळ खरेदी केले त्यातही शंभर ग्रॅम तांदूळ कमी आले. दोन्ही खरेदीमध्ये शंभर ग्रॅम तांदूळ जरी कमी आले तरी एक किलोमध्ये शंभर ग्रॅम कमी हा फरक खूप मोठा वाटतो, पण शंभर किलोमध्ये शंभर ग्रॅम कमी हा फरक खूप छोटा वाटतो. तर कधी सुरुवातीला छोटी वाटणारी चूक पुढे मोठे गंभीर स्वरूप धारण करू शकते.
जसे प्रत्येकच शंभर किलोच्या पोत्यात शंभर ग्रॅम कमी तांदूळ भरला जात असेल तर एखादी मोठी मागणी या कारणास्तव रद्द होऊ शकते. त्यामुळे आपण कटाक्षाने छोटी किंवा मोठी कोणतीही चूक असेल त्याकडे दुर्लक्ष करावयाचे नाही. आपली बाजू जर अचूक असेल तर आपण कोणत्याही परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणजेच आपले लक्ष साध्य करू शकतो.
आपल्याला कामात वेळेचेसुद्धा गणित चुकायला नको. अगदी एखाद्या मिनिटासाठी गाडी चुकू शकते. बॅंकेचे दार बंद होऊ शकते. वेळेचे गणित चुकल्यामुळे युद्धेही हरल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे वेळ साधण्यासाठी प्रसंगी जिवाचा आटापिटा करावा लागला तरी चालेल, पण वेळ पाळली गेलीच पाहिजे. जर ती वेळ निघून गेली तर कदाचित पुन्हा कधीच संधी मिळणार नाही, असेही होऊ शकते.
कोणतेही काम नियोजनाप्रमाणे करणे, योग्य रीतीने करणे, बिनचूक करणे यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, पण झालेली चूक निस्तरण्यासाठी त्याहीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, जास्त मनस्ताप होणार आहे हे लक्षात घ्यावे. कदाचित झालेली चूक सुधारण्याची संधीसुद्धा मिळत नसते. बऱ्याच वेळा असेही होते की आपल्याला एकच संधी मिळते त्या एकाच संधीत आपल्याला आपले काम बिनचूकपणे करायचे असते. यासाठीच ती संधी मिळविण्यासाठी आणि त्या वेळी चूक होऊ नये म्हणून खूप मेहनत घेतली गेली पाहिजे आणि तेवढी तयारी असली पाहिजे.
आपण आपल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधायची की, छोटी किंवा मोठी कोणतीही चूक करायचीच नाही. याचसाठी आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून जर अचूकतेचे पुष्प अर्पण केले तर अपयशाला दूर ठेवता येऊ शकते, कारण बाजी शेवटच्या क्षणीही पलटवण्याची क्षमता आपल्यात आपण निर्माण केलेली असते.
– अनिकेत भालेराव