शिर्डी – शिर्डीतील साई समाधी मंदिर मे महिन्यात बंद असल्याच्या खोट्या बातम्या देश विदेशात पसरल्यामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तरी साई संस्थान प्रशासनाने पुढाकार घेतल्यास अशा अफवा रोखू शकेल, असा विश्वास अनेक भाविकांनी व्यक्त केला आहे.
देशातील अनेक वृत्तवाहिन्यांवर विविध भाषेत शिर्डीचे साई मंदिर मे महिन्यात बंद राहणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक भाविकांनी आपले विमानाचे, रेल्वेचे तिकीट रद्द केले तर सुट्टीचा महिना असल्याने आपल्या परिवारासह शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपला दर्शनदौरा रद्द केला.
वास्तविक या अफवेचा मोठा आर्थिक फटका शिर्डीच्या प्रत्येक व्यवसायाला बसला असून खास करून हॉटेलधारकांचे मोठे नुकसान होत आहे. एरव्ही मे महिन्यात शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट, प्रसाद, छोट्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या हातगाड्या, फळ विक्रेते या सर्वांचा व्यवसाय अगदी समाधानपूर्वक होत असतो.
मात्र साई मंदिर बंद असल्याच्या अफवेने सर्वांना आर्थिक फटका बसला असून शिर्डीची बाजारपेठ ओस पडल्याचं चित्र बघावयास मिळत आहे. या अफवेला रोखण्यासाठी साई संस्थान प्रशासनाने आपल्या संकेत स्थळावर प्रत्येक भाषेत आवाहन केले पाहिजे. यासाठी साई संस्थान प्रशासन, जनसंपर्क कार्यालयांनी जबाबदारी स्वीकारून या अफवेला रोखण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी खुले आहे असे आम्ही सर्वोत्तपरी आमच्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये मॅसेज करत आहोत, मात्र साई संस्थानने सुद्धा या गंभीर प्रकरणात लक्ष घालून भाविकांचा गैरसमज दूर करावा हीच अपेक्षा असल्याचे माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते पाटील म्हणाले.