पालकमंत्री पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
नारायणगाव – अणे-पठारचा कायमचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चौथ्या सु.प्र.मा. (सुधारित प्रशासकीय मान्यता) मध्ये प्राधान्याने समावेश करावा यासाठी अणे पठार भाग पाणी संघर्ष समितीने येडगाव धरणावर (ता. जुन्नर) केलेले ठिय्या आंदोलन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.पाणी संघर्ष समितीने सोमवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता येडगाव धरणावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
आंदोलनास शेतकरी नेते अंबादास हांडे, रेडा समाधी ट्रस्टचे विश्वस्त बाबाजी शिंदे, सचिन थोरवे, सामाजिक कार्यकर्ते म्हतू गगे, सरपंच सौ. उबाळे, तुषार देशमुख, अजित शिंदे, एम. डी. शिंदे, संतोष शिंदे, अमोल शिंदे, गोरख शिंदे, बाळासाहेब दाते, पाटील गाडेकर, प्रियंका दाते, सुहास आहेर, बाबाजी आहेर, रंगनाथ आहेर, शांताराम दाते, ज्ञानेश्वर माऊली, प्रशांत दाते, शांताराम देशमुख यांसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रशांत कडुसकर, राजेंद्र रावले, संभाजी माने, आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा पठार भागातील शेकडो शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठिय्या आंदोलनांच्या ठिकाणी आमदार अतुल बेनके, भाजपच्या नेत्या आशा बुचके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी आंदोलनाच्या ठिकाणावरून पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रशांत कडुसकर, राजेंद्र रावले, संभाजी माने यांच्या उपस्थितीत आमदार अतुल बेनके व भाजपाच्या नेत्या आशा बुचके यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरून येडगाव धरणावर सुरू असलेल्या पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनाबाबत चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना तालुक्यातील प्रमुख नेत्यांसह बुधवारी (दि.25) पुणे येथे चर्चेसाठी बोलविण्यात आले असल्याचे सांगितले. तर आशा बुचके यांनी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मनाचा मोठेपणा ठेवून नेत्यांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
सरपंचांसह सर्वपक्षीय नेते राहणार उपस्थित
आमदार बेनके म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यासह भाजप नेत्या आशा बुचके यांच्याबरोबर चर्चा करून आंदोलनकर्त्यांचे प्रश्न समजावून घेतले. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर कपोले यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आवश्यक परवानग्या काढण्यास सांगू असे आश्वासन दिले. पुणे येथे पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी अणे पठार भागातील चार सरपंचांसह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहतील, असे आमदार बेनके यांनी नमूद केले.
आपण केलेले ठिय्या आंदोलन अत्यंत गांभीर्याने घेतले असून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या आहेत. पालक मंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत काय मार्ग निघेल त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. शेतकरी संघटनेच्या पुढाकारामुळे अणे पठारावरील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल असा लोकप्रतिनिधी नात्याने मला विश्वास आहे.
– अतुल बेनके, आमदार