करोना रोगाबाबत सोशल मीडियावर बनावट पोस्ट “व्हायरल’ : कारवाईची मागणी
मंचर -“करोना’ व्हायरस “ब्रॉयलर कोंबड्यां’मुळे पसरत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मात्र, या पोस्ट चुकीच्या असून या चुकीच्या अफवा पसरण्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राज्य पोल्ट्री व्यवसाय असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश तापकीर आणि कार्यवाहक रमेश काळे यांनी पशुसंवर्धन विभागाकडे केली आहे.
“करोना’ व्हायरसबाबत बनावट पोस्ट फिरत असल्याने पोल्ट्री व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता पोल्ट्री व्यवसायिकांकडून व्यक्त होत आहे.
तर शास्त्रीयदृष्ट्या समाज माध्यमांवर फिरणाऱ्या पोल्ट्री व्यवसायाबाबतच्या चुकीच्या बातम्यांना कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित रानडे यांनी दिल्याची माहिती पोल्ट्री व्यवसायातील तज्ज्ञ आणि आंबेगाव ऍग्रोचे मालक शफीभाई मोमीन यांनी दिली आहे.
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने करोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे डॉ. अजित रानडे यांनी सांगितले.
समाजमाध्यमावरील पोस्ट राणीखेत रोगाची
सध्या समाज माध्यमांत काही खोडसाळ पोस्ट्सद्वारे कोरोना विषाणूचा चिकन खाण्याशी संबंध जोडला जातोय. प्रत्यक्षात कोंबड्यांमध्ये “कोरोना’ विषाणू आढळल्याच्या एकाही घटनेची नोंद नाही. व्हॉट्सऍप, फेसबुक आदी माध्यमांवर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत, असे डॉ. अजित रानडे यांनी सांगितले आहे.
भारतीय मांसाहाराची पद्धत सुरक्षित
भारतात मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहेत. चिकन व मटण उकळवून शिजवून घेतले जाते. पाणी हे 100 डीग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. एवढ्या तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण 27 ते 45 डीग्रीपेक्षा अधिक तापमानात जगत नाहीत. शिवाय भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात, त्यामुळे आजपर्यंत चिकन-मटणातून एखाद्या विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत, असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले.