पुणे – पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यासाठी तीन विमा कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार 2019-20 च्या मृगबहारांतर्गत सहा पिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या या योजनेकरिता राज्य सरकारच्या हिश्याचे 30 कोटी 33 लाख 34 हजार 606 रुपयांचा विमा हप्ता देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अवर सचिव नीता शिंदे यांनी हा अध्यादेश काढला आहे.
शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्याच्या दृष्टीने यंदापासून राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत मृग बहरातील संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, चिकू व लिंबू या फळपिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे. हवामानातील अचानक होणाऱ्या बदलाचा फटका या पिकांना बसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
या योजनेकरिता एकूण तीन विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीला 23 कोटी 81 लाख16 हजार रुपये हप्ता दिला जाणार आहे. याशिवाय एच. डी.एफ.सी. ऍग्रो जनरल इन्शुरन्स कोंनीला 5 कोटी 40 लाख चार हजार 78 रुपये तर एस. बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनीला 1 कोटी 12 लाख 13 हजार रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही सहा फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.